मी..स्वप्नं आणि..ऑडीटी..!

"आज मला एक स्वप्न पडलं..त्यात ना..."
मला बाई दुसरयांची स्वप्नं ऐकायची जाम हौस..
आणि माझी ही किर्ती दिगंतात पसरली असल्यामुळे कुणाला काही विचित्र स्वप्न पडलं की तो "माऊ...You gotta hear this man!" म्हणत माझ्याकडे आलाच पाहिजे..
सगळ्यांचे पॅटर्न्स बहुधा सारखेच...
स्वप्नात कोणी मरतं तर कोणाला कोणीतरी दिसतो..कोणाचे विवाहबाह्य संबंध होतात (स्वप्नांमध्ये बरं का!)...तर कोणाला धनलाभ होतो...
तोचतोचपणा..
पण मला जशी स्वप्नं पडतात किंवा मी ज्या प्रकारची स्वप्नं पाहते तशी पाहणारं मला आजतागायत कोणीही भेटलेलं नाही..
आता ’प्रिय’चे उदाहरण घेऊ..
माझं अकलेचं डिपार्टमेंट कुठेतरी डागडुजीला दिलंय आणि ते माझ्यावतीने लीजवर दिल्यासारखा चालवतोय अशा आविर्भावात तो वावरतो..
त्यामुळे तो माझं कुठलंही बोलणं मनावर घेत नाही..जे घ्यायला हवं ते सुद्धा!
कधीकधी फ़ार वाटतं की आमच्यामधले हे वयाचे, प्रगल्भतेचे अंतर पार करून मी झटक्यात त्याच्या बरोबरीने यावं म्हणजे ऍटलीस्ट तो मला सिरीयसली तरी घेईल..
मी ३ वर्षांनी मोठी आणि (होपफ़ुली) मॅच्युअर होईन तेव्हा तोही तेवढ्याच चढत्या भाजणीत प्रगल्भ झालेला असणार...त्यामुळे ही परिस्थिती बदलणं संभव आहे असे मला वाटत नाही...
पण..
स्वप्नांमध्ये हे सहज शक्य असतं..
मी चेहरा लांब करून काहीतरी निर्वाणीचे बोलतेय आणि ’प्रिय’ ते अजिबात न हसता गंंभीरपणे ऐकून घेतोय..
मी त्याला ’हुंब कुठला’ म्हणते आणि मला जीव काढील असा चिमटा बसत नाही...
माझे जे काही वाईल्ड इमॅजिनेशन असेल..म्हणजे कानाची पाळी दुसरया कोणीतरी चावल्यानंतर नक्की काय होते?..वगैरे वगैरे.. ते ’प्रिय’च्या दाट भुवयांच्या वरच्या आणि खालच्या (डोळे आणि आठया) कुठल्याच गोष्टीला न जुमानता सांगते आणि त्यावर त्याचे कुचकट "कुठे शिकलात हे आपण?" ऐकायला मिळत नाही..
आहाहाहा...काय पण विशफ़ुल थिंकींग!
वास्तवात या गोष्टी किती अशक्यप्राय आहेत याची मला पुरेपूर कल्पना आहे..त्यामुळे माझ्या या इच्छा मी माझ्या स्वप्नांमध्ये पुरया करून घेते..
तर ही झाली बेसिक ओळख...
माझ्या स्वप्नांची महती इथवरच नाही संपत..
माझ्या स्वप्नांची वैशिष्ट्ये खालीलप्रकारे:
(१) मला स्वप्ने नुसतीच पडत नाहीत तर मला ती ’पाडताही’ येतात..
(२) रात्री ज्या विषयाचा विचार करत झोपेन त्या विषयाची स्वप्ने मला हटकून पडतात..
(३) सकाळी उठल्यानंतर मला ती तंतोतंत आठवतात..
(४) माझी स्वप्ने ३-D आणि इस्टमन-कलरमध्ये असतात..
