या सा-या जखमी आयुष्याचं..

दर वर्षी 13 जुलैला मलिका अमरशेखांची ही ओळ आठवते आणि कोणीतरी अणकुचीदार सु‌ई छाताडात खुपसते आहे अशी वेदना होते. मला खूप दुःख झालं, वा‌ईट वाटलं तर कसं वाटेल याची मी ब-याचदा कल्पना करून पाहिलेली आहे, पण, प्रत्येक वेळी माझी कल्पना तोकडी पडते. काही माणसं आज आपल्यासोबत नसण्याचं दुःख मी नेहमी माझ्यासोबतच वागवत असते. कमल देसा‌ई असो, अॅन रँड असो वा मरणाच्या भीतीने आत्महत्या करणारी व्हर्जिनिया असो. आपली आवडती माणसं आपल्यापासून दूर गेली, आपल्यापासून तुटली तो काळ-वेळ-दिवस आपल्या नेहमी लक्षात असतो. लक्षात ठेवायचा नाही म्हटला तरी राहतो.

बरोब्बर साठ वर्षांपूर्वी याच दिवशीद फ्रिदाने या जगाचा दिमाखात, शांतपणे निरोप घेतला होता.

--

काही माणसं जात्याच सुंदर असतात.

ज्या लोकांनी पराभव पाहिला आहे, वेदना, भोग भो्गले आहेत, अविरत संघर्ष केला आहे, खूप काही गमावले आहे आणि त्या खोल खोल गर्तेतूनही त्या माणसांनी जगत राहण्याचा मार्ग शोधून काढला आहे ती माणसं अतिशय सुंदर असतात.

आणि फ्रिदा का‌अलो अतिशय सुंदर होती.

--

आपलं असणं, आपल्याला जे काही वाटतं त्यात छान छान काहीच नसतं. त्याने अतोनात त्रास होतो. प्रेम म्हणजे किती छान असं काहीतरी लोकांच्या मनात भरवून दिलं गेलेलं असतं. पण नाही. प्रेम छानछान मुळीच नसतं आणि काहीतरी वाटणं तर खूप अस्वस्थ करणारं असतं. पण ही अस्वस्थता, हे दुखरंपण म्हणजे काहीतरी भयंकर, घातक आहे असं लोकांना वाटतं, त्यामुळे काही लोकांना स्वतःची भीती वाटते, त्यांच्या असण्याची, त्यांच्या वास्तवाची, त्यांच्या वाटण्याची भीती वाटते.  फ्रिदाला ती कधीच वाटली नाही. उलट, हे वाटणं, असणं, तिचं ढळढळीत वास्तव हेच तिचं सर्वकाही होतं. तिने म्हटलंच आहे, "नुन्का पिन्तो सु‌एन्योज ओ पासाडीयाज, पिन्तो मि प्रोपिया रि‌अॅलिदाद!" पाब्लो पिकासो त्यांच्या पेन्टींग्जबद्दल बोलताना म्हणतो की, मला माझी पेन्टींग्ज स्वप्नात दिसतात आणि मग मी ती स्वप्नं पेन्ट करतो. फ्रिदाने तिची स्वप्नं किंवा दुःस्वप्नं कधीच पेण्ट केली नाहीत तिने कॅन्व्हासवर उतरवलं ते तिचं शुद्ध वास्तव, जसं आहे तसं तसं, त्यात काहीही फेरफार न करता. चित्रं काढणं ही तिची गरज होती, जशी लिहीणं ही माझी गरज आहे.

--

फ्रिदाबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल खूप प्रवाद आहेत. ती वादळी आयुष्य जगली. तिच्यासारखे आपलेही आपल्याशी, इतरांशी आणि एकंदर ब-दयाच गोष्टींशी जे झगडे चालू असतात त्यातून आपण तदनुभूती म्हणजे एम्पथी शिकतो. तिची पेन्टींग्ज पाहिल्यानंतर, तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यानंतर मला तिची वेदना थोडीफार का हो‌ईना कळू शकते, कोणीतरी टाकून देणं मला कळू शकतं, माझ्यावर कोणीच प्रेम न करणंही मला कळू शकतं. पण त्याहूनही मी जगत राहते. मला हे बळ फ्रिदाने दिलेलं आहे.

फ्रिदाने तिची स्वतःचीच बरीच पोर्टेट्स काढली आहेत. त्याबद्दल बोलताना ती म्हणते, मी खूपदा एकटीच असते. आणि तिला मी अगदी चांगली ओळखते अशी व्यक्ती मीच आहे.
तिची पेन्टीग्ज ही तिची डायरी होती.

कोणी इतकं आपल्यासारखं कसं काय असू शकतं? हं?

--

मला कधीतरी असं लिहायचंय की जे वाचताना लोकं ते समोरच्या क्रीनवर, पानावर लिहीलं गेलं आहे हे विसरून ते शब्दशः जगतील. जसा एखादा संगीताचा तुकडा तुमच्या ह्रदयाला भेदून जातो, तिथे रुतून बसतो, तिथेच हुळहुळत राहतो.द फ्रिदाला तशी चित्रं काढणं जमलं. मी अद्याप जमवतेय.

