मिकन् आणि मिकनचा पाऊस

मिकनला तो पुढे पारदर्शक प्लॅस्टिकचा व्हायझर असलेला पिवळा रेनकोट खूप आवडायचा.

तो त्याला खूप मोठा व्हायचा, पण मिकनला त्यात घुसून गुरगुटी मारुन बसायला आवडायचं. तो रेनकोटही इतका मोठा होता की मिकन् टोपीच्या आतून त्यात घुसला की तो रेनकोट पिवळं पोतं उभं केल्यासारखा उभ्याचा उभाच राहायचा. त्यात खुडूक करून बसलं की प्लॅस्टिकच्या ओल्यादमट उबदार वासाने मिकनला झोप यायला लागायची. कानावर हात गच्च दाबले की आजूबाजूचे आवाज कसे दबून जातात, तसा बाहेरच्या पावसाचा आवाज  त्या रेनकोटमध्ये गाळून यायचा. बाहेर आईच्या आवाजासारखा किनरा वाटणारा पाऊस रेनकोटच्या आत मात्र बाबाच्या आवाजासारखा व्हायचा. तसं पाहिलं तर पिंपात बसून मोठ्यांदा ओरडलं की मिकनचा आवाज देखील बाबासारखा भासे आणि त्याला ऐट असल्यासारखी वाटे; पण आईने पिंपात उतरायची बंदी घातली आणि पिंपात उतरण्यासाठी लागणारं स्टूलही माळ्यावर नेऊन ठेवलं, तेव्हापासून मिकन् आणि रेनकोट यांचं सख्य जरा जास्तच वाढलं.

-

मिकन् सकाळपासूनच रेनकोट घालून बसला होता.
सकाळपासून किती तो पाऊस पडतोय. बदाबदा कोसळतोय नुसता.
हा थकून कसा जात नाही? आपण कितीही रडायचं ठरवलं तरी दहा मिनिटांनंतर डोळ्यातलं पाणी संपतं, आणि बाबा फिस्सकन हसतो. मग हा तासनतास कसा पाणी गाळत असेल? नाकाच्याही पुढे येणारा व्हायझर सावरत मिकन् दारात खुरमांडी घालून बसला होता आणि विचारमग्न चेहऱ्याने आभाळाकडे पाहात होता. आणि त्याच्यापाठी खुर्चीत बसलेली आई त्याच्याकडे टक लावून पाहात होती.

छपरावरून पडणारी पानगळ त्याला मोत्यांच्या सरीसारखी वाटत होती. त्यातल्या प्रत्येक मोत्याच्या आत एक वेगळं जग होतं, गोटीच्या आत असतं तसं.
पावसाचे थेंब हातावर घेतले की सगळंकाही छान छान बरं होतं, हाताची खाज पुरळ जाते असं आईने त्याला सांगीतलेलं.

मिकन् उठला आणि स्वैपाकघरात गेला.
तो काय करतोय हे आई डोळे बारीक करून बघत होती.
तर मिकन् त्याच्यापुढे घमेलं भासावं इतकं मोठं पातेलं घेऊन दीड पायावर तोल सांभाळत येताना दिसला. गुडघे वाकवून पोट आत ओढून एकेक पाऊल टाकत येणाऱ्या मिकनला पाहून बाबाही दारातच थबकला. आईने ओठावर बोट ठेवून त्याला गप्प राहण्याची खूण केली.

मिकन् ते जड पातेलं उचलून दाराच्या बाहेर पडला, अंगणाच्या पायऱ्या उतरून खाली उतरला आणि त्याने ते पातेलं छपरारून पडणाऱ्या पानगळीच्या धारेखाली ठेवलं.

पावसाचा जोर एव्हाना कमी झालेला, त्यामुळे पानगळही थेंब थेंबच होती, पण मिकन् ते भरण्याची वाट पाहात तिथेच उभा राहिला.
तो काय करतोय हे पाहायला आई आणि बाबाही दारात येऊन उभे राहिले.
किती वेळ गेला काय माहीत, पण मिकन् त्या पातेल्याकडे एकटक पाहात उभा होता आणि आई बाबा त्याच्याकडे एकटक पाहात उभे होते.

