कालिब

आपण एखादं चित्र कसं बघतो?
कोणी चित्रं कशी बघावीत?
मी चित्र कशी बघते?
चित्र बघताना आपण वाचताना करतो तशी चित्राच्या डाव्या कोपरयाकडून सुरुवात करते. मग चित्राच्या फ़्रेमवरुन माझी नजर मजेत फ़िरुन येते. चित्राचा आकार मनात भरला की पुन्हा डावा कोपरा पकडते. मग चित्राचा अवकाश, चित्रातली रंगसंगती, एकंदर पोत डोळ्यांनीच (क्वचित हात लावून) चाचपते. मग त्यातल्या रेषा, कोन, भौमितिक आकार..
एव्हढं झालं की त्या दृश्य चित्राचा आणि माझा संबंध संपतो आणि सुरु होतो माझा आणि माझ्या डोक्यात उमटलेल्या चित्राचा संवाद.
मग नंतर चित्रकार काय सांगू पाहतोय? काय लपवतोय? त्याला जे सांगायचेय तेच मला कळलंय का? जर असं नसेल तर त्याला काय सांगायचं असेल बरं? इत्यादी प्रश्नांचा काथ्याकूट.
पण समजा, माझी चित्र बघायची सवयीची पद्धत सोडून मी भस्सकन चित्राच्या मध्यभागीच नजर खुपसली तर काय होईल?
चित्राच्या कडेकडेने प्रवास करून मध्यभागी येण्यापेक्षा मी मध्यभागापाशी सुरुवात करुन कॉन्सेंट्रीक सर्कल्स मध्ये चित्र बघत गेले तर कसं? किंवा वरुन खाली चित्र बघत येंण्यापेक्षा खालून वर बघत गेले तर?
दुसरया पद्धतींनी बघितल्यावर उमटलेलं चित्र पहिल्या पद्धतीने बघितल्यावर डोक्यात उमटलेल्या चित्रापेक्षा वेगळं असेल?
छे!
दुसरया पद्धतीने मला पहिल्या पद्धतीने जेव्हढं कळलं तेव्हढं चित्र कळेल?
न कळायला काय झालं? चित्रातले इथले तिथले तपशील एकत्र करुन ते डोक्यात सुसंगत जुळवायला लागतील एव्हढंच.
मग अनेक पद्धतींनी चित्र पाहिल्यावरही डोक्यात उमटणारं चित्र एकच असेल तर मी तीच पद्धत का वापरते?
सवयीचा भाग- कदाचित?
किंवा सेफ़ प्ले.
तसंच लिखाणाचं पण असतं..नाही?
तुम्ही विषय घेऊन हेतुपुरस्पर लिहा किंवा मनात येईल ते काडीचाही विधिनिषेध न बाळगता धडाधड लिहीत सुटा-तुम्ही समोरच्यापर्यंत पोहोचायचं तसंच पोहोचता.
मग विषयाचे बंधन तरी कशाला बाळगा?
म्हणून कालिब.

जसं हरिदास म्हणतो,"वैचारीक सुसंगतीसारखी कंटाळवाणी गोष्ट नाही. आपण तोच तोच विचार केला तर तेच तेच करत राहू"
पचायला कठीण फ़ंडा आहे पण मला हरिदास आवडत असल्याने त्याच फ़ंडे प्लंजर मारुन का होईना मी गळ्याखाली उतरवण्याचा प्रयत्न करते.
च्यायला.
मला आवडणारया सर्व पात्रांची नावं चार अक्षरी का असावीत?
हरिदास
विश्वनाथ
भगीरथ
सॉलोमन
सॅटियागो
जगदीश
तीर्थकर
अकिलीज
.
.
.
नाही.
पण असंच काही नाही.
मला तीन अक्षरी नावं असलेली पात्रंही आवडतात.
दयाल
अर्णव
विशाल
रायन
दिमित्री
ऍलन
माधव
.
.
.
आता हे अति होतंय!
मला आवडणारया काही पात्रांची नावं दोन अक्षरी सुद्धा आहेत.
विसू
बापू
गणू
हॅरी
रॉन
डॉबी
पण यातल्या विसू, बापू, गणू चं नाव गणपती, विश्वेश अशी तीन-चार अक्षरीसुद्धा असू शकतील.
आवरा आता!

