शोध.

सांताक्रूज स्टेशन. मुंबईचा मुसळधार पाऊस.मी आणि मिठू पुटकन एका टपरीच्या आडोशाला पळालो.पाऊस वेड लागल्यासारखा कोसळतोय आपला. छतावरून कोसळणारया पागोळ्या ओंजळीत घेऊन पिण्याचा मोह क्षणभर झाला. पण टपरीचा एकंदरच नीटनेटकेपणा बघून तो आवरला. त्या पागोळ्या क्षण दोन क्षण बांधून ठेवतात हे खरं. कसा जीव एकवटून खाली पडायला बघतात.आपल्या पोटात पलीकडच्या विश्वाचं एक प्रतिंबिंब वाढवत. ओळंबून पडल्याच हातावर तर..त्याच प्रतिंबिंबाची छोटी छोटी प्रतिरूपं विखरून आणि पडल्याच खाली तर.. ओहळाबरोबर वाहून जाऊन..अस्तित्वाची पुसतशीही शंका येऊ नये इतक्या तादात्म्य पावून..
आणि तो प्रश्न माझ्या तोंडातून अक्षरश: पागोळीसारखा घरंगळला...
"मिठू, या पागोळ्या कशा तयार होतात गं?"
मिठूने दचकून एकदा माझ्याकडे निरखून पाहिले पण माझा चेहरा कोराच बघून ती म्हणाली
"अगं पावसातून नाही का?"
"मग पाऊस कसा तयार होतो?"
"ढगातून"
"ढग?"
"आकाशात."
"मग हे आकाश कोण तयार करतं गं?"
"........."

..........

ज्याच्याबरोबर असताना प्रश्नही आसपास फ़िरकण्यास भ्यावे असा अजेय माझ्याबरोबर.
मी त्याला विचारले
"अजेय, तू कसा निर्माण झालास?"
"Dunno"
"म्हणजे?"
"म्हणजे I came from my mother's womb, dimwit"
"ok, मग तुझी आई कशी निर्माण झाली?
"ofcourse from her mother's womb, stupido!"
आता यातून अनेक आयांची गाडी निघणार आणि अजेय पण न थकता मदरची मदरची मदर करत rest to infinity करणार हे मला ठाऊक. ते मला टाळायचं होतं.मी विचारलं,
"अरे पण या सगळ्यांची एक primitive मदर असेलच ना? ती कशी निर्माण झाली?"
यावर अनेक मुलींचा कलेजा खलास करणारया ती मान तिरकी करून मागे वळायच्या स्टाईलने माझ्याकडे वळला. मी थंड. माझ्यावर याचा परीणाम होत नाही म्हटल्यावर इतर वेळी चिडतो तसा आजही चिडला.
"काय होतंय तुला?"
"उत्तर दे ना"
"मे बी, माकडापासून मानव उत्क्रांत झाला ते माकड असेल"
"मग ते माकड कोणी निर्माण केले?"
"oh, fuck you!"
"......."
या शेवटाल्या प्रश्नांचं उत्तर काय? यानं अस्वस्थ नाही व्हायला होत?

..........

काही एक वर्षांपूर्वी मी माझ्या आईला हेच प्रश्न विचारले तर तो संवाद हा काही अशा प्रकारचा होता.
".."
"अगं, देव नाही का बनवत हे सगळं?"
"देव?"
"मग काय तर!
"मग देवाला कोणी बनवलं?"
"देवाला कोणी कशाला बनवायला पाहीजे? तो असतोच."
"असा कसा असतो? कोणती ना कोणती गोष्ट कशा न कशातून निर्माण झालीये.मग देवाचाही निर्माताही कोणतरी असायलाच हवा ना गं"
"फ़ारच प्रश्न विचारते बाई ही!"
"अगं, चुकीचं बोलतेय का मी?"
"गप्प बस्स कार्टे, छळवादी मेली!"
"...."

..........

ही देवभोळी माणसं खरंच सुखी असतात. एकदा का सर्वशक्तिमान परमेश्वराची कल्पना स्वीकारली की सगळं जग आणि आयुष्य सोपं होऊन जातं. सगळं सगळं परमेश्वरावर सोपवून द्यायचं की झालं, पुढचे प्रश्न विचारण्याची गरजच नाही. विचाराला निश्चिंती येते, सुरक्षित वाटतं.
जगातल्या सगळ्या गोष्टींचं, अन्यायाचं, क्रौर्याचं, दु:खाचं नव्हे तर प्रत्येक बाबीचं स्पष्टीकरण परमेश्वराच्या माध्यमातून करता येतं.