मिकनच्या गोबऱ्या चेहऱ्यामुळे त्या रेनकोटच्या टोपीची बकलं काय त्याच्या कानावरून हनुवटीच्या खाली यायला तयार नव्हती, त्यामुळे झालं काय की, टोपीवर साठलेले पावसाचे एक दोन थेंब मिकनच्या गळ्यावरून शर्टाच्या आत गेले आणि मिकनने शहारत कान खांद्याला खसखसून पुसले. ते करण्याच्या नादात व्हायझरवरून एक चुकार थेंब मिकनच्या नाकावर उतरला आणि मिकनने नाक आक्रसलं. ही सगळी सर्कस चालू असेपर्यंत ते पातेलं अर्धं पण भरलं नव्हतं.
आईचे पण पाय दुखायला लागून ती दीड पायांवर उभी होती. बाबा तर केव्हाचाच आत गेला होता.

शेवटी एकदाचं ते पातेलं भरलं.

मिकनने ते आधीच जड असलेलं आणि पाण्यामुळे आणखी जड झालेलं पातेलं उचललं आणि हळूहळू चालत अंगणातल्या एका झाडाच्या दिशेने निघाला.
हा पावसात कुठे चाललाय हे पाहायला आई काळजीने अंगणाच्या पायऱ्या उतरुन खाली आली.

अंगणात एक जंगली बदामाचं झाड होतं. मिकनच्या जन्मापासून उभं असलेले, वर्षानुवर्षं राजवर्खी, सोनवर्खी पानांचा सडा घालून अंगण सजवणारं ते झाड कोणीतरी कुऱ्हाडीचे घाव घालून तोडण्याचा प्रयत्न केल्यापासून वठून गेलं होतं. त्याच्यावरचे सगळे बदाम गळून पडले होते. हिरवं-पिवळं तेज मिरवणारं खोड आता काळंठिक्कर पडलं होतं.
मिकन् हातातलं पातेलं सावरत झाडाजवळ पोहोचला आणि अंगातली सारी ताकद एकवटून ते पातेलं त्याने झाडावर पडलेल्या कुऱ्हाडीच्या घावांवर उपडं केलं.
मग पातेलं खाली ठेवन मिकनने झाडाच्या खोडाभोवती हात वेढले आणि खोडावर त्याचे गाल घासत बारक्या थरथरत्या आवाजात म्हणला, "लवकर बरा हो"

आई येऊन मिकनच्या मागेच उभी होती. तिने एक आवंढा गिळला आणि चेहऱ्यावरचे पावसाचे थेंब पुसून ती म्हणाली,
"मिकन्, चला घरी जाऊ या?"
त्यावर मिकनने व्हायझर उचलून मान वर करून आईकडे पाहिलं आणि मान डोलावली. झाडाच्या खोडावर शेवटचं थपथपवून त्याने आईचा हात धरला.

ही दोघं नेमकं करतायेत तरी काय हे पाहायला दारात आलेल्या बाबाने पावसात भिजत येणाऱ्या आईला पाहिलं आणि काळजीने विचारलं,
"अगं छत्री नाही का न्यायची?"
त्यावर आईने मिकनकडे पाहिलं आणि म्हटलं,
"मग मी बरी कशी होणार, नाही का?"
मिकनने ते पटून जोरजोरात मान हरवली आणि बाबा काही न समजून नुस्ता पाहातच राहिला.
आईने दुसऱ्या हाताने बाबाचा हात धरला आणि हळूवार आवाजात म्हणाली, "थॅंक यू!" आणि मिकनचा हात बाबाकडे देऊन आत निघून गेली.

मिकन आणि बाबा दोघेही एकमेकांकडे पाहातच पाहिले. मध्येच थॅंक यू?
तेव्हा पाठी आईचं आवडतं गाणं वाजत होतं.

टेल मी समथिंग गर्ल,
आर यू हॅप्पी इन दिस मॉडर्न वर्ल्ड?
ऑर यू नीड मोअर
इझ देअर समथिंग एल्स यू आर सर्चिंग फॉर?

आई अशीच थोडी वेडी आहे.
त्या पिवळ्या रेनकोटसारखी.

--

झाडाझडती.