मी गेली चार वर्ष डायरी लिहीतेय (रोजनिशी नाही!). म्हणजे लक्षात ठेवावं असं काही घडलं, कशाच्यातरी अनुषंगाने काही्तरी ग्रेट वाचण्यात आलं तर ते तारीखवार टिपून ठेवते.
मागच्या आठवड्यात गम्मत म्हणून त्या चाळत होते.
कधीतरी कुठंतरी वाचण्यात आलं असेल की ’सॅम्युअल पेपिस’ सांकेतिक लिपीत डायरी लिहायचा.
झाsssलं.
मी उत्साहात तीन-चार पानं अगम्य लिपीत लिहून काढलेली दिसतायेत. पण त्या कोडची की कुठे लिहून ठेवलिये हे आता आठवत नाहीये. उत्साहात ती पण सांकेतिक ठिकाणी लिहून ठेवलेली नसली म्हणजे मिळवलं.
असंच मजेत वाचताना मी एका नोंदीपाशी थबकले.

२०-०१-२००६


"प्रत्येक नात्याचा अर्थ लावू पाहू नये. जग फ़क्त शरीरसंबंधांनी, चालीरितींनी जोडलेली नाती जाणतं. जसं आई, वडील, पती. पण काही नाती केवळ जाणिवांची असतात, मनांची असतात. अशा नात्यांना जगाने नाव दिलेलं नाही. ती केवळ मनानेच ओळखायची. असूनही नसणारी , नसूनही असणारी! या नात्याचे कितीही पापुद्रे काढून गाभ्यापर्यंत जाऊ पाहिलं तरी तो गाभा तुला गवसणार नाही. कळतंय का तुला? कदाचित सूर्याला पाहून फ़ुलणारया सूर्यफ़ुलालाच तो अर्थ कळेल. जे केवळ फ़ुलणं जाणतं आणि फ़ुलणं जपतं"

Gosh!
हे वाक्य ’लिहून’ काढण्याइतपत मी भाबडी होते? त्यावेळी असं कुठलं पापुद्रे काढावंसं वाटणारं नातं ON होतं?
ओह येस्स!
आपल्या प्रोफ़ेसरच्या प्रेमात पडायचा गाढवपणा बरयाच कॉलेजकन्यका करतात.
मी ही केला होता.
हे पापुद्रे, सूर्यफ़ुलं त्यातूनच आलीयेत.
पण मग माझ्या लक्षात येतं की ही आठवण, याच्याशी निगडीत प्रसंग आपल्या आठवणींमध्ये अजूनही तपशिलवार जिवंत आहेत. गोठवलेले आहेत. कदाचित मरेपर्यंत माझी सोबत करणार आहेत.
मग डायरीतल्या त्या पानाची आवश्यकता संपते.
टर्र र्र र्र..
ते पान टरकाऊन मी त्याचं रॉकेट करते. बसल्या जागेवरून बाहेर भिरकावते.
भेंssडी..समोरच्या गुलमोहराच्या बेचक्यात जाऊन अडकलं.
त्या ’अडकेश’ ला पाहून ’माझ्या डायरीचं भूत’ असं पोस्टचं फ़ंडू टायटल डोक्यात येतं आणि मी वेळ न दवडता ते लिहून काढते.
डायरीतल्या अशा बरयाच पानांची गरज आता मला नाही भासणार.

अ श क्य पा ऊ स..
आणि एव्हढा बदाबद कोसळूनही आकाश अजून पोटात पाऊस वाढवतंच आहे.
बेचक्यात अडकलेल्या त्या पानाचा पार लगदा होऊन गेलाय.
गेल्या महिन्यात आमच्या सोसायटीच्या हरामखोरांनी कापून काढलेल्या सुरुच्या झाडाची दुखरी, बोडकी खोडं ओळीने उभी आहेत. त्यातल्या सर्वात जवळच्या बुडख्यातला चकचकीत लालसर रंग अजून नाही गेलेला. म्हणजे अजून तग धरून आहे बेटं.
येतील.
यांनाही धुमारे येतील.

