न बोलू मैं तो कलेजा फूँके..

कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं.
आपल्याला कोणातरी भेटतं..
आपल्या आयुष्यात कोणाचातरी शिरकाव होतो हे म्हणायला गेलं तर किती अद्भुत आहे..

ही माणसं येतातच मुळी त्यांचं पूर्ण आयुष्य घेऊन..
आणि आपल्या आयुष्यात येताना त्यांचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही घेऊन येतात.
त्यांचं थकलेलं, मोडकळीला आलेलं, अस्वस्थ, अनिश्चिंत, कावरंबावरं मन (मन असतंच तसं म्हणा..)
ते ही घेऊन येतात सोबत.

मला कुतूहल या गोष्टीचं आहे की, तुझ्या मनाची अवस्था कशी आहे.
त्याला कायकाय पाहावं लागलंय, त्याचा प्रवास कुठून कुठवर झालाय..

माणसांना जीव लावणं काय असतं हे एकदा का माहीत झालं की माणूस जीव लावायला घाबरतो..सतरांदा विचार करतो
मला ते माहीत आहे..आणि म्हणूनच मी घाबरते आहे.
तुम्हाला एखादी गोष्ट माहीत झाली की, ती तितक्या सहजपणे पुन्हा करावीशी वाटत नाही, आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात
तुला ते बहुतेक माहीत असेल, अथवा नसेल
माहीत नसेल, तर ते बरंच आहे
काहीकाही वेळी गोष्टी माहीत नसल्या तरी फार काही बिघडत नाही
त्यामुळे ते फार मनाला लावून घेऊ नकोस!!

परवाच घरी गेलेले तेव्हा समुद्रावर गेले.
मी अजूनही एखाद्या पुरुषासोबत बसून समुद्र पाहिलेला नाही
जी गोष्ट बरीच लोकं फारसा विचार न करता, फार प्रयत्न न करता करतात, ती गोष्ट मी अजूनही केलेली नाही
मी न केलेल्या गोष्टींमध्ये खूप गोष्टी आहेत...जगता जगता, पाण्याच्या वर डोकं ठेवायचा प्रयत्न करता करता राहून गेलेल्या..
हावरेपणाने जगून घेतलेली वर्षंही आहेतच, पण लेखाजोखाच मांडायचा झाला, केलेल्या गोष्टींपेक्षा करुन घ्यायच्या राहिलेल्या गोष्टीच फार आहेत
ली जक म्हणतो तसं- ते तसंच असायचं असतं..
तेव्हा, फार जीवाला लावून घेऊ नकोस!!

मी समुद्र पाहिलाय, असं कधी म्हणू नये
तू आधी पाहिलेला समुद्र तू नंतर पाहशील त्या समुद्रापेक्षा वेगळा असणारेय..
नव्या माणसासोबत पाहशील तेव्हा त्या माणसासोबत पाहण्याची पहिली वेळ असेल.
हे पहिलेपण या केल्या-नकेल्या गोष्टींचंही असतं बहुतेक.
तुम्हाला त्या कितीही चांगल्या माहीत असल्या-नसल्या, तुम्ही हे आधी केलेलं आहे असं तुम्हाला वाटत असलं,
तरी..
तुम्हाला ज्या व्यक्तीच्या असण्या-नसण्याने फरक पडतो तिच्यासोबत केलेली गोष्टदेखील पहिल्यासारखीच असेल.

माणसामाणसांमधले क्षण, ते लम्हे..त्यानंतर घडणारं सर्वकाही यात कोणाचाही दोष नसतो
ते तसंच घडणार असतं
काही लाटा लपलपत राहतात आणि काही किनाऱ्यावर येऊन फुटतात
ते तसं का झालं याबद्दलच्या विचाराला तसा काही अर्थ नसतो.
कारण, ते तसंच होणार असतं..
तसं नसतं झालं, तर आणखी कोणत्यातरी पद्धतीने झालं असतं..
पण झालं असतंच.
सो डोण्ट थिंक अबाउट इट सो मच.

आणखी एक गोष्ट-
तू कालचा दिवस जगून घेतला म्हणजे तुला आजच्या दिवसाबद्दल सगळं काही कळलं असं नसतं
त्यामुळे, फार विचार करु नकोस
लेट इट बी.
होतंय ते होऊ देत.
घडतंय ते घडू देत.

2 comments:

Meghana Bhuskute said...

आमेन. अस्तु. के सेरा सेरा..

Shraddha Bhowad said...

पायलागू!:D

 
Designed by Lena