माझं तीस वर्षांचं आयुष्य दोन बॅगांमध्ये कोंबून बंगलोरला आले त्याला आता अडीच वर्षं होतील.

मी तीस वर्षांत एव्हढं काय काय जमा केलं होतं हावऱ्यासारखं, (अर्थात पाचशे-सहाशे पुस्तकं सोडून) ते सगळं फक्त दोन बॅगांमध्ये बसलं तेव्हा किती नवल वाटलेलं. मला आणि "कुठे घेऊन जाणारेस एव्हढं सर्व" असं म्हणून सदैव कटकटणाऱ्या आईलाही.

आपण किती सहजपणे बॅगा उचलून चालू पडलेलो आणि बिनदिक्कत या नवीन, सर्वस्वी परक्या शहरात येऊन स्थिरावलो याचं खूप कौतुक वाटतं.

आज मागे वळून पाहते आणि तेव्हाची मी-आत्ताची मी असं तुलनात्मक विश्लेषण करते, तेव्हा त्या निर्णयाचा यत्किंचीतही पश्चाताप वाटत नाही. दोन-अडीच वर्षं म्हणता म्हणता टिन फॅक्टरी, के आर पुरमच्या ट्रॅफिकच्या ग्लानीत, गोतिल्ला, इल्ला, हौदा, इष्ट, स्वल्प, बरथायदिनीच्या पारायणांमध्येच गेली. मग एके दिवशी आपल्याला (ज्यात बस, रिक्षा किंवा उबरचा प्रवास नसेल असं) काहीतरी करायला हवंय असा साक्षात्कार झाला. लग्न, पोरंबाळं यांच्या फंदात कधी पडायचं झालंच, तर एक झाड आणि एक पाळीव प्राणी जगवून दाखवायचा हा पण देखील आठवला आणि मी एके दुपारी नर्सरीकडे मोर्चा वळवला.

मी यापूर्वी झाडं वाढवलियेत, नाही असं नाही, पण ते घरी असताना. तिथे सगळा को-पॅरेंटिंगचा प्रकार होता. मी घरी नसले तर आई किंवा पप्पा पाणी घालून जातील, भाऊ किंवा बहिण नजर टाकून जाईल असा सीन असल्याने त्या रोपांची काळजी करण्याची, त्यांचं निगुतीने करत बसण्याची, त्यांच्या बरं असण्या-नसण्याने घाबरुन जाण्याची वेळ कधी आलीच नाही.

पण इथे मात्र मी सिंगल पेरेंट असणार होते.
आता गंमत अशी आहे की, नर्सरीमध्ये एकदम फ्रेश दिसणारी झाडं आपण आपल्या बाल्कनीत आणून ठेवली की माना टाकतात. नर्सरीत छान तासेक घालवून छान तरुण रोपं आणावीत आणि ती आठवड्याच जख्ख म्हातारी असावीत अशी दिसायला लागावीत हे कित्येक महिने चाललं. हा प्रकार मला आजतागायत कळलेला नाही, का? ते देखील नीटसं कळलेलं नाही. पण नर्सरीतून आणलेलं एक झेंडू, एक जुई आणि एका ओव्याच्या रोपाचा दफनविधी केल्यानंतर मी शहाणी झाले आणि मी बिया पेरायला सुरुवात केली. आता तिथेही काहीतरी झकडम लफडं आहेच. बियांमध्ये सकस बिया आणि पंडु बिया अशी प्रकरणं असतात, माणसांसारखीच. सगळ्याच अंकुरतात असं नाही. अंकुरल्याच तरी त्यांच्यामध्ये तुफान स्पर्धा चालते. मी एकाच वेळी पेरलेल्या एकाच गुलबक्षीच्या झाडाच्या सहा बियांपैकी फक्त दोन रोपं ताडमाड वाढलियेत. बाकीच्या बिया अंकुरल्यात खऱ्या, पण त्यांची वाढ खुरटी आहे. ती दीनवाणी होऊन या धिप्पाड झाडांच्या पायाशी तग धरून आहेत. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. तंतोतंत माणसांसारखं.