आषाढालाss पाणकळाss
सृष्टी लाssवssण्याssचा मळा
दु:ख भिर्कावूssन शब्द
येती माssहेरपणाला


शब्दांना सासुरवास?? I know what you mean.
मला हल्ली या गाण्याने पिसं लागलीयेत.
ळाss वर तब्येतीत ढुम्म करुन सम दिली तर एकमेकांच्या मानेत मान खुपसून बसलेल्या कबुतरांचं जोडपं फ़डफ़डफ़डफ़ड करत निघून गेलं.
रूटीनच्या बाहेर काढून कोणाला काही करायला लावलं की दिन अच्छा जाता हय म्हणे!
आता जाईल.

हल्ली मला वारंवार एकच स्वप्न पडतं.
मी एका लांबलचक बोगद्यातून चाललिये.रादर तरंगतेय. अर्ध्यात आल्यानंतर बोगदा दोन्ही बाजूंनी बंद होतो. आणि कोणीतरी घुसळून काढल्यासारखा अंधार खदखदायला लागतो. आणि जेलीसारखा थबथबत माझ्या अंगावर पडून मला वाळवीसारखा खाऊन टाकतो..
मी रोज खच्चून बोंबलत जागी होते.
सॅमी जेन्कीन्स सारखी माझीही त्या त्याच अनुभवाला तीच तीच रिऍक्शन का असते?
अनुभव (मग तो स्वप्नात का असेना!) जुना झाल्यावर रिऍक्शनची तीव्रता पण कमी कमी होत जाणे अपेक्षित आहे...तरी?
मला वाटतं, माझ्या स्वप्नात मला डिमेंशिया झालेला असावा.

कधीकधी मला खूप थ्रिलिंग गोष्टी कराव्याशा वाटतात.
म्हणजे फ़ेक नावाने एक फ़ेक ब्लॉग काढावा. त्यावर लोकांना उचकवणारं काय काय लिहावं. अनॉनिमस कमेंट्स ऑन ठेवून पब्लिकला मला शिव्या घालायला प्रवृत्त करावं. मग मी उलटून त्यांना दुप्पट शिव्या घालाव्यात. मग त्या तुंबळ युद्धाच्या कहाण्या सगळीकडे पसरून ब्लॉग-हिट्स वाढाव्यात वगैरे वगैरे.
पण मी तसं करत नाही.
मला ते झेपणारच नाही.
एकतर मी अजिबात खोटं बोलत नाही.
म्हणजे खोटं बोलावं की बोलू नये असा चॉईस असतो असं नाही पण मी बाय चॉईस सुद्धा खरंच बोलते.
पाहायला तर बनवाबनवी करणारे मॅनिप्युलेशनचे बाप पाहिलेले आहेत. पण त्यांची भंबेरी, कोलांट्याउडया पाहून आपण हरिश्चंद्राची कितवीतरी अवलाद आहोत याचं बरंच वाटतं.
असो.

एका देवळाच्या बाहेर लिहीलेलं असतं,
"आपण देवावर विश्वास का ठेवला पाहिजे?"
"कारण जगात असेही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं गूगल देऊ शकत नाही"
हा हा हा!
माझी एक मैत्रीण अशीच गूगलभक्त आहे.
"I broke up. How to get back to him."
किंवा
"What men like"
किंवा
"I fought with my parents. What to do to patch up with them without saying 'I am sorry!?"
तिला अशा प्रकारची सर्चेस मारताना मी या या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
तर..
तिला तिच्या कितव्यातरी ब्रेक-अप नंतर आत्महत्या करायची होती आणि पहिल्यांदाच गूगलने तिला निराश केलं होतं कारण तिला धडाक्याने ’स्टाईल’मध्ये मरायचं होतं.
मला आपलं ’रेखाने शिळा उपमा खाऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता’. एव्हढंच काय ते या विषयातलं ’स्टायलिश’ ठाऊक.
सर्वसाधारण असे बरेच पर्याय मी सुचवले. उदा. सायनाईड, पंख्याला लटकणे वगैरे. पण तिला आत्महत्या करताना वेदना झालेल्या नको होत्या.
चेहरा विदृप झालेला नको होता.
इत्या्दी बरेच ऍस्टेरीक मार्क्स तिच्या ’आत्महत्या’ या विषयावर होते. थोडक्यात तिला फ़ाईव्ह स्टार आत्महत्या हवी होती.
ऑबव्हियसली तिने आत्महत्या केली नाही. खरं म्हणजे तिला करता आली नाही.
कारण स्वच्छ होतं- तिला जगायचं होतं.
किंवा तिला तिच्याभोवती असलेल्या इतर प्रेमांची जाणीव झाली.
खरंच.
आयुष्यभर कोणाचं ना कोणाचंतरी प्रेम आपल्यासभोवती असतं. पण आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही, जे नाही त्याच्या शोधात दूर-दूरवर जातो.
नचिकेत नाही का? समीरचं, आप्तांचं भोवती उबदार शालीसारखं लपेटलेलं प्रेम सोडून मृत्यूला शोधत त्या विहीरी्त जातो?
जायते यस्मात च, लीयते यस्मिन इति जल:
ज्यातून जन्म घेतो आणि ज्यात लय पावतो ते पंचमहाभूत म्हणजे पाणी..
आपण एखादी गोष्ट नाकारतो.
ती नाकारण्याचा निर्णय घेणं खूप सोप्पं.
पण तो अंमलात आणण्यासाठी लागणारी आयुष्याची उलथापालथ करण्यासाठीची श्रद्धा, विश्वास आपल्याकडे आहे का? याचाही विचार झाला पाहिजे.
माझ्याकडे आहे??
तर हो!
आहे!