--

प्रत्येकाच्या आयुष्यात न-परतीचा एक क्षण असतो. परतायचं असतं असं नाही पण येतानाच आपण सर्व दरवाजे बंद करून त्यांची किल्ली कुठेतरी अज्ञात स्थळी फेकून आलेलो असतो. असा क्षण प्रत्येक उत्कट माणसाच्या आयुष्यात येतो. आणि कधीकधी असंही होतं की आपण आहे त्याहून पुढे जा‌ऊ शकत नाही. जायचं असतं असं नाही, पण आता पुरे असं वाटतं. आपण त्या क्षणाप्रत पोहोचतो तेव्हा आपण झालं-गेलं,  घडलं-न घडलं ते सगळं शांतपणे मान्य करून टाकतो. जगत राहण्याकरिता ते गरजेचं असतं.

मी काय, फ्रिदा काय, आपल्यासारखी बरेच जण उत्कट असण्याचे हे भोग भोगत असतात आणि आम्ही ते जहरी भोग भोगण्याचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा एकदा आवंढे गिळत त्यांचे रेकॉर्ड बनवून ठेवतो. पेण्ट करतो, कविता करतो, लिहीतो. कदाचित आमच्याकडून कोणाला काही मिळू शकेल, कोणाला काहीतरी शिकता ये‌ऊ शकेल. पण, हे काही शिक्षण नव्हे. हा आमचा इतिहास असतो.

फ्रिदाच्या किंवा कोणाही उत्कट व्यक्तीच्या इतिहासातून काही शिकायचे असेल तर हे शिकता येईल-जे मी शिकले- की तुमच्या वाटण्याची, तुमच्या वास्तवाची भीती वाटू दे‌ऊ नका. तुम्हाला काही वाटण्याचीच भीती वाटली, तर तुम्ही कोणावरही, कशावरही निव्वळशंख प्रेम करू शकणार नाही. तुमच्या जगण्यावर नाही, तुमच्या स्वतःवर नाही आणि दुस-द्याद कोणावर तर नाहीच नाही. या वाटण्यातून दुखतं, पण त्यातून आपल्याला अविरत बळ मिळत जातं. वाटण्याला-असण्याला सरळ छाताडावर घे‌ऊन भिडा किंवा त्याच्यापासून भेकडासारखे लपून बसा, वेदना ही असतेच. फक्त ती आयुष्याला भिडून भोगायची की डिनायलमध्ये जगायची हा आपला चॉ‌ईस असतो. आणि ती भोगायची कशी, ती आपल्याबरोबर पुढे कशी न्यायची याचा मार्गदेखील मात्र आपला आपल्यालाच शोधून काढायचा असतो.

--

फ्रिदाने द डायरी ऑफ फ्रिदा का‌अलोमध्ये म्हटलंय, "मला वाटायचं की मी जगातलं सर्वात विचित्र माणूस आहे. पण नंतर विचार केला की, जगात इतकी सारी लोकं आहेत तर माझ्यासारखंच विचित्र असणारं, माझ्यासारखंच चुकणारं-पडणारं एकतरी माणूस असेलच. मी त्या व्यक्तीची कल्पना करून पाहते. ती व्यक्ती देखील जगातल्या कुठल्यातरी कोप-यात असेल आणि माझा विचार करत असेल. तू जर खरोखरीच या जगात कुठेतरी असलीस आणि हे वाचलंसच तर निश्चिंत हो. मी खरोखरीच आहे आणि मी पण तुझ्या‌इतकीच विचित्र आहे."

मला आजतागायत कोणत्याही ओळींनी इतकं निश्चिंत, आश्वासक वाटलेलं नाहीये... कधीच.

"अनाघ्रात असं नस्तंय काहीही
हे ठीकच आहे
पण मात्र या सा-या
जखमी आयुष्याचं करू तरी काय? "

हा प्रश्न मलापण पडलाय फ्रिदा.

फक्त हे तुला कळवता आलं असतं तर फार फार बरं झालं असतं. पण सगळ्या गोष्टी जमवता येत नाही, काळाचं, पिढीचं, ब-याचशा गोष्टीचं गणित चुकतं.

मग पुन्हा एक वर्ष सरेल, पुन्हा गळ्यात आवंढा दाटून ये‌ईल, तेव्हाही "या सा-या
जखमी आयुष्याचं करू तरी काय?" ्द हा प्रश्न कदाचित तितकाच व्हॅलिड असेल. तेव्हा तू असतीस तर कसं या विचाराने माझं कानशील दुखरं दुखरं हो‌ऊन जा‌ईल.

पण चालायचंच.

1 comment:

Unknown said...

जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तेव्हा खर तर दोन व्यक्तींभोवतीची वलयं तेवढी भेटतात.

 
Designed by Lena