एकेकाळी मलाही ’देव’ या संकल्पनेचं प्रचंड fascination होतं. पूजापाठ, स्तोत्र सारं काही मुखोद्गत होतं मला. गणपती हे माझं आद्य दैवत होतं. सगळी कर्मकांडं मी यथास्थित करत होते.

पण नंतर सर्वमान्य मूल्यांपुढे प्रश्नचिन्ह डकवण्याची सवय जडली.हे आहे हे असं का आहे? हे असं असण्याला काही पर्याय होता का? हे असं नसतं तर कसं असतं? कसं असायला हवं होतं? हे असं असण्याला जबाबदार कोण? असे प्रश्न माझ्या डोक्यात फ़ेर धरून नाचायला लागले.नैवेद्य उजव्या हाताऐवजी डाव्या हातात घेतला तर देव कोपतो? उपास मोडला, उपासाच्या वेळी चुकून काही खाल्लं गेलं , स्तुतीपर आरती नाही आळवली तर त्याला राग यावा इतका का हा चंद्र, सूर्य, तारे निर्माण करणारा देव क्षुद्र आहे? असे विचार यायला लागले. थोडक्यात आईच्या भाषेत मला ’शिंगं फ़ुटली’.
मग मी अल्पमतीप्रमाणे या शंकांचं निरसन करून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीच्या निर्मीतीला देवाच्या खात्यात घालून लहान मुलांची बोळवण न करणारी काही मंडळी माझ्या सुदैवाने मला लाभली होती. त्यांच्याशी बोलले आणि माझ्या लक्षात आलं की वर देणारा, पूजेने संतुष्ट होणारा, चार हात असणारा, चमत्कार करणारा आणी माणसासारखा देव अस्तित्वातच नाही. मग चालू झाली तडफ़ड! उत्तरं मिळवायची जबाबदारी माझी होती. मी प्रयत्न करत राहीले आणि एक दिवस मला उत्तर सापडल्यासारखं वाटलं.

दहावीच्या रिझल्ट्च्या आधी आम्ही हिमाचलला गेलो होतो. आणि आज जे मला माझं सुदैव वाटतं ते म्हणजे schedule मध्ये नसताना आमची ’मणिकरण’ ट्रीप ठरली. कारण आजतागायत तो योग पुन्हा नाही आलेला. अगदी कुलूला जाऊन सुद्धा. ७०-८० फ़ूट खाली रोरावत, फ़ेसाळत जाणारी बियास मी भयचकीत नजरेने पाहीली. त्या पाण्याच्या प्रपाताने उभाच्या उभा फ़त्तर कडाकड कोसळताना पाहिला. यावर मलमपट्टी म्हणून की काय भुरभुरणारं बर्फ़ही पाहीलं. देवदार आणि पाईन वृक्षांच्या दाट राईतून घुमणारी वारयाची शीळ ऐकली, दूरवर दिसणारया हिमालयाच्या नाममात्र दर्शनानेसुद्धा माझे हात आपोआप जोडले गेले. आणि मला श्रीकाका आठवला. "ज्यापुढे तुला नतमस्तक व्हावंसं वाटेल तो तुझा देव!" आणि मला माझं उत्तर सापडल्यासारखं वाटलं, श्वास मोकळा झाल्यासारखा वाटला. yess, देव म्हणजे निसर्ग असावा.