(५) माझ्या स्वप्नांमध्ये परदेशातलं निसर्गसौंदर्य, सीन-सीनरी, कॉस्च्युम्स, साऊंड इफ़ेस्ट्स खच्चून भरलेले असतात..म्हणजे नुसतंच ब्लॅक बॅकग्राऊंडवर व्हाईट स्वप्न पडतंय (किंवा व्हाईटवर ब्लॅक), घासलेल्या रेकॉर्डसारखा किंवा बिघडलेल्या रेडीयो सारखा हिणकस आवाज येतोय असं मुळीच होत नाही..
(६) आता पडत असलेल्या स्वप्नात मी झोपलेले असून त्या स्वप्नातल्या झोपेत मला आणखी एक स्वप्न पडते आहे...मग त्या स्वप्नात आणखी एक स्वप्न ...अशी स्वप्नांची गुंतागुंत असूनही प्रत्येक स्वप्नात मी नक्की काय केलं हे मला नीट सांगता येतं...
वगैरे वगैरे वगैरे...
मला दिवसा कधीच झोप लागत नाही त्यामुळे रात्रीचा तो ७ तास झोपेचा काळ अगदी शो-टाईम असतो..
तुकडयातुकडयाने दिसणारया या स्वप्नांमध्ये मी आय.ए.एस ऑफ़िसर होऊन कुठेसं चांगलं काम करतेय..लोकं मला दुवा देतायेत..अशा आशयाचं स्वप्न हटकून असतं...जे आज ना उद्या सत्यात येणारच आहे..पण इतर तुकडयांमध्ये अतर्क्य तरीही मजेदार असं बरंच काही दिसतं..
म्हणजे मी अशी मांडा ठोकून, दूधात सर्फ़ एक्सेल घालून ढवळत बसलेय...त्यातून एक मोठा बुडबुडा निघतोय..मी त्या बुडबुडयात बसून मी थेट पुण्यात येऊन पोहोचते..सदाशिव पेठेतल्या ’प्रिय’च्या घरावर त्या बुडबुडयाला ब्रेक मारून ’प्रिय’ला फ़ोन लावते...
आणि माझ्याशी बोलताना तो एक्झॅक्टली किती वेळा डोळे कपाळात नेतो हे मोजून काढते..
???
कशाचाही कशाला संबंध नसतो आणि मी अचानक उडायला बिडायला लागून पुण्याला जाऊन पोहोचते..
किंवा मी गरूडाच्या नाकाला मन लावून सँड-पेपर घासतेय..आणि घासून झाल्यावर ’मी कसली जबरदस्त आहे’ अशा आविर्भावात मान वाकडी करकरून पाहतेय..
किंवा चिवित्रतेचा परमावधी... मागं पिसं लावलेल्या कोंबडीसारखा ’प्रिय’पाय उडवत नाचतोय..आणि त्यावर मी लाहीसारखी उडत खिदळतेय..
?
?
.
.
माझी स्वप्नं म्हणजे ’वसुधैव कुटुंबकम’चा आदर्श नमुना आहेत..ज्यांना कशाचे म्हणता वावडे नाही..
माझ्या स्वप्नांमध्ये बिल्डींगमध्ये शेपटी फ़िस्कारत फ़िरणारया काशीबाई, अभिषेक बच्चन, ’फ़ाईंडींग नेमो’ मधला नेमो, टॉम हँक्स, कुबड्या खवीस, किरण बेदी, सिंबा, मॉली आणि सॅम, तात्या विंचू, बालभारतीमधले अजबराव, श्यामची आई ...सगळे मिळून अगदी गुण्यागोविंदाने नांदत असतात..
म्हणजे स्वप्नातल्या स्टोरीपेक्षा साईड कास्टींग तगडी...
यातली नॉन-मराठी, अभारतीय पात्रं माझ्या स्वप्नांमध्ये एकदम फ़र्ड मराठी बोलतात..
माझ्या स्वप्नांमध्ये पाहुणे मंडळी सुद्धा चक्कर मारून जातात..म्हनजे कधीमधी रजनीकांत तर कधी टी.एन. शेषन...कधी झुंपा लाहिरी तर कधी गौरी देशपांडे...
