एक ’होपलेस’ प्रश्न आणि ’प्रिय’..

परमेश्वराने कायम एकमेकांमधून निसटणारे नट-बोल्ट्स बसवलेल्या मेंदूची रचना केलेले काही विरळा नग बनवले आहेत..आणि मी त्यातला एक जातिवंत वाण आहे..
असं ’प्रिय’ म्हणतो...’मी’ नाही...
काहीही आगापिछा नसलेले कुठले प्रश्न कधी माझ्या डोक्यात येतील आणि त्यासाठी मी ’प्रिय’चे किती डोकं खाईन याला काहीच सीमा नसते...
’प्रिय’ मला ’छळवाद आहे नुसता’ असं म्हणतो कधीकधी... प्रेमाने...well, i think so..मला exactly माहीत नाही..
कारण या सर्व शंका-कुशंकांचे समाधान करण्यासाठी हक्काचा हातात सापडतो तो ’प्रिय’...
काल अशाच एका प्रश्नाच्या hangoverमध्ये होते तेवढ्यात मोबाईल वर ’करीब’ची टिपीकल शीळ वाजू लागली...
माझ्या मेंदूला खाज सुटलीये हे ’प्रिय’ला कसं कळतं काय माहीत???टेलीपथी असावी बहुतेक...
आपणाहून डोक्याला त्रास करून घ्यायला तो येत असेल तर मी ’ना’ का म्हणावं???
त्याला हॅलो ही बोलायची सवड न देता मी माझा प्रश्न भिरकावते...
"उद्या माझा मृत्यू झाला तर कसं वाटेल तुला???"
पलीकडून पहिल्यांदा सुस्कारा...मग थंड आवाजात विचारणा..
"हे काय नवीन खूळ काढलेस आज तू??"
"सांग ना..उद्या मी पटकन मरूनच गेले तर काय करशील तू? रडशील??? कुढशील??? माझ्या पार्थिवाचे दर्शन तरी घ्यायला येशील ना तू???"
पार्थिव???
असं अगदी काही senti बोलायचे झाले की मी कोणालाच ऐकत नाही...
’माझं पार्थिव’ हा शब्द्प्रयोग ऐकताना मला आताच इतकी गंमत वाटतेय तर त्यावेळी ’प्रिय’ला हसू दडवायला किती कष्ट पडले असतील???
असो..
"सुटशील ना तू???त्रास गेला डोक्याचा करत..???"
निमिषर्धाचाही विलंब न करता पलीकडून उत्तर आले..
"खरंय ते"..
बस्स...मी धाय मोकलून रडायलाच लागले..
"मला माहीतच होतं ते...आता तुझ्या तोंडून ऐकलं इतकंच.."
’प्रिय’ करायला गेला एक आणि झाले भलतेच...
कुठून झक मारली आणि मस्करी केली असे झाले त्याला..
’प्रिय’ रोखठोक आहे...अरे, पण कोणत्या व्यक्तीसमोर किती स्पष्ट बोलावं याचेही काही एटीकेट्स असतात..माझ्यासमोर मलाच "तू गेलीस म्हणजे त्रास जाईल डोक्याचा!" असं म्हणणं म्हणजे हद्द झाली..
आता तू आणि तुझा स्पष्टवक्तेपणा...जा तेल लावत...
आमच्यामध्ये जवळजवळ पाच मिनीटांची प्रदीर्घ शांतता असते...
आता मात्र प्रिय हतबल होतो...
आता तो ठेवणीमधलं अस्त्र उपसतो...प्रिय गायला सुरुवात करतो..
आणि ही मात्रा मला लागू पडते..
पाळण्यातलं तान्हुलं कसं कोणी गाणं गायला लागलं की कसं बोळकं खुलवून हसतं???तशी माझ्या रडण्याची जागा आता अनावर झालेल्या हसण्याने घेतलेली असते..
म्हणजे त्याच्या आवाजात ती ’हम दिल दे चुके सनम’मधल्या अजय सारखी सच्चाई असेलही कदाचित पण त्याने गाण्यास सुरुवात केली की मला हसूच फ़ुटते आणि ते काही केल्या आवरत नाही..
त्या हसण्यामध्ये त्याचा आवाज मरायला ऐकलाय कोणी???
इतक्या दुरुनही मला त्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा झालेला असणार याची पुरेपूर कल्पना होती...
’प्रिय’ला गायला बियला आवडत नाही..
म्हणजे गाताना आपला आवाज ओल्या लाकडावर रंधा मारल्यासारखा येतो याची त्याला पुरेपूर जाणीव आहे म्हणून की काय कोण जाणे???
