ससुरा...!

"अगला स्टेशन कुतुब मिनार. दरवाजा बायी तरफ खुलेगा."

वेण्डी मेट्रोतल्या खास स्त्रियांसाठी असलेल्या २-सीटर जागेसमोर बारला टेकून कुठेतरी वर पाहात उभी होती. दाराच्या वरच येलो लाईनचा संपूर्ण मार्ग दाखवणारा नकाशा होता आणि त्यावरुन एक मुंगी चालत होती, सिकंदरपूरला मेट्रोमध्ये चढल्यापासून तिच्याकडेच लक्ष होतं वेण्डीचं. गाडी थांबली तशी ती मुंगीही थांबली, तिने अबाऊट टर्न केला आणि मिशा फेंदारुन अख्खा एक क्षण वेण्डीकडे पाहिलं. तिच्या लोंबणा-या लंबुळक्या अॅंटेनांपैकी एक जरा लहानच होती. वेण्डीने तिला नाव दिलं- टोरी अमॉस. वेण्डीला दूरचं दिसतं, हलक्यातला हलका आवाज, कुजबूजही ऐकू येते, पण, वेण्डी स्पायडरमॅन नाही, आणि व्हॅंपायर तर मुळीच नाही.

दार आपो‌आप उघडलं. गर्दीचा एक पुंजका तरंगत बाहेर गेला. जितकी माणसं बाहेर गेली तितकीच माणसं आत आली. जी माणसं बाहेर गेली ती पुन्हा आत आली असं झाली नाही, तरी त्या मेट्रोमध्ये काही बदललंय असं वाटलं नाही. वेण्डीला वाटलं की कुतुब मिनार, इतकंच काय हौज खास नामक स्टेशन देखील आहे याचा साक्षात्कार आपल्या तिशीत व्हावा याला काय म्हणावं? वेण्डीला ही माहिती असायला हवी होती की नको होती? शेरलॉकला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे देखील माहित नव्हतं, पण तो शेरलॉक आहे. वेण्डी शेरलॉक देखील नाही.

मी जसं टोरीकडे चौकस नजरेने पाहतेय तशी तीही आपल्याकडे ’कोण हा चमत्कारीक प्राणी’ म्हणून बघत असेल का? आपण फार गंमतीदार विचार करतो असं वाटलं वेण्डीला. मग तिने मोठया कष्टाने टोरीवरचे विचार काढून घेतले.

मेट्रोचं आपोआप बंद झालं आणि तो अजगर पुन्हा एकदा हलायला लागला. तिने आजूबाजूला नजर टाकली. कोणाचंही कोणाकडे लक्ष नव्हतं. गजबज, गोंधळ खूप होता, पण ते नुस्तंच माशा घोंघावताना जो अर्थहीन, डोक्यात तिडीक जाणारा घुमघुम आवाज होतो तसा होता. त्याला नाद नव्हता, त्याला सप्तकं नव्हती, इतकंच काय त्याला चढ-उतारही नव्हते. व्हाईट नॉईझसारखा तो आवाज वेण्डीच्या कानात गच्च बसला होता. पाहावा तो माणूस मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता किंवा कुठेतरी शून्यात नजर लावून बसला होता.

वेण्डीने टोरीकडे पाहिलं तेव्हा टोरी समयपूर बादलीला पोहोचूनन पुन्हा डाऊन यायला निघाली होती.

टोरी गुडगावच्या दिशेने चालली होती आणि वेण्डी गुडगावकडून दिल्लीकडे येत होती.

--

आधी वेण्डीला वाटायचं की शहरं तीच असतात, फक्त आपला पर्स्पेक्टीव्ह बदलतो.

घरं, त्यांची काळोखी माजघरं, घरातून येणारे टीव्हीचे आवाज, धुळमटलेल्या गच्च्या,अंगणातली तुळशी वृंदावनं, गोठ्यातली गुरं, गुरांची अंगकाठी, रस्त्याच्या बाजूने लावलेली झाडं, लोकांचे डोळे, त्यांच्या डोळ्यांतले दिवे, रात्री-दिवसा रस्त्यावरील वर्दळ  यावरुन शहराची ओळख ठरत असते. काहीतरी वजा होत असतं तेव्हा कशाचीतरी भर पडतच असते. रेंगाळलेले उच्छवास, वेण्यांचे वास, अपरिचित भाषेतली उत्साही बडबड, घराकडे जाणारी, घराकडून येणारी, घरापासून तुटलेली अनेक माणसं. तसं पाहायला गेलो तर आपण एकटे कधीच नसतो.