नेमक्या सणाच्या दिवशीच बक्षिसीसाठी कचरा काढायचे केवळ नाटक करणारा बिल्डींगमधला कचरेवाला सुद्धा कधीमधी दिसतो..
कधीकधी रंगीत फ़ुलाफ़ुलांचा फ़्रॉक घातलेली तान्हुली ’प्रिय’च्या पोटावर पालथी पडून तोंडाने वेगवेगळे आवाज काढताना दिसते तर कधी तिच्याशी लाडेलाडे गिबरीश बोलणारा ’प्रिय’ दिसतो..
माझ्या स्वप्नांमध्ये माझे तिथे काहीही चाललेले असो मॉली आणि सॅमनी "I love you!","Ditto!"चं पालुपद लावलेलं असतं तर नीमोने काशीबाई आणि कुबडया खवीस बरोबर पकडापकडीचा डाव मांडलेला असतो..किरण बेदी तात्या विंचूला झाड-झाड झाडत असतात तर काशीबाई आणि सिंबा दोघेही मिळून अजबरावांवर उचकलेले असतात..
थोडक्यात सगळ्यांनी मिळून माझ्या स्वप्नामध्ये माज घातलेला असतो...
.
.
.
३ वर्षांपूर्वी माझ्या स्वप्नांना ’इतकी’ डायमेन्शन्स नव्हती..
इंजिनीअरींगच्या वर्षांमध्ये तर मी स्वप्नात माझी राहून गेलेली असाईनमेंट लिहून काढायचे आणि सकाळी उठून तिला तशीच अर्धवट पाहून दुप्पट थकून जायचे..
स्वप्नं तशीच रंगीत ...पण सगळी डल..
आता’ घोस्ट’मधल्या मॉलीसारखी मीही रात्र रात्र जागून( म्हणजे स्वप्नातल्या रात्रीत जागून) चित्रविचित्र आकाराची भांडी बनवते...’घोस्ट’मधल्या भांडी बनवण्याच्या प्रसंगानंतरच्या आफ़्टर-इफ़ेक्ट्सकट!
माझ्या स्वप्नांमध्ये जे रंग आहेत किंवा थोडंफ़ार वैविध्य आहे..फ़्रेशनेस आहे तो ’प्रिय’मुळे आहे...
मला ’ट्रॅजिक’ स्वप्नं कधीही पडत नाहीत..ते केवळ मी सदैव आनंदी असल्यामुळेच हे मी त्या स्वप्नांमध्येही विसरत नाही...
त्यामुळे माझी झोप ही ’प्रिय’ला ’चितळे’च्या काजू-कतलीचा १ किलोचा डब्बा देऊनच संपते...दररोज..
आणि या ’अशा’ स्वप्नांमुळे मी मलाच ऑड वाटायला लागते...
मला भेटलेल्या १० माणसांपैकी किमान दोघांना माझ्यासारखी स्वप्नं पडत असती तर एकवेळ ठिक होतं..
पण आजपावेतो कोणीही नाही भेटलेलं असं..
असो..माझं जगच छोटं असलं पाहिजे..
मग मला कुठे तरी वाचलेलं "मनात का आले, स्वैर स्वप्न काही..चित्त कोठे जाई-भटकाया" अशा आशयाचं काहीसं आठवतं..
बेदम हसायलाच येतं..

बडी देर भई..!

परवा आनंदी आणि सुब्रतोचा ब्रेक-अप झाला...ऑफ़ीशियली!!
२ वर्षापासूनचं लळत-लोंबत पडलेलं प्रकरण संपलं एकदाचं..आणि मला जी पाचर ठोकली गेली होती ती ही निघाली एकदाची!!
बेसिकली तिच्याहून परस्पर भिन्न अशा सुब्रतोमध्ये तिला काय आवडले कुणास ठाऊक???
म्हणजे त्याचे वाडगाभर भात आणि बरोबर माछेर जॉल फ़न्ना करणारे तोंड पाहून कोणाला काही रोमॅंटीक वाटण्याची सुतराम शक्यता नाही असे मला ठामपणे वाटायचे...पण या बयेला ते क्युट वाटले..
