’बेगम बर्वे’ नावाचं गिरमिट!

तुम्ही ’चारशे कोटी विसरभोळे’ वाचलंय? ’सात सक्कं त्रेचाळीस’ वाचलंय? नसतील वाचली तर ही पुस्तकं वाचल्यानंतर येणारं झपाटलेपण काय आहे हे कळणं शक्य नाही. आणि हे झपाटलेपण येत नसेल तर मी अंगात आल्यासारखी रात्रीची ’बेगम बर्वे’ या नाटकावर  ही पोस्ट का लिहीतेय याचाही जाम पत्ता लागणं शक्य नाही. पण लिहीणं माझ्यासाठी  गरजेचं आहे. मी सकाळपर्यंत थांबले की रात्रीचे विचार मूर्खपणाचे वाटणार याची खात्री आहे. मग मी ते कधीच लिहीणार नाही आणि मग ते विचार आकसत आकसत जरदाळूच्या टणक बी सारखे होणार आणि माझ्या मेंदूत खडखड करत बसणार, त्यापेक्षा लिहीते. मग ते विचार आणि तुम्ही -काय ते बघून घ्या.

तर, बेगम बर्वे-

मी जन्मायच्याही आधी सात वर्षं आधी हे नाटक लिहीलं गेलंय. मी आज ज्या वयात आहे त्या वयात आळेकरांनी हे नाटक लिहून ते अफ़लातूनरित्या एक्झिक्यूट केलं. केलं तर असं केलं की आजसुद्धा त्याबद्दल निव्वळ निव्वळ आदर आणि ’awe' मध्येच बोललं जातं.  त्याच्याबद्दल इतकं काही बोललं गेलं आहे, मी ऐकलं आहे की मी लायब्ररीत जाऊन मिळवून ते वाचलं. 
मला एकच पुस्तक पुन्हापुन्हा वाचायची खोड आहे.पुस्तक पुन्हापुन्हा वाचलं की दुसरया-तिसरया वाचनात आपल्याला पहिल्या वाचनात कळलं त्यापेक्षा वेगळ्यारितीने कळतंय असं माझं मलाच जाणवतं. अर्थात मी ’बेगम बर्वे’सुद्धा तीन वेळा वाचलं.

मी ’बेगम बर्वे’ पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला अत्यंत जुनी प्रत वाचायला मिळाली होती, त्यात आळेकरांच्या पुढच्या ’बेगम बर्वे’च्या नव्या आवृत्त्यांमध्ये आहे तसं रेखा साने-इनामदार यांनी केलेलं ऍनालिसिस नव्हतं, त्यामुळे माझं पहिलं वाचन हे अजिबात इन्फ़्लू‌एन्स्ड नव्हतं, त्या वाचनात इतरांचे रेडीमेड विचार मिसळून त्याचं निव्वळ पॉलिटीक्स झालं नव्ह्तं, नाटक मुघल काळात घडतंय की कोणत्या-याचीही कल्पना नव्हती, एकदम कोरी पाटी. त्यामुळे मला पहिल्यांदा ’बेगम बर्वे’ जे कळलं ते काहीसं असं होतं- 

