माय फ़ेव्हरीट पुतना ऑंटी.!


दिवसभरातल्या अनेक घटनांमधून एक कथा जन्म घेत असते. आयुष्यातली पुरेशी वर्षं जगून घेतली म्हणजे जगून घेतलेल्या वर्षांमधली लय अखेरीस आपणांस सापडते, माणसाकडे आपण सूक्ष्मदर्शकातून पाहावं तसं पाहायला लागतो ,त्याचे कंगोरे आपणांस उकलू लागतात. वरवर पाहायला जरी सर्व व्यक्ती सुट्यासुट्या असल्या तरी त्यांची-आपली वीण आत कुठेतरी घटट विणली गेलीये, अदृश्याचा हा धागा आपल्याला उकलून घ्यायचाय पण तो कसा? कुठून? कुठवर? ह्याचा विचार आपल्याही नकळत आपल्या अंतर्मनात चालू असतो. या दृश्य-अदृश्यातच कथांची बीजं लपलेली असतात. पण कथानिर्मितीस एव्हढं पूरक हो‌ऊ शकतं? पारंपारीक कथेत किमान दोन तीन प्रसंग असावे लागतात, ते काही अंतराने घडावे लागतात, त्यात कार्यकारणभाव असावा लागतो, पण सतीश तांब्यांच्या कथा हा समज खोटा ठरवतात.

’माझी लाडकी पुतना मावशी’ मधली प्रत्येक कथा कथेच्या पारंपारिक साच्याला छेद देत जाते. यातली कथा घटनाप्रधान रंजन आणि कृत्रिम उद्दीष्टवादापेक्षा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक अंतर्मुख होत जाणारी आहे. ह्या कथा आपल्याला भिडतात कारण त्या शोकात्म असतात किंवा त्यातल्या नाट्यपूर्ण घटनांनी नपेक्शित वळण घेतलं म्हणून नव्हे तर त्यातली पात्रं म्हणजे मी-तुम्ही-आपण सगळे असतो. ती पात्रं कधीकाळी आपणच बोललेली वाक्यं, आपणच सांगीतलेली फ़िलॉसॉफ़ी सांगत असतात. सतीश तांबे आपल्याला व्यक्तिश: ओळखत होते की काय असं वाटावं इतपत ती कथा आपल्यावर बेतल्याचं सतत जाणवत राहतं. ’राज्य राणीचं होतं’ या त्यांच्या पहिल्यावाहिल्या पुस्तकातल्या सर्जनशील लिखाणानंतर या दुसरया पुस्तकाबद्दलच्या अपेक्षा साहजिकच उंचावतात. ’न निखळ कल्पना, न निव्वळ वास्तव तर संकल्पना असते ज्यात तेच ठरु शकतं अभिजात’ या लाडक्या धारणेतून लिहीणारया या लेखकाच्या कथा मुळीसुद्धा भ्रमनिरास करत नाहीत.

काही घट्ना आठवणींच्या ड्रॉवरमध्ये पार आतल्या कप्प्यात लपवुन ठेवलेल्या असतात. कधीकधी वाटू नये त्या गोष्टींबद्दल ओढ वाटते, का वाटते हे  विचारल्यावर समाधानकारक सुसंगत उत्तर देता येत नाही, जगाच्या दृष्टीने दळभद्री त्याबद्दल तीव्र उत्सुकता वा्टते, आयुष्यातल्या रहस्यमय गोष्टींशी त्या त्या गोष्टींचं अनाकलनीय नातं जाणवायला लागतं अशा मनोवस्थेमधल्या ’खुनाच्या हद्दपारीची शिक्षा’, ’देव-दानवे नरा’ या कथा. आपल्या हातुन घडू नये ते घडवण्याची अमर्याद ताकद बाळगणारया आपल्यामधल्या अनिर्बंध ’त्या’ला प्रचंड वचकून असणारा समीर असो किंवा ’अ डे विल कम , डेविल विल विन, ईविल विल विन’ हा मंत्र अथक पुटपुटणारा नंदन असो, काहीशी भयाण, काहीशी विनोदी असंबंद्धता हाच जीवनाचा खरा पाया आहे ह्याची जाणीव या कथा वाचताना पदोपदी होते. समीरबद्दल लिहीताना तांबे एका ठिकाणी लिहीतात,
"चुटपूट लागल्यावर त्याला समांतरपणे असं आठवायचं की , बरयाचदा उंच ठिकाणी गेल्यावर वा चालत्या वाहनातून उडी टाकू की काय, अशी जी धाकधूक वाटते त्यातलाच हा प्रकार आहे"
अर्थ-निरर्थकाची अशी कितीतरी भेंडोळी आपल्याही डोक्यात पडून असतात पण त्यावर आपण कधी नीट विचार करत नाही. आपण फ़क्त उत्तरं मिळवायची धडपड करतो पण मुळात प्रश्न काय याचा सखोल विचार आपल्याकडून होत नाही. फ़क्त उत्तरंच कठिण असतात असं नव्हे तर कधीकधी प्रश्नसुद्धा कठिण असतात, समीर, उदय, नंदनला पडणारया-तांब्यांनी शब्दात नेमक्या मांडलेल्या प्रश्नांसारखे.

