च्यक च्यक..च्यकच्यकाट!!

कुठलीतरी सुट्टी आणि प्रबोधनकारला लागणारा एखादा फ़ंडू नाटकाचा प्रयोग मी आणि आई सहसा चुकवत नाही..
त्यातून 'लव्हस्टोरी' या नव्या नाटकाचा प्रयोग आणि आम्हा दोघींची favorite मुक्ता बर्वे त्यात असल्यावर प्रयोग चुकवायचा काही चान्सच नव्हता...पण...
वसई ते बोरीवली हे अंतर पार करायचे म्हणजे पश्चिम रेल्वेचा प्रवास हा ’मस्ट’!!
हा प्रवास वसईहून करण्यापेक्षा वसई-पापडी-नायगाव रूटने केलेला कधीही चांगला म्हणून आम्ही ३-४०च्या दरम्यान नायगाव स्टेशन ला पोहोचलो..
नायगाव...
माझं सर्वात आवडतं स्टेशन...जिथे ना वर्दळ असते ना कलकलाट...भातुकलीच्या खेळात शोभून दिसेल असं स्टेशन...
गावातल्या एखाद्या नव्या नवरीला ’काय पाटलीणबाई’ म्हटल्यावर ती कशी लाजेल तसा नायगाव स्वत:ला ’स्टेशन’ म्हणवून घेताना लाजत असेल कदाचित...
गाडया नेहमीप्रमाणेच उशीराने धावत होत्या...म्हणजे आमचं time element चुकणार नव्हतं ..आम्हाला हवी असलेलीच बरयाच वेळापूर्वीची गाडी आम्हाला उशीराच्या कारणाने मिळणार होती..
आम्हावर उपकार करत असल्यासारखी ठुमकत ठुमकत गाडी आली एकदाची...
नेहमीप्रमाणेच ती माझ्याकडे बघत खट्याळ हसलीसुद्धा...ती आईकडे बघून पण हसली का???हे बघायला मी आईकडे साभिप्राय पाहिलं...आणि आईने मला ’चक्रम आहे पोरगी झालं..." चा उर्ध्व लागल्यासारखे डोळे फ़िरवून टिपीकल लुक दिला..
राज्य परिवाहन मंडळाची एस.टी मला मिशा फ़ेंदारून हसणारया ’प्रिय’सारखी वाटते..पण मी ते आईला सांगत नाही..
गाडी सुरु झाली...
तेवढ्यात पुलाच्या बाजूने एक बाई जीव खाऊन गाडी पकडायला धावत असलेली दिसली..
आज १ मे...आज तर कोणाला कामावर पण जायचे नसेल...मग ही बया भूतलावरची शेवटची गाडी असल्यासारखी स्प्रिंट का मारत्येय??? मला काही कळेचना..
मग इकडून तिकडून सगळीकडून डोकावणारया नानाविध शंकांना शूत!! करून हाकून लावलं आणि तिला 'DDLJ'च्या शाहरुखसारखा हात देऊन गाडीत चढवलं..
"आपली ढाप्पण सांभाळा आधी...हात देतेय!!"
आईची शेरेबाजी ऐकू आलीच पण मी तिकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले..
मी हात देऊन फ़ूटबोर्डवर चढवलेली ती गासंडी अजूनही भात्यासारखी फ़ुसफ़ुसत होती...
"शादी में जाना था.."
च्यामारी..मग लग्न काय हिचे होते धावत गाडी पकडून वेळेवर पोहोचायला???
"नेक्स्ट ट्रेन से चली जाती..जम्प करनेकी क्या जरूरत हय??"
माझं भयंकर फ़्रस्ट्रेट करणारं हिंदी मी शक्य तितक्या सुसह्य 'format'मध्ये वापरत विचारते...
ती गप्प...
तिलाही पटलं असावं बहुतेक..
ही मुंबईकरांच एकाय...
आलेली संधी आणि समोर उभे असलेली ट्रेन कधीच सोडत नाहीत..
आणि गम्मतीचा भाग म्हणजे घाईत असलेल्या सगळ्यांना नेहमी आपल्या समोरून सुटणारी ट्रेनच पकडायची असते..
तर...
मला उतरायचे होते बोरीवलीला आणि मी चढले विरूद्ध दिशेने..
त्यामुळे जसजसे स्टेशन जाईल तसं मी पुढे सरकून घेत होते..
केवळ ५ बाय १२ फ़ूटाच्या त्या कॉरीडॉरमध्ये आम्ही जवळपास ५० जणी जीव मुठीत धरून आणि १० इंच लांबीच्या फ़ूटबोर्डवर १० एक जणी जीव चिमटीत घेऊन उभ्या होत्या..
भयंकर गर्दी होती...
एकाचवेळी एवढी सगळी माणसे जातात तरी कुठे आणि मरायला मुंबईतली सगळी लग्नं शिंची आजच का असावीत??? हा विचार करता करता मी हात पकडायला केलेल्या कडयांवरच्या दहा एक हातांपैकी माझा हात कुठचा ते हात हलवून बघायचा प्रयत्न करत होते...
शेवटपर्यन्त काही कळलंच नाही...
कारण त्यावेळी माझं अनुकरण सगळ्याच जणी करत होत्या...
आता एवढ्या हलणारया हातांपैकी माझा हात शोधायचा म्हणजे..
त्या नादात माझे आधीच बारीक असलेले केस मागचीच्या नाकावर घासले गेले...तिकडून च्यक...
माझा चश्मा डोळ्याशी ४० अंशाचा कोन करून लोंबायला लागला तो नीट करू म्हटले तर माझं कोपर बाजूचीला लागलं...तिकडूनही च्यक...
मी शेवटी नादच सोडला...
तेवढ्यात दुसरया बाजूने खडया आवाजातले बंबैय्या हिंदी ऐकू आले..
आमच्या मातुश्रीच...शंकाच नाही...
तोफ़खाना सुरू झाला होता..
नंतर विचारले असता आई करवादली..."अगं..नुसता निसटता स्पर्श झाला तरी ती च्यक करत होती.आता कोणी तिचा विनयभंग करत होते का???लेडीज डब्बा तर होता.."
आता एवढी जहाल चिरफ़ाड माझी आईच करू जाणे..
पण चूक कोणाचीच नव्हती..
लेडीजचा सेकंड क्लासचा डब्बा म्हणजे असाच पालींचा च्यकच्यकाट असतो..
शेकडो लोकांचे उच्छवास डब्ब्यात भरलेले...कोणाची अखंड पिरपिर चालू आहे...कुणीकडे कोणाची तार स्वरात भांडण चालू आहेत..
अशा वातावरणात आपल्याही नकळत आपलीही चिडचिड सुरु होते..
डब्ब्यात हळदी-कुंकू, संक्रांत वगैरे कौतुकं सगळी डब्ब्याच्या आतल्या भागात चालतात...लवकरच्या स्टेशनला उतरायचे म्हणून दाटीवाटीने दारात उभे असलेल्यांचं जगच वेगळं..
थोडक्यात काय...ते सुपात असतात तर आम्ही जात्यात!!!
अशा कुबट प्रवासात सुखद आठवणी कुठल्या असायला??
असतात तर अशाच..
"नको ही बजबजपुरी!!"..असं वाटायला लावायल्या...
बाय द वे....
लालूंनी सकाळी ८-४५ चर्चगेट लोकलने प्रवास केलाय का???
मला वाटते त्याने बरेच प्रश्न सुटतील...
लालू सुखरूप चर्चगेटला उतरले तर मुंबईकरांचे...
नाही उतरले तर..
देशाचे!!