यातला श्यामराव बुली आहे, शिवराळ आहे, डॉमिनंट, ऑब्सेसिव्ह आहे आणि अत्यंत लबाड आहे असा प्राथमिक निष्कर्ष मी काढला जो कोणीही काढेल. 
हे सबंध नाटक थोडं थोडं वास्तव आणि थोडी थोडी फ़ॅंटसी यात घडते.
या नाटकात बर्वे ’गे’ असण्याचा किंवा शामराव आणि बर्वे यांच्यामधल्या लैंगिक संबंधांचा थेट उल्लेख कुठेही नाही-त्यांचं नातं होस्ट आणि पॅरासा‌ईट सारखं आहे, या नाटकाची थीमच मुळी परावलंबनातून आलेली गुंतागुंत आहे. जावडेकर बर्वेवर, मित्र म्हणून बावडेकरवर, बर्वे श्यामराववर, श्यामराव त्याच्या मनाविरुद्धा आर्थिक कारणांकरता बर्वेवर, बर्वे पहिल्यांदा श्यामराववर नंतर जावडेकरवर, जावडेकर -बावडेकर नोकरीवर असं परावलंबनाचं मोठठच्या मोठठं जाळं आहे. ह्यातली एखादी लिंक निसटली की त्याचं नाटक हो‌ईल अशा रितीने ते घडवल्यासारखं आहे. 
बावडेकर हे पात्र फ़ारशा सुस्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर आलंच नाही, संपूर्ण नाटकात ते अंडरडॉगसारखं वाटत राहिलं, बर्वे जावडेकरांबरोबर आल्याने जावडेकरांच्या पात्राला वॉक-ओव्हर मिळालाय पण बर्वे बावडेकरांबरोबर असता तर जावडेकरांचा बावडेकर झाला असता असं वाटत राहिलं.
बर्वे हाच नलावडेबा‌ई आहे, श्यामराव हाच सूत्रधार कम प्यून आहे, एका बे‌अरींगमध्ये असताना ते अचानक निसटल्यासारखे दुसरया बे‌अरींगमध्ये शिरतात. उदा.-नलावडेबा‌ई अचानक बत्तीविषयी, कंपनीच्या मालकाविषयी बोलायला लागते हे मला कळलं.
एकंदरच जे शुद्धीवर असताना, सगळे सेन्सेस सतर्क असताना घडू शकत नाही असं वाटतंय ते फ़ॅंटसीत घडतंय असा ढोबळ नियम लावला की नाटक कळलंय असं वाटू शकतं असं मला पहिल्या वाचनात वाटलं.
--

श्यामराव हा बहुजन समाजाचा आहे (असं साने-इनामदार यांनी ’बेगम बर्वे विषयी’ या त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे) हे मला काही पहिल्यांदा लक्षात आलं नव्हतं, नंतर लक्ष दे‌ऊन वाचल्यावर त्याच्या भाषेवरुन असा अर्थ निघू शकतो असं वाटतं पण तसं असलंच पाहिजे याची गरज नाही वाटली किंवा त्याने काही फ़रक पडतो असे वाटले नाही . मी संगीत नाटकं बघितलेली नाहीत, मी नुकताच आलेला ’बालगंधर्व’ हा पिक्चर सुद्धा बघितलेला नाही. मला तो बघावासाच वाटला नाही. त्यामुळे बर्वेचं त्या काळात रमून असणं, त्याची गायलेली पदं, त्याचा नॉ्स्टॅल्जिया मला भिडला नाही, मला फ़क्त त्याच्या पुरुषी देहातलं सरावलेलं स्त्रीपण कळलं, मला तेव्हढं पुरेसं वाटलं. आता मला असं वाटणं चूक की बरोबर की थोडं थोडं चूक, थोडं थोडं बरोबर हे माहीत नाही.


नंतर वाचताना मला ही फ़ॅटसी नसावीच असंही एका ठिकाणी वाटून गेलं. यातली पात्रं भ्रमात जगतात असं वाटलं पण फ़ॅंटसी आणि भ्रम यांत मी मला स्वत:लाच पटेलसा हुशार फ़रक (स्वत:लाच) सांगू न शकल्याने नंतर तो विचार कटाप केला. स्त्री ’अफ़ोर्ड’ न करु शकण्यापायी जावडेकरांनी मेल बर्वेमधल्या फ़ीमेलवर भागवून घेतलं असावं (नो फ़ॅंटसी, पण चॉईस नसण्यातून किंवा डेस्परेशनमधून) आणि पुढच्या ज्या घटना बर्वेच्या पुरुष असण्याला कॉंट्रॅडीक्ट करत जातील त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा वेळ मारुन नेणे असा प्रकारही वाटला, पण त्याही वाटण्यात नंतर दम राहिला नाही.