पण, गेले पाच दिवस तिला दिसलेलं गुडगाव पाहून ती चक्रावली होती, वैतागली होती आणि त्यानंतर अक्षरश: रडकुंडीला आली होती. शहर कसं असावं याबद्दलच्या वेण्डीच्या सर्व प्राथमिक कल्पनांना छेद देणारं ते शहर होतं. रस्त्यावर तिला आई-बाबाचा हात धरुन मजेत चालणारं एकही मूल दिसलं नाही की पंधरा-सोळा वर्षांची मुलं-मुली दिसली नाहीत.दिसली ती सर्व पोटापाण्याकरता गुडगावमध्ये येऊन राहणारी, पाच दिवस मान मोडून काम करणारी आणि शुक्रवारी रात्री थॅंक गॉड इट्स फ्रायडे म्हणजे टीजीआयएफ साजरा करत, दारू ढोसून लास होणारी तरूणाई!

रस्त्यावर एकही टपरी नाही, किराणा मालाचं दुकान नाही. छोट्यातली छोटी वस्तू घ्यायची असेल तरी तंगडतोड करत मॉलमध्ये जायचं. दारूची दुकानं मात्र नाक्या-नाक्यावर. वेण्डी राहात होती त्या डीएलएफ-३ भागापासून अॅंबियन्स नावाचा एक मॉल अवघ्या १ किलोमीटरवर होता, पण तिथे पोहोचेपर्यंत तिला मोलसरी ऍव्हेन्यू म्हणून एक रॅपिड मेट्रोचं स्टेशन लागायचं आणि त्यानंतर NH ४८. त्या रस्त्यावर जिथे पाहावं तिथे, वेळ कोणतीही असू देत जांभया देणारे, पारोसे, पचापच थुंकणारे ड्रायव्हर आणि रांगेने उभ्या असलेल्या टॅक्स्या पाहून तिचा उत्साहच गळून जायचा.
रस्त्यावर छोटं मूल नाही. कुटुंबं नाहीत. बागा नाहीत. विशीच्या खालची मुलं-मुलीच नाही. मेडिकलची, खेळण्यांची, कपड्यांची दुकानं नाहीत. एखाद्या शहरातली जिवंत सळसळ इथे नाहीच.

वड-पिंपळ नाहीत, आहेत ती सगळी आखूड, शोभेची झाडं, नाहीतर काटेकोरपणे कापून काढलेल्या लॉन्स. वेण्डीच्या गावात एक पुराणवड आहे. कल्पनाही करता येणार नाही इतकी वर्षं ऊन-पाऊस अंगावर झेलत विस्तारलेला तो अवाढव्य वड पाहून वेण्डीला उगाचच आधार असल्यागत वाटतं, एक नवी उभारी आल्यासारखी वाटते. या शहरात मात्र आधार वाटावा, आपली वाटावी, जिला धरून दिवसच्या दिवस काढू शकू अशी गोष्टच नाही. या शहरात आल्यापासूनच वेण्डीला हातात एक काठी देऊन बारीक दोरावर चालायला लावल्यागत वाटत होतं.

ती एका कंपनीत जाऊन आली. त्या कंपनीत किमान २०,००० लोक काम करतात, आणि त्यांचं सरासरी वय ३४-३५ आहे, पण त्यातला एकही लक्षात राहिला/राहिली नाही.
एव्हढी माणसं जातात आपल्या बाजूने- पण एकाचाही चेहरा धड आठवत नाही.
इतकी झाडं मागे टाकतो. कुठली होती ती? काहीच पत्ता नाही.
दिवसभर सगळ्यांच्या संभाषणातले तुकडे आदळत असतात अंगावर, पण त्यातलं काहीही डोक्यात नोंदलं जात नाही.
ड्रायव्हर तेजपाल ५ दिवस गुडगावमध्ये गाडी चालवून गावच्या ओढीने राजस्थानला पळतो आणि सोमवारी परततो तेव्हा रडवेला झालेला असतो.
संध्याकाळी सहाला काम संपवून हॉटेलवर परतायचं असतं तेव्हा वेण्डीला होपलेस, असहाय्य वाटतं
ते शहर तुमच्यातला सगळा जीवनरस शोषून घेतं.अगदी काही दिवसांच्या आतच! डिमेण्टर आपल्या सर्व आनंदी आठवणी शोषून घेतील तसं.