षांताराम पवारांची भडक गुलाबी-पिवळ्या  रंगातली जी पुतना मावशी मुखपृष्ठावर विराजमान झालिये त्या वच्छीमावशीची ’माझी लाडकी पुतना मावशी’ ही शीर्षक कथा. ’लैंगिकता’ या विषयाकडे बघायची आपली दृष्टी किती साफ़ आणि सहज आहे यावर ही कथा तसेच ’थेंब थेंब तळं-थेंबे थेंबे गळं’ तसेच ’खुदको खुद..खुदही!’ या कथा वाचक किती समजूतदार पणे घेतोय हे ठरेल. ’लैंगिकता’ ही मानवाची अनघड अशी आदिम प्रेरणा आहे, भल्याभल्यांना चकवणारी.लेखकाने आपल्या कथांमधून लैंगिक उर्मी आणि व्यवहार यांच्या विविध रुपांचा शोध घेतलाय. जिथे प्रत्यक्षपणे हा विषय नाही तिथेही तो अपरिहार्यपणे डोकावतोच आहे. तांब्यांच्या कथेत स्त्री-पुरुष संबंधाविषयीचे विषय व्यापून राहिले आहेत पण, त्यातही पुरुषमनाचा मागोवा त्यांनी समर्थपणे घेतला आहे. हे करताना परंपरागत कुटुंबव्यवस्थेची, स्त्री-पुरुष संबंधांची अंधारी दारं थोडीफ़ार का हो‌ईना किलकिली केली आहेत. बेरकी पुतना मावशीसुद्धा आपल्या व्यावहारीक शहाणपणात कणभर का हो‌ईना सरतेशेवटी भर घालून जातेच.

’सी-सॉ’ ,’देव-दानवे नरा’ , ’झेपेना मज अढी, वैर कुठे’ ह्या श्याम मनोहरांच्या कथांच्या शीर्षकांची आठवण करुन देणारया कथा -
एकाच वेळी जगण्याच्या आधुनिक आणि आर्ष गाभ्याला स्पर्श करणारी, साध्यासुध्या जगण्याची ’गुरुविण कोण’-
आपल्या सभोवतालचं जग स्थायी असतं, आपण बदलत जातो. लहानपणी पाह्यलेली एखादी गोष्ट मोठेपणी आपल्याला वेगळी भासते. ती वस्तू बदललेली असते का? तर नाही. आपण बदललेलो असतो. पण आपल्यात नेमकं बदलतं तरी काय,या बदलण्याचा वेध घेणारी ’होवो होवो सृष्टी दृष्टी‌आड’ -.
कधीकधी  घटना एकदम साधी असते पण तिच्यामध्ये मायक्रोस्कोपिक पदरांचं जंजाळ असतं. त्या बारीक-बारीक तपशिलांमधून कथा आकाराला येते याचे उदाहरण असलेली ’बापूंच्या खुर्चीची गोष्ट’..
कोणतीही कथा असो, संस्कृती, सभ्यता यांचे मुळातले अर्थ तपासून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे.प्रत्येक गोष्टीबद्दलचा उलटसुलट विचार झाला आहे. उल्टाच्या उल्टा विचार म्हणजे सुलटा नसलेला विचारही मग ओघाने येतोच. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रातली दांभिकता, खोटेपणा तसेच कचखा‌ऊपणे भव्यदिव्य किंवा खरं श्रेष्ठ आहे ते नाकारतच आपण कसं जगतो याचं हे जबरदस्त चित्रण या कथांमध्ये झालेलं आहे.

अमर्याद प्रश्नांची तेव्हढीच अमर्याद उत्तरं वाचताना, व्यक्तिगत आणि समूहजाणिवांचा गुंता सोडवताना, त्यावर मनातल्या मनात बोलताना मनावर हलकासा  झाकोळ येतो न येतो तोच येते ’लेखकाचं डोस्कं आणि न्हावी’ही कथा आणि मग तांब्यांची कथा तिची स्थिरवृत्ती सोडून गतिमान होते.प्रकटीकरणाच्या उपरोधात्मक आणि तिरकस शैलीतुन कथा मजेदार उलगडत जाते.कथेचा उगम कसा होत असावा हे शोधू पाहणारया आणि त्यासाठी तिला नियंत्रितपणे ’घडवू’ पाहणारया लेखकाची आणि गणपा न्हाव्याची कथा प्रत्येकाने वाचावी, खुसखुसावं, लेखकाला दाद द्यावी आणि ताजतवानं हो‌ऊन पुढच्या कथेच्या जगात जगायला निघून जावं.