नंतर मला प्रश्न पडला की ही ह्या चौघाजणांची कलेक्टीव्ह फ़ॅंटसी आहे (एकमेकावर ओव्हरलॅप होणारी) की जावडेकर, बावडेकर, बर्वे किंवा शामराव यापैकी कोणातरी एकाचीच? म्हणजे हे बर्वेच्याच फ़ॅटसीमध्ये घडतंय का कुणाच्या? की ही या चौघांपेक्षाही वेगळ्या कोणाचीतरी फ़ॅटसी आहे? नाटककाराची? म्हणजे हे सगळं नाटक आळेकर आपल्या डोक्यात घड्वतायेत आणि हे चौघे रोल प्ले करतायेत आणि त्यांना वाटेल तेव्हा ते ट्विस्ट आणणार आहेत, त्यांना वाटेल तेव्हा ते एखाद्याला भलताच रोल करायला सांगणार आहेत. 
म्हणजे मी जर वाचताना ती पात्रं स्टेजवर कशी वावरतायेत हे इमॅजिन करत असेन (म्हणजे मी करतेच) तर ही चौघं असताना स्टेजवर नसलेले(नाटककार) आळेकर त्यांना कठपुतळीसारखं नाचवतायेत असा फ़ील यावा ,म्हणजे त्यांचा अदृश्य वावर किंवा नसूनही ’असणं’ व्हॉटेव्हर जाणवत रहावं असं काहीतरी. म्हणजे कथानक घडतंय पण त्या कथानकात ही चौघं असूनही ती ते कथानक घडवत नाहीत. हे आता बघतोय ते झालं एक नाटक पण नाटककाराच्या मनात असेल तर तो दुसरंही काही घडवू शकला असता, आताही घडवू शकेल असं सारखं वाटत राहतं. 
आता ह्यातलं बरोबर किती, चूक किती हे मला माहित नाही, असं मला वाटलं खरं.

प्रत्येक फ़ॅंटसीला अंत असतोच, शेवटी फ़ॅंटसीतून बाहेर पडून सत्यसृष्टीत यावंच लागतं अशा अर्थाचा शेवट वाचताना मात्र "च्यायला! हे असंच होणार हे आपल्यालाही माहित होतं की!" असा फ़ील आला. तो शेवट मात्र आळेकरांनी जसा आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या रितीने केला नसता असं वाटलं.

मलातरी ’बेगम बर्वे’ वाचून काय आठवलं माहित आहे का? मला एकाच वेळी तीन गोष्टी आठवल्या.

एक म्हणजे ’लेगो’ गेम. त्यात तुकड्यांवर तुकडे जुळवून ड्रायव्हर, गाडी, ट्रॅक्टर वगैरे बनवायचा असतो. एखादंदुसरंच मूल असं असतं जे ड्रायव्हरच्या जागी ड्रायव्हरला न बसवता तिथे चाक लावून बघेल, गाडीच्या चाकाच्या सिमिट्रीवर काहीतरी प्रयोग करुन बघेल,  मागची चाकं मोठी आणि पुढची छोटी असं काहीतरी मॉडेल असेल तर पुढेच मोठी चाकं लावून ती कशी कलंडते हे बघेल, हे सगळं करुन झाल्यावर मात्र तो ते मॉडेल जसं असायला हवं होत किंवा ऍटलीस्ट सगळे जसं म्हणतायेत किंवा ब्रोशरमध्ये जसं दाखवलंय तशा रितीने्च असेंबल करेल. मला ’बेगम बर्वे’ हा सतीश आळेकरांनी केलेला असाच काहीतरी खेळ वाटला. 