ट्रॅफिक तर सगळ्या शहरांमध्ये असतं. वेण्डीच्या मुंबईतलं ट्रॅफिक तर कुप्रसिद्धच. पण, तिथे कधी अडकून पडलोय अशी भावना होत नाही. आपण पुढे जातच राहणार आहोत असा विश्वास असतो तिथे. पण, गुडगावच्या ट्रॅफिकमध्ये मात्र इनर्शियाची अगदी लख्ख जाणवेल अशी भावना होते. आपण आता इथेच अडकून पडणार आहोत, आत पुढे जाणं होणारच नाही असं काहीतरी येडटाक डेस्परेशन आल्यासारखं होतं. एसी गाडीतही जीव कोंदतो आणि खिडक्या उघडल्या की घुसमटतो. इकडे आड, तिकडे विहिर.. काय करावं?

धुळीचा तो प्रचंड खकाणा, सर्वत्र बंजर, ओसाडीचं वातावरण, सकाळचं चावणारं, टुपणारं विचित्र ऊन, त्या एकंदर ओसाडीला अर्वाच्य शिवी हाणत अश्लील उभ्या असलेल्या त्या गगनचुंबी इमारती, प्रचंड मोठ्या कॅफेटेरियामध्ये ताटामध्ये अन्नाचा डोंगर रचून तो अधाशागत चिवडणारी मुलं-मुली, रोजच्या रोज फुकट जाणारं किलोवारी अन्न, अर्थहीन, हेतूशून्य, तुपट सुबत्ता, मॉलमध्ये दररोज संध्याकाळी उधळला जाणारा अमाप पैसा..

अशा असंख्य छोट्या छोट्या गोष्टींनी गुडगाव मनातून उतरत गेलं. शेवटी शेवटी तर वेण्डीला गुडगावची इतकी शिसारी आली की शनिवारी सकाळी ८च्या मेट्रोने वेण्डी दिल्लीकडे यायला निघाली होती.
.
.
.
.
"अगला स्टेशन राजीव चौक. दरवाजा दायी तरफ खुलेगा."

गर्दीच्या एका पुंजक्याचा भाग होऊन वेण्डी राजीव चौक नामक स्टेशनवर उतरली. कायम गर्दीने लसलसणारं रेल्वे स्टेशन.
हवा उष्ण होती, प्लॅटफॉर्म उष्ण होता,  लोकं उष्ण होती, नजरा उष्ण आणि त्यांचे श्वासही.
ती दुपार-ती वेळ नेहमीप्रमाणेच तिच्या अंगात घुसली आणि ती त्या लोंढ्यावर स्वार होऊन स्टेशनच्या बाहेर यायला निघाली.

---

"अगला स्टेशन कुतुब मिनार. दरवाजा बायी तरफ खुलेगा."

पुन्हा एकदा कुतुब मिनार.

राजीव चौकला धावत पळत वेण्डी मेट्रोमध्ये चढली तेव्हा ती मेट्रो हूडा सिटी सेंटरलाच जाईल असा वेडगळ विश्वास तिला वाटत होता, पण तो साफ खोटा ठरला. मुंबईसारख्या इथेही येडपटासारख्या मधल्याच कुठल्यातरी स्टेशनपर्यंत जाणा-या गाड्या होत्या. आता काय करणार, साकेतला उतरू म्हणून ती तिथेच पेंढा भरलेल्या पांडासारखी बसून राहिली. गाडी कुतुब मिनारवरून पुन्हा एकदा आल्या दिशेने निघाली आणि तितक्यात एक बुटकी, ठेंगणीठुसकी मुलगी तिला हाय करत घाईघाईने तिच्या दिशेने येताना दिसली.

पहिल्यांदा वेण्डीला वाटलं की आपल्याला भास होतोय. कारण, आतापर्यंतच्या प्रवासात कोणी तिच्याशी आपणाहून बोललं नव्हतं किंवा उगीचच स्टेशन येईपर्यंत गप्पा मारल्या असं झालं नव्हतं.