'शेफ' सिनेमामध्ये कार्ल हा मॉलीसाठी पास्ता आग्लिओ इ ओलियो  बनवतो आहे असा एक प्रसंग आहे. अचानक मॉलीचा श्वास जड व्हायला लागतो आणि ती धापा टाकायला लागते. कोणाचाही असा समज व्हावा की, तिथे व्हेंटिलेशनचा काहीतरी लोच्या आहे आणि तिचा श्वास कोंडलाय. पण खरं होत हे असतं की, ती त्याच्या पास्ता बनवण्याच्या पॅशनने, त्याच्या एकंदरच चटचटीतपणाने अराउझ झालेली असते. हे त्या सीनच्या शेवटी तुम्हाला कळतं, आणि तुम्ही "हात्तीच्या मारी.. असं होतं व्हय!", असं काहीतरी वाटून घेऊन सिनेमा पुढे पाहायला लागता. झाडांच्या बाबतीतही हे असंच. त्यांना काय होतंय हे शिंचं काही कळत नाही. त्यांना होत एक असतं आणि आपल्याला काहीतरी भलतंच वाटत असतं. आपण खूप काही करतो.. इंटरनेटवर व्हिडिओ पाहतो, गोमूत्र, इप्सम सॉल्ट, इनो, कंपोस्ट नीम स्प्रे सगळं सगळं करून पाहतो. अत्यंत इमोशनल असताना त्याला शपथाही घालतो, त्यानेही काही परिणाम होत नाही हे पाहिल्यावर आसवं गाळतो, पण ते त्यातून खऱ्या अर्थाने सावरतच नाही. ते सुकत जातं, मरत जातं, आणि एके दिवशी आपण ते मरणारच आहे हे सत्य पचवतो आणि आपल्या मनाची तयारी करतो. कारण, शेवटी आपणच सगळे प्रयत्न करुन चालत नाही, त्या झाडातही तितका जीव, इच्छाशक्ती असावी लागते. ते झाडही जगायचा प्रयत्न करत असणारच, मरण कोणाला आवडतं? पण त्याचे प्रयत्नच तोकडे पडत असणार, दुसरं काय! ज्याची इच्छाशक्ती जास्त प्रखर, ज्याचं बीज अधिक निकं तेच जगणार, ज्यात सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वाढण्याची ताकद आहे तेच जिवंत राहणार. किंवा दुसरा सिनारियो. नशिबावर हवाला ठेवून सगळंकाही चांगलं होईल अशी आशा करत राहायचं. मग एके दिवशी त्या झाडाच्या बुंध्याला हिरवट झाक यायला लागते, पानं फुटायला लागतात, आणि आपल्याला प्रचंड इरॉटिक वगैरे वाटतं, आपण त्यानंतरचे कित्येक दिवस हाय असतो. (ओह! मॉलीच्या भावना पोहोचल्या)

मग पुढे जाऊन असंही होतं, की झाड खूप छान जगतं, तरारतं, त्याला छानशी चकचकीत हिरव्या रंगाची पानं येतात, पण ते झाड फुलं मात्र काही देत नाही. 
मी जेव्हा झाडं लावायला सुरुवात केली होती, तेव्हा मला त्याला लगेचच फुलं यावी असं वाटायचं. एखादं बीज रोवलं, एखादी फांदी लावली, की फांदी फुटायला, बीज अंकुरायला किती वेळ लागतो याची माहिती सहज उपलब्ध असते. तो तितका कालावधी निघून गेला की माझी घालमेल सुरु व्हायची. फूल येत का नाही? का येत नाही फूल?..माझं काही चुकतंय का?.. हे असं करायला हवं होतं का? कदाचित ते तसं केलं ते चुकलं असावं. हजार पण-परंतु.. त्यात प्रचंड उर्जा वाया जायची. गाण्याचे फक्त मुखडे पाठ असण्याचा तो काळ. अस्ताई आवडली की गाणं आवडलं..अंतरा ऐकून मत बनवण्याइतका धीर नसायचा, किंवा तितका वेळ कळ काढता यायची नाही. तो उतावीळपणा नंतर कमी झाला, पण या झाडांनी जणूकाही मला संयम शिकवायचा विडाच उचलला होता. हद्द झाली जेव्हा माझा जीव की प्राण असणाऱ्या, डोळ्यात तेल घालून जपलेल्या-वाढवलेल्या माझ्या उंचीच्या एका झाडाला शेवटपर्यंत फूल आलंच नाही, पण मी मात्र आज येईल फूल, उद्या येईल..म्हणून तब्बल दीड वर्षं काढलं. 
पण शेवटी ते असंच असायचं असतं. तुम्हाला मान्य नाही..टफ! बसा बोंबलत.