6 comments:

Jaswandi said...

hey mast lihilays!

mala ekdum mi mumbait astanachi 3 varsha athavali... train ne pravas, gardi, kalkal... tras hvayaycha pan titkich majja yayachi... vegalach jag asata te, ata sollidd miss karatye

Abhijit Bathe said...

नाटकाचं काय झालं?

Shraddha Bhowad said...

आनंद इंगळे, निखिल रत्नपारखी असल्यावर आणखी काय होणार???
नाटक as usual भारी होतं...
ते एक वेगळ पोस्ट होईल..
लिहीणार आहे त्यावर पण...

Nandan said...

आलेली संधी आणि समोर उभे असलेली ट्रेन कधीच सोडत नाहीत..
आणि गम्मतीचा भाग म्हणजे घाईत असलेल्या सगळ्यांना नेहमी आपल्या समोरून सुटणारी ट्रेनच पकडायची असते..
...Agadi! Baki Naigaon station baddalacha nireexaN best. Vasait engg college asalyane Sandwich khayala baryachada Naigon la utarayacho (3:40/3:56 pakdun :)), tyachi aaThavaN zali :)

Dk said...

hmmm mag sakaali lavkar mhnje bgh 6 la aani raatree usheera mhnjee 12 la pravaas karaaycha! baaki jaaswndi ne mhtly ki "gardee" vagaire (pule nee hee mhtly ki khara mumbaikar mumbait gardee aahe as mhntch naahe :D:D:D sahich aahe post!

baaki gadeecha aani maazaa paarsaa sambndh yet anaahii ha shivya maatr ekdam joraat I claas madhye!

Meghana Bhuskute said...

हे लिहिलं गेलं, तेव्हा मी कुठे होते?
मरो.
मलापण बाठेचाच प्रश्न विचारायचाय. नाटकाचं काय झालं?

 
Designed by Lena