तांब्यांच्या कथेचं वैशिष्ट्य असे की ते समकालीन जगण्याबद्दल लिहीतात, त्या जगण्याचा एक भाग हो‌ऊन लिहीतात. कथेची भाषा या जगण्याच्या रितीचाच एक भाग आहे आणि म्हणूनच ती चोख , रोकडी आहे. ती काही झाकत नाही, सुशोभितही करत नाही. प्रत्येक कथा काहीतरी निराळा विचार सांगते, समाज, परंपरा यावर भाष्य करणाया कथा असल्या तरी त्यांचा स्वर टिपेचा नाही, शांत आहे.
आयुष्यात वाच्यता करता न येणारया बरयाच घटना असतात, खुद्द आपल्या व्यक्तिमत्वाला काळी, करडी किनार असते पण त्या काळोख्या कोपरयांना आपण चुटपुटत्या भावनेनंच, क्वचित गंड मनात घे‌ऊनच बघतो. पण आयुष्यातल्या डार्क प्रॉब्लेम्सना डार्क व्हिजननेच भिडावं असं काही नसतं. तांबे आपल्या कथेतुन सर्वप्रथम तो अंधार काय आहे ते सांगतात आणि मग खुबीने त्या अंधारातून त्यांनी शोधलेला-तात्पुता/कायमचा मा्र्ग सांगतात.

सर्वसाधारण कथा वाचताना तेच तेच अतिपरिचयाचे आयुष्य, त्याचत्याच नाट्यमय घटना, तीच ती तकलादू पात्रं यांतून ती कथा पूर्वी वाचलेली वाटावी इतकी ओळखीची वाटायला लागते, मग त्या कथेतून आपल्याही नकळत आपण मनाने बाहेर पडतो.
पण या सगळ्या ’जगण्या’बद्दलच्या गोष्टी आहेत. जगण्याविषयीचे अ-चाकोरीतले अनुभव सांगणारया या कथा अतिपरिचयाच्या शिळ्या कथांसारख्या ठोकळेबाज नाहीत. या संपतात तिथून चालूच राहणार आहेत कारण जगण्याला कसला आलाय आरंभ- शेवट? कुठल्यातरी बिंदूपासून सुरु व्हाव्या तशा त्या सुरु होतात आणि कुठेतरी संपतात. मुद्दामून केलेली वातावरणनिर्मिती नाही, कोणतीही डूब द्यायचा प्रयत्न नाही, आणि सर्वात महत्वाचं कुठलाही अभिनिवेश नाही. ह्या कथा घटनांमधून नाही तर घटनांमधल्या संकल्पनांमधून, पात्रांमधून उलगडत जातात. आणि म्हणूनच आपण या कथांमध्ये हरवून जातो आणि त्या संपतात तेव्हाच सापडतो.

जगताना बहुसंख्यांना काळाचं जाणीव तर असते पण क्वचितच कोणाला क्षणाचं भान असतं. या कथांमध्ये ते भान जपलेलं पदोपदी जाणवतं. जगण्याच्या रेट्यातही लहानसहान गोष्टींमधला आनंद शोधत-शोधत जाणारया कथा वाचायच्या असतील तर प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे असा हा कथासंग्रह- ’माझी लाडकी पुतना मावशी’.

7 comments:

BinaryBandya™ said...

फार छान लिहिलं आहेस .
नक्कीच वाचेन हे पुस्तक

Shraddha Bhowad said...

हे बीबी,
थॅंक्स!
मुखपृष्ठ पाहून बिचकला वगैरे नाहीस, कटेंट बघून तुला घाम वगैरे फ़ुटला नाही, हा फ़ार मोठा रिलीफ़ वाटला. हुश्श!
खरंच वाच.

BinaryBandya™ said...

थोडा बिचकलो , पण वाचेन नक्की :)

आणि "बीबी" जरा स्त्रीलिंगी वाटतंय :P

Shraddha Bhowad said...

बाबा रे,
ज्याच्या नावात ’बाई आणि ’नारी’ दोन्ही आहेत त्याने असं म्हणावं? प्च!
ज्योक जुना आहे पण चालून जावा. :D

Shraddha Bhowad said...

ज्या स्पर्धेसाठी मुळात लिहीलं हे लिहीलं होतं त्या ’मायबोली’ या संकेतस्थळावरच्या ’कृषीवल-मायबोली रसग्रहण स्पर्धे’चा दुवा:

http://www.maayboli.com/node/27732

इथे आणखीही उत्तमोत्तम रसग्रहणं वाचू शकता.

Nil Arte said...

नुकतंच जयंत पवार याचं "फिनिक्सच्या राखेतून उठला मोर" वाचलं ते पण मस्तच

Shraddha Bhowad said...

निलेश,
’टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन ’ही एक अत्यंत महान कथा आहे असं माझं मत आहे.

 
Designed by Lena