यात चुका नसतात. मी याला चुका मानत नाही. हे फक्त प्रयोग असतात. तुम्ही दुसऱ्यामार्फत स्वत:वर करून घेतलेले. हे प्रयोग तुम्हाला तुम्हाला तुमच्या मर्यादांची तीव्र जाणीव करून देतात, कुठे थांबायचं, कुठे सीमारेषा आखून घ्यायची, कशाने किती फरक पाडून घ्यायचा, की घ्यायचा नाही हे नीटच शिकवतात. आपण खूप प्रेमाने लावलेल्या, लळा लावलेल्या झाडांना पुरताना काहीही शाश्वत नाही हे सत्य कडूजहर हलाहलासारखं गळी उतरत राहतं, आणि आपण ते पहिल्यांदा..दुसऱ्यांदा करत कित्येकदा पचवतो. पण त्याने तुम्ही झाडं लावायचं सोडत नाही, त्यांचं निगुतीने सर्व करण्यात काही कसूर सोडत नाही. हे जगेल, वाचेल, बहरेल या आशेने तुम्ही बिया, रोपं लावत राहता, जगत राहता, जीव लावत राहता. कदाचित यालाच शहाणा आशावाद म्हणतात.

कुठलाही आवाज न करता, शांतपणे मोठ्या होत जाणाऱ्या, तुम्हाला बक्कळ शिकवणाऱ्या आणि सदैव साथ देणाऱ्या अशा गोष्टी हव्या आहेत खरंच.. गरज आहे.

--

आता माझ्या त्या 'पणा'तील दुसरा टप्पा - पाळीव प्राणी जगवून दाखवणं. आणि मी हे प्रकरण घरी आणायचा विचार करतेय.

Image may contain: cat
चित्र जालावरून साभार
पर्शियन मांजर आणि माझ्यात काही लाक्षणिक साम्यस्थळं आहेत असं मला सांगण्यात आलंय. आय डोण्ट रिअली सी दॅट; पण, ते घरी आणल्यानंतर आम्ही नाक कपाळावर नेऊन एकमेकांना किती, किती वेळ आणि कसे इग्नोअर मारतो हे पाहण्याची जाम म्हणजे जाम इच्छा आहे.

त्याने त्याच्या मांजरपणात आणि माझ्या 'यू-नो-व्हॉट'पणात काही फरक पडणार नाही,
पण बहुतेक मजा येईल!!

वाटतंय खरं. पाहू.

बेखयाली का खयाल अच्छा है!

उचकायचंच म्हटलं तर छोटंसं कारणही पुरतं.
कधीकधी तुम्ही नुस्ते बसलेले असता आणि पुढच्याच सेकंदाला तुमचा मूड खराब होतो.
काही काही दिवशी असं वाटतं की, आपल्याला येत असलेल्या शिव्यांच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड फारकत आहे.
मग तुम्ही स्वत:वर चरफडण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. तुमचा राग, तुमची चिडचिड आत साठत जाते आणि तुम्ही नुस्ते धुमसत राहता.
पण मग एका उपरतीच्या क्षणी तुम्हाला स्वत:ला दिलेले स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे आठवतात. उद्या आपण मरुनच गेलो, तर आपण केलेली शेवटची गोष्ट काय असेल? ही? हे जाणवून शरमता.
मग तुम्ही असंख्य मूव्हीमध्ये हिरोने हिरॉइनीला शिकवलेली गोष्ट करता. जी 'लाइफ इन मेट्रो'मध्ये इरफानने कोंकोणाला शिकवली होती.
तुम्ही गच्चीवर जाता, गच्चीच्या कठड्यावर हात गच्च रोवता आणि..
किंचाळून विचारता की-
सचेत टंडनने इतकं जीव ओतून गायलेलं #बेखयाली अरिजीतने गायची गरज काय?