पाच पाच वाट्या दह्या खात ’मोई मिष्टी दोही’ आळवताना त्याचे डोळे लुकलुकायचे ते आवडायचे म्हणे तिला...मी म्हटले घंटा...!
आणखी काय बोलणार???
वेडाचार चालला होता दोन वर्षे..
सुब्रतो, मी, आनंदी आणि विशू ही आमची चौकडी बंगाली वर्गांमधली...
सुब्रतो आम्हाला बंगाली शिकवायला होता.
तसा तो साधारणच होता..टिपीकल बंगाली!!!
वंग पृथांनी...आयांनी..मावशांनी अतिशय लाडावून ठेवलेला पुरुष...ढेरी बाहेर आलेला..
पण त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाशी अतिशय विसंगत होते त्याचे डोळे..
काळेभोर...निर्व्याज तरीही कशाचा ठाव न लागू देणारे...बरंच काही होतं त्या डोळ्यांमध्ये..
गुरुदेवांच्या कविता त्याला मुखोद्गत होत्या...त्या बोलून दाखवताना त्याचे डोळे असे काही लक्खन तेजाळून उठायचे..
आनंदीला तो आनोंदी म्हणायचा...
विशू जाम वैतागायचा..म्हणायचा..."फ़ोफ़्शा...आणखी एकदा म्हणत तिला आनोंदी...नाही चार-पाच बुक्क्यांची नोंद तुझ्या दोंदीवर केली तर बघ.."
त्यावेळी हसून गुळी व्हायची..तो ही विशूच्या शालजोडीवर काही न कळून पोट गदगदवून हसायचा.
आमच्यात पहिला ताण आला ते आनंदीने ती सुब्रतोच्या प्रेमात पडलीये हे आमच्याकडे जाहीर केलं तेव्हापासून..आम्ही मुळासकट हादरलो...
कुठे आनंदी आणि कुठे सुब्रतो...दोन टोकाची माणसं..
आनंदीसारखी प्रगल्भ आणि स्मार्ट मुलगी गीतांजली पाठ असणं आणि काळेभोर डोळे एवढी पुंजी असलेल्या माणसाच्या प्रेमात पडू शकते हा एक नवीनच साक्षात्कार आम्हाला झाला..
ऑफ़ ऑल द पीपल इन द वर्ल्ड...सुब्रतो???
काय म्हणणार??
आता नातं कधीतरी तुटणारच आहे म्हणून जीव लावायचाच नाही ही लॉजिक कुठल्या हजामाचं आहे??
कुठल्याच हजामाचं नाही...कारण ते सुब्रतोचं मत होतं....
त्याचा म्हणे अशा नात्यांवर विश्वास नव्ह्ता..कुठलंही नातं काहीतरी मोटीव्हनेच जोडलेलं असतं असा त्याचा ठाम विश्वास होता..आणि या कार्टीला तेच ’तीव्र असे काही जीवघेणे’ वाटलं...
ती आपली त्याच्यात वेडीवाकडी गुंतत गेली..
मी बदलायला लावेन त्याला...असं आम्हाला ठणकाऊन सांगत!
वर्षानुवर्षे मनाशी धरून ठेवलेले समज असे थोडीच ना दूर करता येतात वेडे??
म्हटलं ठिक आहे..
सुब्रतो आणि आनंदीचं काही जमण्यासारखं नाही हे आम्हाला आमच्या पहिल्या मीट मध्येच कळले..
’कोबे सिझलर्स’ मध्ये सुब्रतोने पूर्ण टेबलवर सांडवलेलं उष्टं...तोंडाने येणारा मच्याक मच्याक आवाज..तोंडातला पुरता घास न संपवता तोंडातली शितं उडवत बोलणारा सुब्रतो जाम गिळगिळीत वाटला होता...टिप-टॉप महाराणीसारख्या राहणारया आनंदीपुढे तर फ़ारच...
पण सुब्रतो मुळे ओशाळून येवढुश्शी झालेली आनंदी आम्हाला बिलकुल ओळखीची नव्हती...