किंवा मग चित्र बघतानाची पद्धत. 
म्हणजे मी चित्र बघताना आपण वाचताना करतो तशी चित्राच्या डाव्या कोपरयाकडून सुरुवात करते. मग चित्राचा अवकाश, चित्रातली रंगसंगती, एकंदर पोत डोळ्यांनीच (क्वचित हात लावून) चाचपते.पण समजा, माझी चित्र बघायची सवयीची पद्धत सोडून मी भस्सकन चित्राच्या मध्यभागीच नजर खुपसली तर काय हो‌ईल? चित्राच्या कडेकडेने प्रवास करून मध्यभागी येण्यापेक्षा मी मध्यभागापाशी सुरुवात करुन कॉन्सेंट्रीक सर्कल्स मध्ये चित्र बघत गेले तर कसं? किंवा वरुन खाली चित्र बघत येंण्यापेक्षा खालून वर बघत गेले तर दुसरया पद्धतींनी बघितल्यावर उमटलेलं चित्र पहिल्या पद्धतीने बघितल्यावर डोक्यात उमटलेल्या चित्रापेक्षा वेगळं असेल का? दुसरया पद्धतीने मला पहिल्या पद्धतीने जेव्हढं कळलं तेव्हढं चित्र कळेल का? असा विचार माझ्या डोक्यात येतो. तेव्हा मग वाटतं की न कळायला काय झालं? चित्रातले इथले तिथले तपशील एकत्र करुन ते डोक्यात सुसंगत जुळवायला लागतील एव्हढंच. 
’बेगम बर्वे’ मला चित्र बघायची ती दुसरी पद्धत वाटली. अगदी लिटरली नाही, पण बरीचशी तशी.

किंवा मग  पाब्लो पिकासोने एक ढांसू तंत्र विकसित केलं होतं ते म्हणजे क्युबिझ्मचं, ते आठवलं. क्युबिझम म्हणजे एक पूर्ण चित्र असतं तर ते फ़ाडून, डीकन्स्ट्रक्ट करुन होतं तसं न लावता मनाला ये‌ईल तसं, मूड लागेल तसं लावलं की कसं दिसेल, तशी तो चित्रं काढतो. म्हणजे तो मुळातच चित्र काढताना ते डीकन्स्ट्रक्ट केल्यावर कसं दिसेल तसंच चित्र काढतो. त्याला क्युबिझ्म म्हणतात. 

असं खूप खूप, काय काय वाटलं. हे वाटलं ते मी अर्थात ज्यांनी ’बे.ब’ वाचलंय त्यांच्याबरोबर शेयर केलं. मला ह्या वाचकांत दोनच प्रकार दिसले. एक- हे नाटक पूर्ण समजलंय असा दावा करणारे आणि दोन- हे नाटक अजिबातच समजलं नाही असं मान्य करणारे. मला अधलंमधलं त्रिशंकू कोणी भेटलंच नाही. बरयाच जणांना त्यांच्या मते खूप ऑब्व्हियस प्रश्न पडले होते जे मला पहिल्या वाचनात सुद्धा पडले नाहीत (Yes, I am bragging). उदा. बर्वेला दिवस जातात. हे कसं काय. पुरुषाला दिवस कसे काय जा‌ऊ शकतील? बर्वे स्त्रीवेशात स्त्री म्हणून खपून जा‌ईल कदाचित पण जावडेकरला कळलं असेलच नं, they are supposed to be नवरा-बायको, right?  इत्यादी.
मी ती ’चर्चा’ तिथेच बंद केली हे सांगायची गरजच नाही.

तर हे असं झालं.

’बेगम बर्वे’ लिहीण्याला कारणीभूत झालेले तीन प्रसंग आळेकरांनी त्यांच्या मुलाखतीतून वारंवार सांगीतलेत आणि ते फ़क्त तेव्हढंच सांगतात. पण ते तीन प्रसंग त्यांनी अशारितीने एक्झिक्यूट का केलेत हे मात्र ज्याचं त्यानं करायचं इंटरप्रीटेशन आहे, आळेकर त्याची मजा बघत बसतात. माझं इंटरप्रीटेशन मी माझ्यापद्धतीने केलंय,चूक-बरोबर याचा न खेद आहे न खंत. 

पण पात्रं कल्पून वाचणं आणि ती प्रत्यक्ष रंगमंचावर दृश्य झालेली पाहणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एलकुंचवारांची  गार्बो वाचणं आणि मोहित टाकळकरच्या गार्बोला पाहणं ह्या दोन वेगळे अनुभव होते. पुस्तक वाचून डोकं भीsssर्र् झाल्यावर आता मला 'बेगम बर्वे’ पाहायचं होतं. 
काल माझं तेही पाहून झालंय. 
तो वाचनापेक्षा अंमळ सोपा प्रकार आहे हे मात्र खरं. डोक्याला एव्हढं गिरमिट लागत नाही.