पुढे अभ्यासात गळ्यापर्यंत रुतले, schedule गच्च झालं आणि हे प्रश्न कुठेतरी गाडल्यासारखे झाले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नाटकांतून, स्पर्धांतून बुवांचे बुरखे टरकवताना मला आसुरी आनंद व्हायला लागला.थोडक्यात, मी कट्टर विज्ञाननिष्ठ बनले. घडणारया प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक कारण असतंच , शोधल्यावर ते मिळतंच यावर माझा ठाम विश्वास बसला. पण कुठेतरी काहीतरी ठसठसायचं आणि माझे ते जुने प्रश्नमित्र उफ़ाळून वर यायचे. विज्ञानाने फ़क्त एखादी गोष्ट कशी घडते यामागचं logic दिलंय, process दिलीये पण.. मुळातच ती गोष्ट घडावी हे प्रयोजन कुणाचं? आकाशात ग्रहगोल नियमीतपणे संचार करत असताते, पण हे नियम मुळात तयार कसे झाले? हे मात्र समजणं कठीण आहे. सजीव सृष्टीची निर्मिती ही रासायनिक आणि आधिभौतिक प्रक्रीयांमधून होत असते तर मग आपल्यामधला हा ’मी’पणा किंवा जिव्हाळा कुठल्या रासायनिक प्रक्रीयेने define करता येईल? मी आणि रेणू एकमेकांची असह्य आठवण येऊन एकमेकींना एकाचवेळी फ़ोन लावतो हे कुठल्या आधिभौतिक आणि रासायनिक प्रक्रीयेत बसतं? Crisis च्या वेळी फ़क्त एकाचंच स्मरण का व्हावं? साधी स्त्री अवघ्या काही महिन्यात अतिशय गुंतागुंतीचा पूर्ण वाढलेला देह जन्माला घालते, अशा कितीतरी गोष्टी. बरं! या ’कवी-कल्पना’ या खात्यात मोडीत काढल्या तर मग ’कल्पना’ तरी काय आहे? जसा विचार करावा, जेवढा अभ्यास वाढवत न्यावा तेवढी स्वत:च्या क्षुद्रपणाची जाणीव अधिक होतेय. आपण कोण आहोत? या विश्वाच्या पसारयात आपलं स्थान किती नगण्य आहे. आपल्या असण्याला अर्थ काय? आपण असलो तर फ़रक पडतो का? फ़रक पडत नसला तर मग असण्याची गरज काय? एखाद्या सवयीच्या अंधारया बोळकांड्यातून जात असताना अचानक एका खांबामागून एखादा गर्दुल्ला अंगावर यावा तसे हे प्रश्न ’व्हॉव’ करून अंगावर येतात.मग ती ठुसठुस वाढायला लागते, आणि मग खडा ठाकतो तो आदिम प्रश्न, "या निसर्गाचा निर्माता कोण?" "मी कोण?" "या प्रचंड , अफ़ाट, अथांग विश्वाच्या संदर्भात हे धडपडणं, स्वत:ला प्रूव्ह करणे, हेवेदावे, कपट, दुरावणं, जवळ येणं या सगळ्याला काय अर्थ आहे?" पण..
पण विश्वाच्या या पसारयात माझं स्थान कितीही नगण्य असलं तरी मी ’आहे’! याचा अर्थ माझ्याही आयुष्याला काहीतरी अर्थ असायलाच हवा, प्रयोजन असायलाच हवं. मग ते काय आहे? कोsहम?

उपनिषदांमध्ये फ़ार सुंदर सांगितलंय, ’अहं ब्रह्मास्मि!’ आपण सारे या परमात्म्याचाच भाग आहोत. मी म्हणजे आकाशगंगा, मी म्हणजे सुपरनोव्हा, मी म्हणजे आभाळ, मी म्हणजे हे नदी, नाले, पर्वत ,पक्षी, मी म्हणजे अगदी तू सुद्धा.
टॅं टॅंडॅं! म्हणजे ’मी कोण’ हा प्रश्न आपसूकच मिटला, भानगडच नाही. पण या कल्पनेने मानवी व्यवहारांचं समर्थन कसं करता येईल?जगातला असमतोल कसा समजून घेता येईल? जगात चाललेली भयंकर पिळवळूक, गरीब-श्रीमंत दरी , शोषण, विषमता यांचं आकलन कसं होईल? या सर्वांचं प्रयोजन कसं justify करता येईल?

मोठ्ठं झालो असं वाटण्याच्या, आपण आपल्यातच राहायला लागतो, ’प्रेम’ म्हणजे exploitation आणि ’मृत्यू ’ म्हणजे काहीतरी भयंकर रोमॅंटीक आहे असं वाटण्याच्या काळात मी कृष्णमूर्ती, ओशो वाचले. या माणसांनी पण similar प्रश्नांचा काथ्याकूट केलेला पाहून मला जरा आशा वाटली. उदा. कृष्णमूर्ती म्हणतात..

"There is immediate conflict beytween the fear and the 'me' that is overcomiung thaty fear. There is the watcher and the watched. The watched being fear and the watcher being the 'me' that wants to ge rid of that fear. So, the problem consists of this conflict betwenn the 'not me' of fear anf the 'me' who thinks it is different from it and resists fear; or who tries to overcome it, escape it, suppress it, or control it."

एकदम मान्य! काय मनकी बोल्या तुम! यावर उत्तर सुचवताना ते म्हणतात,

"Accept things as they come. To take things as they come,actually, not theorautically, one must be free from 'me, the 'I', the emptying of the mind of the 'me' and 'you', and the 'we and 'they'. Then you can live from moment to moment without struggle, without conflict"

?????
पण म्हणजे नक्की काय करायचं?

