नार्सिसस आणि न संपणारी प्रश्नावळ...!

फ़ार फ़ार वर्षापूर्वी ’नार्सिसस’ नावाचा एक खूप देखणा तरूण होता..
’एको’ नावाच्या प्रतिध्वनीच्या देवतेचे प्रेम झिडकारल्यामुळे ’नेमेसिस’ हया सूडाच्या दे्वतेने त्याला स्वत:च्या प्रतिबिंबवर प्रेम करायला लावलं...
तळ्यातल्या पाण्यातल्या आपल्या प्रतिबिंबावर प्रेम करत नार्सिसस झुरुन झुरुन मरण पावला..
तो मेल्यानंतर ते गोडया पाण्याचं तळं रडून रडून खारट झालं..
कोणीतरी त्याला विचारलं की तू नार्सिसस गेल्यामुळे रडत आहेस का?
त्यावर तळ्याने विचारलं..."कोण नार्सिसस???"
"इथे रोज एक तरूण यायचा...त्याच्या डोळ्यात मला माझं सौंदर्य दिसायचं...हल्ली तो येत नाही म्हणून मी दु:खात चूर आहे"

स्वत:वर प्रेम करणारं, एखाद्या गोष्टीकडे आपल्या दृष्टीकोनातून बघणारं तळं हे सर्व चराचरांचं प्रतिनिधीत्व करतं...
’स्व’, ’मी’, ’माझं’ अनादीअनंतकालापासून चालत आलेले असताना ’अहं’चा त्याग करा...’मी’ पणा सोडा हेच आपल्यावर का बिंबवलं जातं???
ज्या नार्सिससमुळे ’स्वत:वरच्या आत्यंतिक प्रेमाला’ ’नार्सिसिझम’ म्हटले जाते त्या नार्सिससची संभावना वेड्यात का केली गेली???
स्वत:वर प्रेम करणं आपल्याकडे एवढं निषिद्ध का मानलं गेलेय??
"सर्वी सर्व सुख / अहं तेचि दुःख " असे म्हणत ’अहं’ला ’कोपच्यात’ का घेतलं जातं???
’स्व’,’अहं’ इतका का वाईट असतो?
दुसरयासाठी त्याग करा...लोक डोक्यावर घेऊन नाचतील..
आपल्यासाठी जगा..पटत नाहीत त्या गोष्टींना ’नाही’ म्हणा...बघा कसे छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोसतील..
’मी’, ’माझे’ म्हणून जगायला ’सहजीवन’नामक कुठल्याही गोतावळ्यात जागा नसतेच का???
का त्याला तिलांजली देऊनच या झमेल्यात पडावं लागतं???
का एकापेक्षा जास्त टाळकी एकत्र नांदायला लागली की ’अहं’ व्हॉईड होतो?
’आपण’ ’आपल्याकरता’ करत स्वत:ला विसरणं अपेक्षित असतं???
आणि जेव्हा हे माझ्याकडून होणं अपेक्षित आहे तेव्हा ते समोरच्यालाही तेव्हढेच ऍप्लिकेबल असणार नाही का???
मग तरीही माणसं असमाधानी, दु:खी का असतात???
नो वंडर..समोरच्या माणसाचा उबग येत असेल इतकं सारं करत असताना...

दोघांच्या परस्परविरोधी गरजा किंवा तत्वं क्लॅश होतात तेव्हा कुणी माघार घ्यायची हे कोण ठरवतं???कुणी मागे हटायचं हा निर्णय कोण घेतो??
एखादा मागे हटलाच तर पुढेही त्यालाच माघार घ्यायला लागणार नाही कशावरून???
किंबहुना पुढे पुढे त्याच्याकडून तेच एक्स्पेक्ट केले जाणार नाही कशावरून???
कारण एक लीनियंट झाला की दुसरा डॉमिनंट होणार हा तर निसर्गनियमच आहे..
हे सगळं नैसर्गिकरित्या होत असेल, instincts ने होत असेल...तर एक्झॅक्टली कुठली भावना ठेवून होतं???
मागच्या वेळी हिनं काहीही न बोलता जमवून घेतलं तर आत्ता आपण घेऊयात असं???
आणि ते मनाविरुद्ध असेल तरी???
म्हणजे मागच्या वेळी मी काहीतरी मनाविरुद्ध केलं होतं तर याचा वचपा कधीतरी का होईना निघालाच पाहिजे...
मागची ऍडजस्टमेंट हातची ठेवायची..आणि हातचे मिळवत राहायचे..समोरच्याने त्याचं अकाऊंट बरोबरीत आणेपर्यंत..
आणि अथपासून इतिपर्यन्त आपण तडजोडी करत राहिलो तर...