कधीकधी आपण एखादी कविता वाचतो त्यातल्या एक-दोन ओळी खूपच आवडून जातात.
गुलजार, गालिब हे तर irresistible!
मग त्या ओळींचा उल्लेख कुठल्यातरी पोस्टमध्ये कधीतरी करायचाच असं आपण ठरवतो.
पण नुसतंच - "मला हे आवडलं-देत आहे" असं लिहीलं तर लै बोराड वाटतं. त्याला साजेशी सिच्युएशन असेल तर त्या ओळींना वेगळाच रंग चढतो.
नसेलच सिच्युएशन तर आपण कधीकधी ती ’बनवतो’. आणि नाहीच बनवता आली तर वैतागून स्वस्थ बसतो.
दिवसांमागून दिवस जातात.
आपली चिडचिड चिडचिड होत राहते.
माझीही नाही आता अशीच चिडचिड होतेय?
मला एलियट्ची ही कविता कधीची ब्लॉगवर लिहायचिये पण बोंबलायला सिच्युएशनच नाही.

"आगगाडीत बसलेले तुम्ही
हे स्टेशनवरचे तुम्ही नसता
किंवा पुढच्या स्टेशनवरचे तुम्ही नसाल
आगबोटीच्या कठड्यावर वाकताना
मागचा रस्ता लाटांनी रुंदावलेला बघताना
तुम्ही म्हणणार नाही की हा
टाकला मागे मी माझा भूतकाळ
आणि हा मी सामोरा भविष्याला"

अरे! पण सिच्युएशन नसल्याचं भांडवल करून मी सिच्युएशन निर्माण केलीच की नाही?
वा!

मी संध्याकाळची फ़िरायला जाते तेव्हा दोन मध्यमवयीन माणसं पिंपळाच्या पारावर बसून बुद्धीबळ खेळत असतात.
ती लोकं एकाच प्रकारच्या चाली खेळतात, त्यांचा खेळही नेहमी एकाच प्रकारे संपतो. ’स्टेल-मेट’ने.
त्यांच्या लक्षात येतं का नाही? हे तर मला माहीत नाही.
नसावं बहुतेक!
पण उत्साहाने प्यादी मांडून तोच तोच खेळ खेळण्यातल्या त्यांच्या उत्साहाची लागण मलाही होते आणि मी ही ताटकळत चांगले तीन चार गेम्स त्यांच्या तोंडाकडे टकमक बघत उभी असते.
आपलं काय वेगळं असतं नाहीतरी?
काल केलं तेच आज.
आज केलं तेच उद्या.
त्यांनी केलं म्हणून मी.
मी केलं म्हणून तू.
सवयीने आपणही चाकोरीतच फ़िरतोय ना?
असं फ़िरत राहायचं आणि पोकळी वगैरे जाणवलीच कधी तर त्यात कविता, ब्लॉग, सिगरेट्स, गझल कोंबून बसवायची.
फ़ाजलींनी कसलं ग्रेट लिहून ठेवलंय याबाबतीत.