लॉर्का.

होला! कोमो एस्ता?

कोणतीही नवी गोष्ट शिकताना त्या गोष्टीचं वेड असणं आवश्यक असतं.
स्पॅनिश भाषा आणि स्पॅनिश कवितांबद्दलचं माझं वेड खूप मागे ट्रेस करत गेलं तर ते गौरीच्या अणूपाशी येऊन थांबतं. शोध शोध शोधला तरी अणूचा बोर्हेज काही मला मिळेना पण बोर्हेजला शोधताना मला सापडला लॉर्का.

फ़ेडरिको गार्सिया लॉर्का.
कोणत्याही कलंदर कलाकाराची असते तशी वादळी लाईफ़स्टाईल.प्रसिद्ध चित्रकार साल्वाडोर दालीचा बॉयफ़्रेंड म्हणून ओळखल्या जाणारया लॉर्काला त्याचा स्वत:चा आवाज सापडायला वेळ लागला. प्रामुख्याने विरह, तुटलेपण, लैंगिक जाणिवा, समलिंगी संबंधांवर आपल्या कविता- नाटकांमधून भाष्य करणारया लॉर्काच्या लिखाणाला जिवंतपणी मिळाली नाही तितकी ओळख त्याच्या मृत्यूनंतर मिळाली. स्पॅनिश सिव्हील वॉर मधल्या त्याच्या हत्येनंतर लॉर्काच्या कविता झोतात आल्या.


"..माझ्या माथ्यावर चंद्राचं अमरत्व आहे,
मी झोपू इच्छितो एक क्षणभर,
एखादा तास, एक रात्र किंवा एक आठवडा, एखाद वर्ष
किंवा कदाचित एक शतकभर..
मी खूप थकून गेलोय.."

असं म्हणणारा लॉर्का कवितांमध्ये हळवा हळवा होऊन जातो. स्पेनमध्ये अराजक माजलेलं असताना त्याने लिहीलेली The Fable and Round of the Three Friends मधली ही कविता लॉर्काला खूप ठळकपणे आपल्यासमोर उभा करते.
--



तुमच्यात
एखाद्या कवीला
ठार करायची
काय पद्धत आहे?

झण्णकन छाताडातच गोळी घालता का?
ज्यातल्या
दडपलेल्या इच्छा आणि न संपणारया भयाने त्याला बंदीवान करुन ठेवलंय
तुम्ही नियम, कायदे आणि फ़ाकडू सैन्याने त्याला करु पाहाताय
त्याहून अंमळ जास्तच वेळ.

का मग थेट डोक्यातच गोळी घालता
जिथे
कधीकाळी मुक्तपणे गुणगुणलेल्या गीतांची भुते,
"आमच्याकडे बघा हो कोणीतरी!" घुसमटत आक्रोशणारया, व्यक्त व्हायला धडपडणारया जाणीवांचा
बुजबुजाट आहे नुसता

कसं? अशीच पद्धत आहे नं?

" आता हे लिहीता लिहीता कळलंय मी कधीचाच ठार झालोय
ते मात्र मला शोधत राहिले मी जिवंत असताना असलो असतो अशा ठिकाणी
कॅफ़े, चर्च, स्मशानांमध्ये...
..पण त्यांना काही मी सापडलो नाही.
कमालेय, त्यांना मी कधीच सापडलो नाही?
हं! खरंय,
त्यांना मी कधीच सापडलो नाही"

-लॉर्का

--
बोर्हेज नाही तर नाही पण लॉर्का ओळखीचा झाला. पुढचे काही दिवस छान जाणार!
आदिओस!

तस्लिमा उवाच..