--

माझ्या घराच्या बाजूला एक तमिळ कुटुंब राहतं. त्यांचं २-३ वर्षांचं कार्टं पाहावं तेव्हा त्याची सायकल दामटत पायात येत असतं. लहान मुलांच्या सायकलच्या हॅंडलला नाही का त्या चकचकीत रंगाच्या झिरमिळ्या असतात, तशा त्याच्याही सायकललाही आहेत, पण ते कार्टून झिरमिळ्यांच्या जागी त्याची चड्डी टांगून वेडबागडं हिंडत असतं. त्याला वाटतं असं केलं की आपण काय हुश्शार, इतरांहून वेगळे! पण खालून ती सायकल लागत असणारच. आणखी तीन-चार वर्षांमध्ये त्याला हे कळेलच.

अरिजीतला अजून कळू नये?

अरिजीतचं बेखयाली हे सचेतच्या थोड्याशा वेडसर, युयुत्सु आणि पोरगेल्याशा ते तरणाबांड याच्यामध्ये कुठेतरी असलेल्या आवाजातल्या 'बेखयाली'पुढे किती पुचाट वाटतं याची त्याला कल्पना तरी आहे का?

--

मला सचेत टंडन आवडतो अशातला भाग नाही. (मी त्याचं नाव सवयीने 'सॅशे' असं वाचलेलं) 'बेखयाली' हे मी त्याचं ऐकलेलं पहिलंवाहिलं गाणं. त्याच्या तुलनेत मला अरिजीतची कितीतरी जास्त गाणी आवडतात, पण एक बाब मात्र खरीये की,
'बेखयाली' हा अरिजीतचा प्रांत नोहे!

तुम्हाला आरशात पाहून हातवारे करत प्रेमगीतं म्हणायचियेत, तर अरिजीत हवा.
तुम्हाला समुद्रकिनारी बसून थंड नि:श्वास सोडाचये झालेत, तरीही अरिजीतच हवा.
93.5 रेड एफएमवर गाणं कोणातरी 'स्पेशल समवन'ला गाणं डेडिकेट करायचंय, तर ते शंभरातल्या नव्वद वेळा अरिजीतचंच असणार.
पूर्वीच्या काळी जगजित सिंग, पंकज उधास बागेतल्या बेंचवर किंवा परदेशातल्या एक्झॉटिक कॅफेमध्ये बसून प्रेमाची गाणी गायचे, तशी गाणी आजच्या जमान्यात गायलाही अरिजीतच हवा.
मला स्वत:ला अरिजीतचं रंगूनमधलं 'ये इश्क है', कलंकचा टायटल ट्रॅक, रामलीलामधलं 'लाल इश्क', 'फितूर मेरा', हैदरमधलं 'खुल कभी तो' ही गाणी प्रचंड आवडतात. ही गाणी अजूनही माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत. पण सुदैव म्हणा किंवा दुर्दैव, आपल्याला जेव्हा गायक आणि त्याची गाणी आवडत जातात तेव्हा त्याचा पॅटर्न आणि त्याच्या सीमाही कळत जातात.
माझ्या मते अरिजीत जीव ओतून गातो, अगदी पोटातून गातो..
तो कलंकच्या टायटल ट्रॅकमध्ये 'पिया रे..' असं म्हणत आळवणी करतोय, ते ऐकून पोटात तुटल्याशिवाय राहत नाही. त्याला इंग्रजीमध्ये 'He croaked' असा चपखल शब्द आहे. पण,
त्याच्या आवाजात उन्माद नाही.
तो बालिश नाही, वात्रट नाही
तो हट्टी नाही
तो क्युट्सी पण नाही
आणि तो रांगडा तर मुळीच नाही.
तो मच्युअर प्रेमाचा पुरस्कर्ता आहे.
झिंज्या उपटायची किंवा कानाच्या खाली जाळ काढायची इच्छा झाली तरी, अजिबात राग न येता शांतपणे उर्दूमिश्रित सुंदर सुंदर शब्द, सुंदर आवाजात फेकून समोरच्याला गळाला लावायचं आणि ते नाही जमलंच तर पुन्हा मच्युअर विरहाची, मच्युअर प्रेमभंगाची गाणी गायला आहेतच साहेब.
त्यात काही वाईट नाही, बऱ्याचदा ते भावतंही..
पण ते पुष्कळदा मचूळ वाटतं.
आणि पुष्कळदा अपुरं.