"रात के बाद नये दिन की सहेर आयेगी
दिन नहीं बदलेंगे, तारीख बदल जायेगी"

------

अगदीच ब्रशने मन मानेल तसे फ़टकारे मारलेल्या चित्रासारखं झालंय का लिखाण?
बट माईंड यू, त्यालाही ’ऍबस्ट्रॅक्ट’ म्हणतात.
खालून, वरुन, उलट, सुलट
कसंही पहा.
आहे तसंच दिसणार!

आणि
येस्स्स!
कालिब म्हणजे ’काहीही’ लिहून घूयात.
हे वाचून ’काहीही बरं का!’ असं वाटलं तर हेतु सफ़ल!

डॉ. सिंग, तुम्हारा कुछ भी नही चुक्या!

प्रिय पंतप्रधान,

मला हे कळून घेताना अत्यंत आनंद झाला होता की सुप्रीम कोर्टाला (आदराने!) झटकून टाकून तुम्ही म्हणालात की "धान्य, धान्याचे सडणे वगैरे-ह्याबद्दल ’धोरणांतर्गत’ विचार करणं हे सरकारचं काम आहे". आणि हे खरंच कोणीतरी बोलून दाखवायची गरज होती. असं करून यूपीए सरकाराकडे अभावानेच असलेला प्रामाणिकपणा तुम्ही दाखवलात.

लाखोंच्या राशीने सडत पडलेल्या धान्याचं काय करायचं हे तुमचं सरकार ठरवेल, सुप्रीम कोर्ट नाही. जर याबद्दलचं धोरण ’पडून असलेले धान्य गरीब भुकेल्यांच्या मुखी घालण्यापेक्षा ते सडू द्या’ असं सांगत असेल, तर त्यात कोर्टाला ढवळाढवळ करायचे काहीच काम नाही.
"धोरणं बनवणं हे सरकारचं काम आहे"- तुम्ही म्हणता.
राष्ट्राचा नेता - वाढती भूक, कुपोषण, धान्य साठवण्याच्या जागांची अभाव हे सगळं सरकारच्या धोरणांचंच फ़लित आहे- हे मान्य करतोय हे पाहून बरं वाटलं. दुसरं कोणी असतं तर हे सगळ्याचं खापर विरोधी पक्ष, हवामान आणि (सारवासारव करायला उपयोगी पडणारी) बेभरवशाची बाजारयंत्रणा यावर फ़ोडून मोकळा झाला असता.. पण तुम्ही तसं केलं नाहीत. तुम्ही धोरणांकडे स्वच्छ निर्देश केलात. आणि धोरणं ही हेतुपुरस्पर असतात आणि मार्केटपेक्षाही जास्त मूर्त आणि थेट असतात.

धान्यसाठयाचा प्रश्न:
नवी शहरं, मॉल्स, आणि मल्टीप्लेक्सेस बांधायसाठी खाजगी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना सवलती देण्याइतका पैसा सरकारकडे असताना राष्ट्राचे धान्य साठवण्याच्या जागेसाठी सरकारी तिजोरीतून काहीच खर्च होऊ नये हाही धोरणांचाच भाग असेल असं मानायला हरकत नाही. तुमच्या नव्याच धोरणाअंतर्गत खाजगी जागा भाडेतत्वावर घ्यायची नवी ’कल्पना’ पुढे आलीये.यातून एक प्रश्न उद्भवतो की की २००४ ते २००६ मध्ये सरकारने भाडेतत्वाबर घेतलेली जागा (१० वर्षांचा कालावधी हातात असताना) मध्येच का सोडली?आता पुन्हा भाडेतत्वावर घेणं हे साहजिकच खर्चिक काम आहे. सरकारच्या मालकीच्या जागांवर धान्य साठयासाठी बांधकाम करण्याचाही पर्याय आहेच- जे आता छत्तीसगढ सरकार करतेय. दूरगामी परीणामांचा विचार करता ते कमी खर्चाचं आणि जास्त फ़ायद्याचं ठरेल (आपल्या!). पण अर्थात हे संपूर्णपणे तुमच्या धोरणांवर अवलंबून असल्याने फ़क्त सुचवतोय.