म्हणजे हे तर मर्जिनाच्या गोष्टीसारखं झालं..
तो थेरडा शिंपी दारावर फ़ुली मारून ठेवतो तेव्हा त्याला मॅड करण्याकरता मर्जिना सगळ्याच दारावर फ़ुल्ल्या मारून ठेवते..
आत्यंतिक प्रेमापायी एखाद्या गोष्टीला मुरड घालून बघा...की मग ’अजून काय नको’ ची जंत्री तयार असेल..
हे थोडयाफ़ार फ़रकाने सगळ्याच नात्यांमध्ये घडतं नाही??

लहानपणी ’डब्बा ऐसपैस’ खेळताना सगळे माझ्यावर राज्य द्यायचे...
मी सर्वात लहान...त्यातून जाडजूड..त्यामुळे मला काही कुणाला आऊट करता यायचंच नाही...मग खेळ खूप वेळ सुरु राहायचा...
मी जीव खाऊन पळत राहायचे आणि सगळे त्या दृश्याला enjoy करत असायचे...!
कुणाला राज्य घ्यायचा कंटाळा आला की दिलेच मला राज्य...
मला त्या सगळ्यांबरोबर राहायला आवडायचं म्हणून मनाविरुद्ध मी ही राज्य घ्यायचे...
सतत राज्य घ्यायचा मलाही कंटाळा आला एकेदिवशी...मी राज्य घ्यायला ’ना’ म्हटले..
तेव्हा त्यांनी मला ’लिंबू-टिंबू’ म्हणून बाहेर बसवले...
पुन्हा खेळात घेतलेच नाही...
.
.
.
नाती-गोती, संसार, सहजीवन हे काहीसं मला या ’डब्बा ऐसपैस’ सारखंच वाटतं...
कायम आपल्याला राज्य घ्यायला लागतं...समोरच्याने एखादी गोष्ट ’कर..!’ म्हटली की त्यात आपलं भलंच आहे किंवा त्यातून काही चंगलंच निष्पन्न होणार आहे, आपल्याला ते आवडून घ्यावंच लागेल अशी मनाची समजूत घालून ती करावी लागते..
सहजीवनाचा डोलारा असा कोणातरी एकाच्या इच्छे-गरजेच्या मढ्यावर उभा असतो???
कोणातरी एकाचा कोंडमारा ही सहजीवनाची नांदी असते???

एखाद्याचा स्वभाव एखाद्याला आवडला तर त्याचं खाताना आवाज करणं, बिनदिक्कत दुसरयाचे टॉवेल वापरणं...किंवा एखादीचा बोलताना सतत मीच कशी खरी हे जतवत राहणं, शब्दाशब्दाला गैरसमज करून घेणं हे समोरच्या त्याने/तिने अंगवळणी पाडून घ्यायचं...की हे चूकच आहे त्याला सांगून त्याला/तिला बदलायला लावायचं?
बरं...समोरचे तो/ती ज्या गोष्टींना चूक म्हणतात त्या गोष्टी त्या/तिच्यासाठी ’चूक’ की ’बरोबर’ या कॅटॅगिरीमध्ये पण न बसण्याइतकी नालायक असतील तर???
त्यांच्या दृष्टीने हे ’चलता है’ सदरात मोडत असेल आणि स्वत:च्या या गोष्टी वाईट आहेत हेच मुळात त्यांना पटत नसेल तर??
आपल्या या गोष्टींनी दुसरयाला असह्य त्रास होतो हे त्यांच्या खिजगणतीतही नसेल तर???
ह्या छोट्या गोष्टी असतीलही कदाचित पण त्याने बिलीव्ह मी.. खूप फ़रक पडतो...
प्रत्येक माणसाचे आपण कसे याबद्दलचे ठाम समज असतातच जे दुसरयाच्या दृष्टीने चूक असू शकतात..
मग असेच राहायचे की याला बदलवायचे यावरचा अडेलतट्टूपणा कायम राहिला तर दोघे एकत्र काय राहणार..घंटा???

कोणाचं काय चूक, काय बरोबर हेच बोंबलायला कळत नाही..
कळलं तर समोरच्याला कळतंय का नाही याची कल्पना नाही..
नाही कळलं तर त्याच्यापर्यन्त पोहोचवावं कसं???हे सुचत नाही...
कळणार कसं??
प्रत्येकजण आपापल्या परीने जस्टीफ़ाईड असतो की...’नार्सिसस’च्या गोष्टीतल्या तळ्यासारखा..
विभक्त का एकत्रित कुटुंब??अरेंज का लव्ह मॅरेज???प्लेटॉनिक का लव्ह ऍट फ़र्स्ट साईट??का लिव्ह-इन???ह्या फ़ार दूरच्या गोष्टी आहेत राव..
नंतर शिमगाच होणार असतो..
त्यापेक्षा आपल्यापुरता एक सोल्युशन शोधून काढावं आणी गप्प बसावं...
कोणाबरोबर राहणंच नको...!!
 
Designed by Lena