ती मुलगी तिच्या बाजूला येऊन बसली आणि वेण्डीला कळलं की ती देखील वेण्डीसारखीच हूडा सिटी सेंटरला जायचं म्हणून गाडीत चढली होती. इव्हलिन तिचं नाव. कलकत्त्याहून आलेली. नोकरीच्या निमित्ताने हैद्राबाद-पुणे करत गुडगावला यायला लागलेली, सैराटचं ’झिंगाट’ गाणं मोडक्या मराठीत बोलता येणारी, गुडगावचा मनोमन प्रचंड तिरस्कार करणारी. I won't deny that this city gives me a livelihood, but that doesn't mean I have to like it असं मॅटर-ऑफ-फॅक्टली सांगणारी.

साकेतला दोघींनी गाडी बदलली. आधीच त्या भरपूर माणसं कोंबून भरलेली आणि त्यात भर म्हणून प्रत्येक स्टेशनवर माणसंच माणसं त्यांच्यावर चाल करुन येत होती. काळी, गोरी, उंच, बुटकी, क्रूर, मायाळू, मतलबी, हेकणी, फ़ेंगाडी, देखणी.
या सगळ्या गर्दीत तिला त्या दोघींच्या भोवती पातळ मेम्ब्रेनचे बुडबुडे असल्यासारखे वाटले. माणसं त्यांच्यावरुन वाहतायेत खरी, पण त्यांना या दोघींची काही पडलेली नाहीये आणि ना त्या दोघींना त्यांची. गप्पा रंगल्या, गुडगावला यथेच्छ शिव्या घालून झाल्या, मग अचानक सीन समूळ बदलतो तसं झालं. आपण गुडगावमध्ये आहोत याचा वेण्डीला विसर पडला.

पण, तो आनंद फार काळ टिकला नाही. लवकरच वेण्डीचं स्टेशन आलं. वेण्डीचा पाय निघत नव्हता आणि इव्हलिनचा चेहरा उतरलेला होता; पण, उतरायला हवंच होतं. वेण्डी इव्हलिनचा निरोप घेऊन गाडीतून उतरली आणि त्या निर्मनुष्य स्टेशनवर एकट्यानेच उभं असताना तिला फुटून फुटून  रडावंसं वाटलं. आपल्याला रडू का येतंय याची कणभरही कल्पना तिला अर्थातच नव्हती, पण ती रडणार नव्हती. दुस-यांसमोर असलं काही करायची सवय नव्हतीच तिला. तिने चिमटीत कपाळ दाबून ठेवलं आणि कपाळ खसखसून घासलं, सगळे विचार पुसले जातील समहा‌ऊ या अपेक्षेत. मग तिला वाटलं की गेल्या सहा-सात दिवसांमध्ये आलेल्या अनुभवांपेक्षा हे  नक्कीच वेगळं होतं. पण नेमकं कसं?  एखाद्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण नेगेटिव्हवर कसे उमटतात पुराव्यादाखल, तसंच त्या एका तासाने तिच्या मनावर एक कायमची खूण उमटवून ठेवली होती.
आणि मग काही ऐका-बोलण्याची, विचार करण्याची, आत चाललेल्या ठसठशीचा मागोवा घेण्याची गरज संपली. काहीतरी निसटून चालल्याची अस्वस्थता संपली.
एक साधं सरळ जिवंत सत्य सापडावं तसं वाटलं तिला.

कधीकधी पूर्णत्वाची भावना नकोच असते अगदी पण काहीही नसण्याची, आपल्या आतआत काहीही न हलल्याची भावना नको असते.
आज नेमकं तेच वेगळं होतं.

वेण्डीने मग एक खोल खोल श्वास घेतला आणि उगाचच स्टेशनच्या बाहेर पसरलेल्या गुडगावकडे पाहून म्हटलं, "कोई नही, ये तो ससुरा गुडगाव है. यहां यही होना है"

2 comments:

Anonymous said...

केवळ अप्रतिम!

Shraddha Bhowad said...

दुरित,

मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं, पण, तुझ्या कमेंटची पोच द्यायची राहिली. There are no excuses for the blunders. :)
Thank you for being the avid reader. I appreciate it. :)

-श्रद्धा

 
Designed by Lena