कृष्णमूर्तींचं english फ़ारच ओघवतं आहे, आपण काहीतरी ग्रेट ऐकतोय अस वाटत राहतं. पण problem हा आहे की ते समजतं पण उमगत नाही.अर्थ कळतोय पण उमगत नाही मनोमन असं काहीसं. एखाद्याने ice-cream चा नवा flavour खाल्ल्याचं सांगावं आणि ते न चाखताही आपण ’काय मस्त रे!’ म्हणून मुंडी हलवावी...असंच काहीतरी! म्हणजे ते म्हणतात "Look at yourself with complete quiteness" म्हणजे नक्की कसं? हे कृष्णमूर्ती सांगतच नाही्त. आत्मशोधाच्या प्रयत्नात खोल जायचं , स्वत:ला समजून घ्याचचं म्हणजे नक्की काय करायचं? ’मी’चा विलय करून टाका असं सर्वजण सांगतात, पण तो कसा करायचा हे मात्र कोणी सांगत नाही. मी आज ठरवलं , की नाही, आजपासून ’मी’ ला थारा नाही. शक्य आहे का ते? म्हणजे असेल. त्याशिवाय गीतेमधला तो सर्वश्रेष्ठ निष्काम कर्मयोग कसा लिहीला गेला असेल?

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥


पण त्यासाठी योग्य तो मार्गदर्शकच हवा. कृष्णमूर्तींचं सांगणं म्हणजे जंगलाच्या थेट मध्यावर आणून सोडायचं आणि सांगायचं "शोधा पुढचा रस्ता!"

आयुष्याची आपण आपल्या मर्जीने केलेली उभारणी, खाल्लेल्या खस्ता, वाचलेले ग्रंथ, मिळवलेले ज्ञान , स्वत:शी चाललेला झगडा, मूल्यांवरची निष्ठा, माझे लढे या सगळ्या सगळ्याला या विश्वाच्या संदर्भात काय अर्थ आहे? संदर्भ बदलला, संकुचित केला तर आपलं आपल्यालाच पटायला लागतं. पण हे पटणं म्हणजे आपण आपल्यालाच फ़सवणं आहे हे ही तितक्याच लवकर कळतं. मग तरीही मी संदर्भ बदलते. भोवतालच्या समाजाचच्या संदर्भात स्वत:ला पाहायला लागते. या समाजाच्या संदर्भात ’मी’ आहे. मग या समाजात माझ्या ’असण्याला ’ काहीतरी अर्थ आहे. या समाजाला मी देणं लागते. आणि भवतालचा समाज आणि परिस्थिती चांगल्या दिशेने बदलण्यासाठी जगणं हेच माझ्या जगण्याचं प्रयोजन असेल. मग ते आदिम प्रश्न गाडले जातील. भोवताली एव्हढे प्रश्न ’आ’ वासून उभे असताना "मी कोण?" "निसर्गाचा निर्माता कोण?" "वैश्विक पसारयातलं आपल्या आयुष्याचं प्रयोजन" शोधण्यात काय point आहे? असं वाटायला लागेल. प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत म्हटल्यावर मी अशीच त्यांच्यापासून दूर पळायला बघेन. पळत राहीन, छाती फ़ुटेपर्यंत. स्वत:ला कामात गळ्यापर्यंत बुडवून घेईन. पण या सर्वांमुळे मला हे प्रश्न पडायचे किंवा पडू शकतात हे सत्य कसं काय बदलेल?

कोणीतरी म्हटलेय की समाधानी माणूस म्हणजे ज्याला असमाधानाशी तडजोड करण्यात यश मिळालंय असा माणूस. तसंच काहीसं. आपणच आपली समजूत घातल्यासारखं.

म्हणून श्रद्धाळू माणसांचा मला हेवा वाटतो. आपले सर्व प्रश्न त्या ’देव’ नावाच्या जगप्रसिद्ध कल्पनेवर सोपवून द्यावेत आणि निश्चिंत व्हावे असं वाटतं. पण नाही. श्रद्धा हवीशी झाली तरी बिनदिक्कतपणे स्वीकारावी इतकीही मी desperate नाहीये. मी वाचू शकते, अभ्यास करू शकते, जाणून घेऊ शकते नव्हे जाणून घेण्याची अपार इच्छा आहे. पण असं वाटतं की काहीतरी सापडावं ज्यामुळे आपल्या शंकांचं निरसन होऊन जाईल. सगळ्या-सगळ्याचं एका सूत्रात स्पष्टीकरण मिळेल असं काहीतरी.
आणि म्हणूनच..

मी श्रद्धेच्या शोधात आहे!
 
Designed by Lena