वादळांना नेहमी स्त्रियांची नावं असतात. ती जोपर्यंत खवळून उठत नाहीत तोपर्यंत त्यांचं अस्तित्व कोणाला जाणवत नाही पण एकदा का त्यांनी आपला इंगा दाखवला की ती आपल्या वाटेत येणारया अशाचीही तमा कशी बाळगत नाहीत आणि काय उलथापालथ करु शकतात याची चुणूक दाखवतात.
’तस्लिमा नसरीन’ नावाचं वादळ गेल्या दोन दशकापासून घोंघावतंय ते काही अजून शमायला तयार नाही.
’लज्जा’ पासून परजलेल्या तिच्या बंडखोर लेखणीचा धांदोळा घेतला  की ’ धर्मनिरपेक्ष मानवतावादी लेखिका’ ते ”स्त्रीवादी लेखिका’ असा तिचा प्रवास झालेला दिसतो. ’नारी कोनो देश ना‌ई’ अर्थात ’नो कंट्री फ़ॉर विमेन’ या पुस्तकात कट्टर स्त्रीवादी भूमिकेतून लिहीणारी तस्लिमा तिच्या नेहमीच्याच शैलीत पुरुषप्रधान संस्कृती, तिचं कोतेपण यांचं वाभाडे काढताना दिसतेय. या पुस्तकातल्या ४६ लेखातून तिने जणू त्यांच्यावर ४६ कोरडेच ओढलेत. तिचे हे लेख म्हणजे फ़ावल्या वेळेतली चिंतनं नव्हेत तर जगाकडे, स्त्रियांकडे, शोषितांकडे बघायची एक नवी दृष्टी देणारी स्फ़ुट स्वगतं आहेत.

लेखक आपली पाळंमुळं सर्वसामान्यांमध्ये शोधतो. त्यांच्या वेदनेशी एकरुप झाल्याशिवाय त्या व्यक्तीची त्यांच्यासाठी चाललेली झुंज वैश्विक हो‌ऊच शकत नाही. तस्लिमाच्या लेखांमध्ये पार राजकीय उच्चासनावरच्या निलोफ़रसारख्या स्त्रियांपासून ते बिरभूमच्या रिक्षावाल्याची मुलगी सानेरापर्यंतच्या सर्व स्त्रिया हजेरी लावतात. तिच्या लेखांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि तेच अभिप्रेत आहे- ते म्हणजे आर्थिक स्तर कोणताही असो, स्त्रीला एकसमानच वागणूक मिळते ती म्हणजे दुय्यमत्वाची, गुलामाची. या सर्व स्त्रियांच्या आनंदाशी, दु:खाशी, वेदनेशी तिचं जोडलेपण जाणवतं. उपोषणाला बसलेल्या सिंगूरच्या स्त्रियांच्या अफ़ाट मनोबलाने ती स्तिमित होते-नतमस्तक होते, बळी पडलेल्या प्रत्येक स्त्रीच्या जाण्याने तिच्या आयुष्यात न भरुन येणारी पोकळी निर्माण होते. पुरुषी दडपशाहीच्या चरकात रगडल्या गेलेल्या प्रत्येकीबद्दल तस्लिमाला तेव्हढंच आणि तितकंच ममत्व वाटतं. पुरुषाचा आधार असणं हे स्त्रीच्या समस्यांचं निराकरण करु शकत नाही हे तिने या लेखांमधून पोटतिडीकीने सांगायचा प्रयत्न केला आहे.स्त्रीच्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी कुठे ना कुठेतरी पुरुषांवर नको तेव्हढा विश्वास टाकणाच्या स्त्रीच्या मूर्खपणाच कारणीभूत आहे असं तिचं म्हणणं आहे. कुठल्याही सबळ  कारणाच्या अभावावर उभ्या असलेल्या लग्नसंस्थेने कर्तृत्वनान गुणी मुलींचे मातेरे झाल्याचे दाखले दे‌ऊन ’विवाहसंस्था’ हा स्त्रियांसाठी भयंकर मोठा शाप असल्याचं सांगते.फ़क्त स्त्रीबद्दलच नाही तर अन्य दुबळ्या, शोषित घटकांबद्दलचा तिचा उदारमतवादी, सहानुभूत दृष्टीकोन लेखांमधून जाणवतो. तस्लिमा समलिंगी संबंधांची पाठराखण करते, कोणाच्याही लैंगिक आवडीनिवडी परस्पर ठरवायचा आणि त्यात ढवळाढवळ करायचा अधिकार समाजाला नाही असे ती निक्षून सांगते.