देशाचा एक महत्वाचा अर्थशास्त्राचा प्रोफ़ेसर म्हणून तुम्ही मोकळ्या जागेवर, वाईट गोडाऊन्समध्ये सडत असलेल्या, सडू घातलेल्या धान्याचं काय करायचं ठरवलेय यावरच्या धोरणांचा नकीच विचार केला असेल याची मला खात्री आहे. नाही-काय आहे, की तुमची धोरणं त्या दिवसेंदिवस जास्त आक्रमक होत चाललेल्या उंदरांना समजत नाहीयेत. त्यांना वाटतंय की ते त्या धान्याचं काहीही करू शकतात. आणि भरीस भर त्यांना सुप्रीम कोर्टाचीही भीती वाटत नाही. (बहुतेक, त्या धान्यापसून त्यांना दूर ठेवण्याकरता काही सवलती जाहीर करायची गरज आहे)

भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याने नुकताच मान्य केले की त्यांना याच मुद्द्यावर २००४ च्या निवडणुकांमध्ये सपशेल आपटी खायला लागून सरकारवरून पाय उतार व्हायला लागले होते. चुकवण्यासाठी खूप मोठी किंमत! तुमच्या लक्षात काही येतेय का?

नऊ वर्षांपूर्वी सध्याच्याच,या ’अन्नाचा हक्क’ संबंधी सुप्रीम कोर्टाने म्हटले होते," गरीब, कमजोर, विपन्नावस्थेत असलेल्या लोकांना भूक आणि उपासमार यांचा सामना करायला लागू नये. आणि ही सरकारची जबाबदारी आहे-मग ते राज्य सरकार असो वा केंद्र सरकार. आणि ह्या सर्वांकरता काय काय धोरणं आखायची हे सरकारने बघावं. धान्याची नासाडी होऊ नये, ते उंदीर-घुशींना बळी पडू नये, ते धान्य भुकेल्यांपर्यंत पोहोचलं-तरी सुप्रीम कोर्ट समाधानी असेल."

हजारोंच्या संख्येने जे शेतकरी आत्महत्या करतायेत ते पण तुमच्याशी सहमत आहेत. त्यांना पण हे माहीत आहे की कायदे करणारया कोर्टाने नव्हे तर तुमच्या धोरणांनी त्यांना स्वत:चा जीव घ्यायला भाग पाडलं.त्यामुळेच ज्यांनी आत्महत्येपूर्वी पत्रं लिहून ठेवलियेत ती तुम्हाला,आपल्या अर्थमंत्र्यांना आणि आमच्या प्रिय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून आहेत.
ती पत्रं तुम्ही वाचली आहेत डॉ.सिंग?
तुमच्याच पक्षाच्या महाराष्ट्रातील सरकारने त्यातलं एकतरी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे का?
त्यातून कर्जं, कोसळणारया किंमती, वाढलेला गुंतवणूकीचा दर, त्यांच्या समस्या बिलकून समजून न घेणारं सरकार-याच्याच कहाण्या ऐकायला मिळतात.ती पत्रं त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना पण नाही लिहीलेयत तर तुम्हाला आणि तुमच्या सहकारयांना उद्देशून लिहीलेली आहेत. त्यांच्या विपन्नावस्थेला धोरणं किती जबाबदार आहेत हे ते समजून चुकले होते-म्हणूनच ती पत्रं धोरणांच्या जनकांना उद्देशून होती.

शेतकरयांमधला असंतोष:
वर्ध्याचे रामकृष्ण लोणकर यांनी लिहून ठेवले आहे, की तुमच्या २००६च्या ऐतिहासिक विदर्भ-भेटीनंतर आणि धान्य-कर्जाच्या घोषणेमुळे मला वाटले होते की मी पुन्हा जगू शकेन" पण "मला बॅंकेत काडीचीही किंमत मिळाली नाही. काहीच बदललेलं नाहीये". वाशिमच्या रामचंद्र राऊत यांनी आपलं पत्रं (जे तुम्हाला -राष्ट्राध्यक्षांना-आणि तुमच्या सहकारयांना उद्देशून आहे) १०० रुपयाच्या स्टॅंप-पेपरवर लिहून ठेवलेलं आहे. निषेध ’कायदेशीर’ व्हाहा याची खबरदारी त्यांनी घेतलेली दिसते. अशा कित्येक कहाण्या आहेत. सगळ्या तुमच्या धोरणांकडे बोट दाखवणारया..आणि ते बरोबरच आहे. नाही? नुकतंच बाहेर आलेल्या बातमीनुसार संपूर्ण ’Agriculture Credit ’च्या अर्ध्याहीपेक्षा जास्त वाटा हा ग्रामीण बॅंकांमध्ये नव्हे तर नागरी आणि शहरी बॅकांमध्ये वाटण्यात आला.त्यातला जवळजवळ ४२% -मुंबईला (इथेही शेती होते- पण वेगळया प्रकारची..इथे कॉंट्रॅक्ट्सचं पीक घेतलं जातं). लोणकर राऊत यांच्यापर्यंत Agriculture Credit कसं पोहोचेलच कसं?