पण..
स्वत:च्या मनाविरुद्ध केवळ माझ्याकरता केलेली छोटीशीही गोष्ट मला पुरे असते..
"मी कधी कधी खूप मूर्खासारखी बोलते नं?"
रडक्या नाकाने होणारा ’सूं सूं" होणारा आवाज शक्य तितका आवरायचा प्रयत्न करत मी बोलते..
मला फ़ार कमी वेळा असं काही बोलायचं सुचतं..
मी पुन्हा बोलती झालेली बघून पलीकडून मोठ्ठा नि:श्वास सुटतो..
"नाही गं वेडे..असं कोण बोलतं???"
या मधाळ वाक्यानंतर पलीकडून अत्यंत निर्मम आवाजात माझी हजामत सुरु होते..
"पहिली गोष्ट...तू कधी कधी नाही तर बहुतेक वेळा मूर्खासारखंच बोलतेस..
दुसरी गोष्ट..तू मूर्खासारख्या विचारलेल्या प्रश्नावर मी पण काहीतरी मूर्खासारखंच बरळेन असा सोयिस्कर समज करून घेतेस...
तिसरी गोष्ट..तुला विनोद कळत नाहीत आणि ..
चौथी गोष्ट...या तीन गोष्टींच्या एकत्रित घडण्याने जो काही वितंडवाद व्हायचा असतो त्याची मला आता सवय झाली आहे.."
प्रियचं मला असं हसण्यावारी घेणं मला जरा झोंबतंच...
"ते काहीही असो...जर माझ्या जाण्याने...."
माझं वाक्य मध्येच तोडत ’प्रिय’ खेकसतो...
"तुझं ते दळण थांबव आधी...तू काही इतक्यात मरत नाहीस आणि असा बावळटासारखा प्रश्न पुढे कधी डोक्यात उपटला तर हे वाक्य लक्षात ठेवायचं...
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ll
अकस्मात तोही पुढे जात आहे ll
रामदास स्वामी नाव ऐकून आहेस का??"
"तू मला काय मूर्ख समजतोस का रे??"
"मला माहीत आहे तुला माहीतेय ते...पण नुसतं ठाऊक असून काय कामाचं...???त्यांचे हे ११ शब्द ध्यानात ठेवले असते तर इतका hopeless प्रश्न ’तू’ मला विचारलाच नसता...बोल.."मरे एक..""
आणि मग ’रमण नमन कर"च्या चालीवर माझ्याकडून हे वाक्यं वदवून घेण्याचा उपक्रम पार पाडला गेला..
’प्रिय’ची ही स्टाईल मला भारी आवडते...
’प्रिय’ दासबोध, ज्ञानेश्वरीमधले दाखले असे casually देतो...
त्यामुळे मी भारंभार वाक्यं वापरून त्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बहुधा एका वाक्यात किंवा कुठलातरी दाखला देऊनच संपतं..
मी किती तोंडाची वाफ़ दवडते??? ह्याचं percentage काढायला की काय कोण जाणे??जगन्नियंत्याने ’प्रिय’ची योजना करून ठेवली असावी असे मला नेहमी वाटते..
याही वेळेस माझ्या खूप तावातावाने वादावादी होण्याची अपेक्षा असलेल्या प्रश्नाचे तीनतेरा वाजलेले असतात..’प्रिय’च्या एका वाक्याने..
आता आमचे general बोलणे सुरु झालेले असते...
३ मिनीटांनी पुन्हा माझा प्रश्न येऊन ’प्रिय’ला टोचतो..
"ए सांग ना...मी गेल्यावर..."
पुढे काही विचारावे लागतच नाही..
फ़ोन कट झालेला असतो..

3 comments:

xetropulsar said...

अरे किती सेंटी मारताय. . . :)

आश्लेषा said...

मला वाटतं की हे मुळात कुठल्यातरी असुरक्षिततेच्या भावनेपोटी वाटत असतं.आणि ही भावना मुलींमध्ये जास्त असते.अर्थात हे general observation आहे.पण मुलांमध्ये अशी असुरक्षिततेची भावना फारशी बघायला मिळत नाही.i wonder what the reason behind it is.

Dk said...

Firun punha vachtana hi post jyaam aavdlee mhnun he comment baghshil n bghshil tarihi... Maran shaant hav! Paashmukt.

 
Designed by Lena