शतकनुशतके चालत आलेल्या रुढींना, समजांना आव्हान देण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही, प्रचलित रुढी व समज का आहेत? यावर प्रश्नचिन्ह डकवण्याचेही-पण तस्लिमाने ते केलं. तिच्या लिखाणामुळे गहबज उडाला तो याचमुळे. पेशाने मूळची डॉक्टर असलेली तस्लिमा तिच्या लेखणीचं स्कालपेल चालवत पारंपारीक कल्पनांना छेद देत ती तिचं भेदक विश्लेषण मांडते तेव्हा सर्व गोष्टी पार मुळापासून उघड्यावाघड्या हो‌ऊन आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या दिसतात.

स्त्रीवर लादली गेलेली बंधनं ही तिच्या भल्याकरताच आहेत असा स्त्रीचा समज करुन दिलेला असतो पण ती आपल्या भल्याची कुठल्या प्रकारे आहेत याचा पत्ताच ती बंधनं शतकानुशतके आपल्या अंगावर वागवणारया स्त्रीला नसतो. कधीकधी ती बंधनं तिच्यावर लादणारया खुद्द पुरुषालाही नसतो. त्याबद्दल तिला विचार करायचीही फ़ुरसत मिळू नये याची दक्षता घेतली गेलेली असते. स्त्रीला मालकी हक्काची, उपभोगाची वस्तू समजण्याची पुरुषाची वृत्ती पुरुषाच्याही नकळत त्याच्या नसानसातून भिनलेली असते किंबहुना समाजाने ती त्याला बहाल केलेली असते.हे पुरुषांचं आप्पलपोटेपण, कुटुंबसंस्थेत वारंवार निदर्शनास येणारा पुरुषी दुटप्पीपणा, यातून होणारी स्त्रीची ससेहोलपट याचं वास्तवात दडलेलं चित्रण, स्त्री-पुरुष संबंध, सेक्स यांची ऍनाटॉमी या सर्वांचा लेखाजोखा मांडणारे बरेच लेख या पुस्तकात आहेत.स्त्रीहक्क पायदळी फ़क्त अडाणी, गरीब समाजातच नाही तर सभ्यपणाचा बुरखा पांघरुन वावरणारया पांढरपेशा समाजातही स्त्री हक्कांची पायमल्ली होताना दिसते, तिथे तिला मनुष्यप्रण्या‌इतकाही दर्जा दिला जात नाही हे तिने दाखल्यांसह दिले आहे.तस्लिमाच्या मते शिक्षण घेतलं, स्वत:च्या पायावर उभं राहणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे आणि कॉलेज-युनिव्हर्सिटीमधून घेतलेली पदवी म्हणजे शिक्षण नव्हे. आपल्या अधिकारांबाबतचं समूळ ज्ञान आणि त्या अधिकारांबद्दल आग्रही असणं म्हणजे शिक्षण असं आग्रही प्रतिपादन ती करताना दिसते.
एका वेळी पुरुषी वर्चस्वाबद्दल बोलतानाच ती वेगवेगळ्या पुरुषांच्या प्रेमात पडत राहते, जुन्याच चुका करत राहते, घाव सोसत राहते, जुन्या चुकांमधून नवे धडे शिकते. यांत कधीतरी कुठेतरी पुरुषी नसलेला  पुरुष भेटेल याची आशा दिसते किंवा तिच्या शरीराच्या गरजेचा अपरिहार्य विचार.

कट्टर धर्मवाद्यांवर,धर्मनिरपेक्षतेचा बुरखा चढवणारयांवर ती कडकडून हल्ला चढवते, पुरुषांच्या आक्रमकपणावर भाळणारया स्त्रियांना चार समजुतीचे शब्द सुनावते. पुरुषी हिंसा, उघड‌उघड सापत्न वागणूक, बालविवाह, पुरुषांचे बहुविवाह, त्या अपमानाच्या धगीत मुक्या बिचारया मेंढरांसारख्या उभं आयुष्य़ मुकाट जाळणारया स्त्रिया, चारित्र्यहिन स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याचा कायदा करणारी मुजोर सरकारं, बुरख्याची जबरदस्ती, पतीची आज्ञा न पाळल्याबद्दल होणारी मारहाण, भीतीप्रद तिहेरी ’तलाक’, शोषण-गुलामगिरी सगळ्या-सगळ्याचं दाहक वास्तव तस्लिमाच्या लेखामधून जळजळत राहतं, भळभळत राहतं.