हे तिनं कसंतरी पचवून घेतलं असावं..
तिला त्याच्यात नेमकं काय आवडलं हेच तिला डिफ़ाईन करता येत नसावं असं बरयाच वेळा वाटायचं..
तिला एका इंपल्समध्ये काहीतरी आवडून गेलं असावं कदाचित...पण ते ’काहीतरी’ नंतर तिला कधीच सापडलं नाही..
तिने ते शोधायचा खूप प्रयत्न केला...नंतर सरधोपट मार्ग स्वीकारला..
रोमॅंटीक बोलणं तर सोडाच त्याला साधं आनंदी खुलेल असंही बोलता यायचं नाही..
आता असतात अशी माणसं...त्यात काही गैर नाही..पण नेमका तसाच मनुष्य अतिशय रसिक, रोमॅंटीक अशा आनंदीला मिळावा???अह...तो तिने पसंत करावा???
त्याला कधी फ़रक पडायचाच नव्हता पण तिचं चुरमडत जाणं आम्ही दिवसांगणिक पाहत होतो...तिचा आऊट झालेला चेहरा बघून कधी कधी माझं तोंड शिवशिवायचं..पोटात तुटायचं..पण विशूने नेहमी अडवून धरलं..."शी शूड लर्न हर ओन लेसन.."
"मी असाच आहे तुला माहीत होतं..""
"मी नव्हतं सांगीतलं माझ्यावर प्रेम कर म्हणून..आय वॉर्नड यू बीफ़ोर"
"मला एकटं रहायची सवय झालीये आनंदी...माझी मनाची तयारी तीच आहे...व्हाय डू यू वेस्ट युअर टाईम ऍंड माईन टू?"
अशा प्रकारची वाक्यं त्याच्या बोलण्यात वारंवार यायला लागली.
तिला त्याच्यात जे काही आवडले त्यासाठी तिने मनापासून सर्वकाही केले..शेवटी ती एक मनस्वी मुलगी होती...
पण परतून त्याच्याकडून काहीच आले नाही तेव्हा मात्र ती शहाणी झाली..
दोन वर्षाच्या दु:स्वप्नातून एकदाची पडली बाहेर...तिच्याबरोबर मी पण!
आनंदीसारख्या बरयाच मुली असतात ज्या इंपल्सवर जगतात..त्या इंपल्सशी इमान राखत आयुष्यभर झगडत राहतात...त्यांची अर्धी शक्ती जाते झगडण्यात आणि अर्धी स्वत:ला वेडं होण्यापासून वाचवण्यात...
आनंदीसारख्या फ़ार कमी नशिबवान मुली असतात ज्यांना ह्या प्रकारात राम नाही हे तुलनेत फ़ार लवकर कळतं..
मलाही कधीकधी असं वाटतं की हे इंपल्सवर जगणं बिगणं हा शुद्ध येड**पणा आहे...
"मला इंपल्सवर जगणारी माणसं आवडतात" माय बट्ट...!
असं बोलणारा मनुष्य केवळ व.पुं.च्या कथेत भेटतो...आणि हे किती पुस्तकी आहे हे प्रकर्षाने तेव्हाच जाणवतं..
कारण जेव्हा आपल्यासमोर आनंदीसारखं, स्वत:सारखं जितंजागतं उदाहरण असतं तेव्हा ह्या गोष्टी हवा वाटतात..
"मला वाटलं ते मी केलं...मला त्याचे रिग्रेट्स नाहीत...उद्या मी मनाविरुद्ध जगले असं नको वाटायला" हा डायलॉग ’जब वी मेट’ मध्ये कसला भारी वाटतो ना?
रील लाईफ़ सोडून रियल मध्ये आलं की oh please...give me a break!
स्वत:ला सतत तपासत राहिलं पाहिजे...निर्णय जोखून पाहिले पाहिजेत..
क्षणिक उर्मीत मोठे निर्णय घ्यावेसे वाटले..किती अवास्तव आहेत याचा विचार केला पाहिजे..
नाहीतर..
देर भई..बडी देर भई..!
 
Designed by Lena