आजची महागाई ही नि:संशय तुमच्या धोरणांचंच फ़लित आहे.
तुम्ही टोरोंटोला जागतिक नेत्यांना सर्वसमावेशक विकासाबद्दल लेक्चर देत असताना तुमचं सरकार अनियंत्रित पेट्रोल दर-वाढ, केरोसिनच्या दरात वाढ जाहीर करते, याने मी अवाक झालो आहे.
जेव्हा आपल्या धोरणांमुळे लाखो लोकांचा आधीच अल्प असलेला आहार अत्यल्प होतो,तेव्हा त्यावर नुसती चर्चा करण्यात काय हशील?
जेव्हा धोरणांमुळे लोकांच्या अधिकाराची पायमल्ली होतेय आणि लोक सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतायेत तेव्हा सुप्रीम कोर्टाने काय करावं?
सुप्रीम कोर्टाने धोरणं बनवायचा प्रयत्न करु नये -बरोबरच म्हणत आहात तुम्ही. पण मग तुमच्या धोरणांचे परीणाम त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभे राहिल्यावर त्यांनी काय करावं?
हे तुम्हालाही माहितेय आणि मलाही की -धोरणं लोकंच बनवतात. आणि तुमच्याबाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या ताफ़्यात तुम्ही बाळगून असलेले प्रतिथयश अर्थतज्ञ.. ज्यांच्यापैकी अनेकांनी ’बालमजुरी बंदी’च्या विरोधात कंबर कसली होती. एकाने तर थे्ट ’New York Times' मध्ये "The Poor Need Child labour" (November 29, 1994) हा लेख प्रकाशित केला होता. आपल्य घरी १३ वर्षाचा मुलगा कामाला आहे हे ही त्याने मान्य केले होते.

सरकार ११वी पंचवार्षिक योजना सुरु व्हायच्या आधी नवी BPL (Below Poverty Lie) तयार करायचे २००६ ला दिलेले वचन पाळत नाही, नवी BPL प्रत्यक्षात येतच नाही तेव्हा सुप्रीम कोर्ट काय करेल?
१९९१च्या censusवरुन २०००च्या गरीबीचा अंदाज लावला जातो आणि त्यानुसार धान्याचा वाटा राज्यांमध्ये वितरीत केला जातो तेव्हा सुप्रीम कोर्ट काय कुणीच काही करू शकत नाही.
या २० वर्ष जुन्या माहीतीमुळे जेवढ्या लोकांना आज आताच्या वर्षी BPL/’अंत्योदय अन्न योजनेच’ लाभ मिळायला हवा होता त्यापेक्षा सुमारे ७० लाख कमी लोकांना मिळतो आहे. आणि याबद्दलची धोरणं तुम्हीच राबवत असल्याने हे तुम्हाला माहीत नसण्याचे काहीच कारण नाही.

सुप्रीम कोर्ट या धोरणांसंबंधीच्या द्विधा मन:स्थितीतून बाहेर येईपर्यंत आम्ही तुमच्या धोरणांवर पुनर्विचार करतो आहोत.या पत्राची एक प्रत तुमच्या अन्न आणि कृषी मंत्र्यांकडे पाठवलीत तर मी उपकृत होईन-अर्थात तो कोण आहे आणि कुठे आहे, हे तुम्हाला माहीत असेल तर.

आपला,
पी. साईनाथ

-----

(स्वैर अनुवाद: ’द हिंदू’ वरून)
 
Designed by Lena