धर्माने केलेली स्त्रीची कोंडी हा केवळ बांगलादेशचाच नाही तर आशिया खंडाचाच विशेष आहे. तस्लिमाच्या झुंजीचा काळ हा मुळातच आशियातील खूप मोठ्या उलथापालथीचा कालखंड आहे. याच काळात इस्लामिक राष्ट्रांमध्ये जीवघेणी युद्ध लढली गेली, भारतीय उपखंडातले सततचे पेटते वातावरण, पत्त्यांसारखी कोसळलेली सरकारं, त्यातून राजकीय खेळ्यांना आलेला ऊत या सगळ्या राजकीय सुंदोपसुंदीमधून राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचा परामर्ष घेत तस्लिमा स्त्रीच्या अस्मितेचा शोध घेते आहे. हे सर्व लेख त्याचंच प्रतिबिंब आहेत.

तस्लिमाचे हे लेख वरवर जरी अवघ्या स्त्रीवर्गाभोवती रचले गेलेले आहेत असं वाटलं तरी तस्लिमा बांगला स्त्रियांना केंद्रस्थानी ठे‌ऊनच बोलतेय असं वाटत राहतं. बांगला स्त्रिया, पुरुष यांचे मनोव्यापार, स्वभावविशेष, बांगला संस्कृती, बांगला राजकारण याबद्दल जास्त मनस्वीपणे लिहीते कारण ती खुद्द बांगला आहे. ज्या बांग्लादेशवर तिचं आत्यंतिक प्रेम होतं तिथल्या कट्टर धर्मवाद्यांनी काढलेल्या फ़तव्यांमुळे तिला तो देश सोडावा लागला. तस्लिमा म्हणते स्त्रिला देश वगैरे काही नसतोच पण तस्लिमाला कागदोपत्रीही देशोधडीला लावलं गेलं. तस्लिमा पाकोळीसारखी देशोदेशी भिरभिरत राहिली पण तिचं आपलं मायदेशावरचं प्रेम आटलेलं नाही हे दिसतंच.

हे लिखाण म्हणजे कट्टर धर्मवाद्यांच्या लाडक्या ’नष्ट मेयेर’ नाठाळ मुलीची वर्षानुवर्षाची ठसठस आहे.तस्लिमाला माहितेय की स्त्रियांना स्वातंत्र्य कोणी बहाल करणार नाहीये किंवा आयतं देणार नाहीये, ते त्यांचं त्यांनीच लढून मिळवायचं आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत व्यवस्थित ब्रेनवॉश झालेल्या स्त्रियांना हे जोपर्यंत उमजत नाही तोपर्यंत गुलामगिरीचा वसा पिढ्यानुपिढ्या चालूच राहणार आणि म्हणूनच तस्लिमाने या पुस्तकाचा डाव मांडल्यासारखा वाटतो. एकेकाळी वर्जिनीया वूल्फ़ने म्हटलं होतं की ’स्त्रीला देशच नसतो-कधीही", त्याला इतकी वर्षं लोटली तरी परिस्थितीत तिळमात्रही फ़रक पडलेला नाही हे खेदजनक आहे. तस्लिमा तिचं काम ती या आधीही करत होती, करत राहील पण ती खरी वाट बघतेय ती युगानुयुगे चाललेल्या या चिरनिद्रेतून स्त्रियांना जाग येण्याची. तसं घडेल तो सुदिन म्हणायचा जेव्हा ’नारी कोनो देश ना‌ई’ असं कडवटपणे म्हणायची पाळी कोणत्याच स्त्रीवर येणार नाही.
 
Designed by Lena