उदाहरणार्थ - मी एखाद्याला एखादी गोष्ट बोलून जाते आणि मग नंतर का बोललीस, तोंड उटकटायची काय गरज होती का.. असं म्हणत मी डोक्यावर उशी दाबून पलंगावर कपाळ बडवून घेत असते, तेव्हा मला काय वाटतंय हे सांगायला अरिजीतचं एकही गाणं मिळत नाही. तेव्हा माझ्या मदतीला मोहित चौहान धावून येतो. जेव्हा मला प्रचंड रोमॅंटिक स्वप्न पडत असतं, तेव्हा स्वप्नात पापोनच गात असतो. समोरच्याला कळेल न कळेलशा पद्धतीने फ्लर्ट करायचंय, आणि नंतर 'मी नाही ब्वा' म्हणून हात वर करायचेत, तर सुनिधी हवी. एकंदरच मानवी भावभावनांचा स्कोप असेल, तर कैलाश खेर, राहत फतेह अली खान मस्ट!

अरिजीतची गाणी अतोनात कर्णमधुर, सुश्राव्य आहेत. तुमचा मूड चांगला असेल आणि चांगल्या मूडमध्ये ऐकायला तुम्हाला चांगली गाणी हवियेत, तर अरिजीत इझ युअर मॅन! पण टाळा दाखवत भोकाड पसरुन रडायचंय, धान्याचं भरलेलं पोतं फाटून भळभळावं तसे अश्रू गाळत बेवफा सनमला उद्देशून गाणी गायचियेत, तर हरिहरन किंवा सोनू निगमच आठवतो.

हे जे भावनांमधले पदर आहेत, हा जो भावनांचा पट आहे तो अरिजीतच्या गाण्यामध्ये नाही. त्याचं गाणं आटोपशीर आहे, मोजूनमापून, चापूनचोपून नीटस चौकटीत बसवलेलं आहे, ते देखणं आहे आणि नोट्स दिल्यात त्याच्याशी प्रामाणिक राहून आवाजाचे चमत्कार दाखवणारं आहे. त्याच्या गाण्यात आर्तता असलीच तर ती देखील काटेकोर आहे, ती एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जात नाही.
आणि म्हणूनच त्याचं गाणं भिडतं, पण आरपार जात नाही.

पण, आपलं ज्यावर प्रेम आहे त्या माणसांच्या सगळ्याच मर्यादा, उणीवा आपण समजून घेतो..
तशा अरिजीतच्या उणीवाही पोटात घालतो.

--

मी थोड्याशा साशंक मनानेच 'बेखयाली' ऐकलं होतं, पण सचेतने थोडासा हट्टी, थोडासा मुजोर, थोडासा हळवा, नकाराची, दुराव्याची हिरवी जखम घेऊन भळभळणारा कबिर सिंग इर्शाद कामिलच्या शब्दांमधून माझ्या डोळ्यांसमोर उभा केला होता. अकॉस्टिक आणि बेस गिटारवर तोललेलं, इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा भरणा असलेलं ते रॉक गाणं पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि माहीत नाही किती वेळा ऐकलं, तेव्हा प्रत्येक वेळी कसलं जिव्हारी लागत गेलं होतं. माझी विकेट तिथेच पडली. तुम्हाला आवंढे गिळायला लावायला सतार, चेलो किंवा व्हायोलिनच लागतं अशातला भाग नसतो हे 'रॉकस्टार'ने फार पूर्वीच सिद्ध केलं, नाही का?  बेखयालीने फक्त "मी टू" म्हटलंय. पंडितजींच्या क्लिनिकमधल्या अॅक्युप्रेशर मशीनवर दहा मिनिटं उभं राहिलं की, नंतरची पंधरा-वीस मिनिटं पूर्ण शरीरातून करंट झणझणत जातात. सचेतचं 'बेखयाली' ऐकून अगदी तशीच भावना झाली होती; पण अरिजीतचं 'बेखयाली' ऐकून मलाच धाप लागली. तो कबिर सिंग दम्याचा दुखणाईत असेल आणि भरल्या संसारातून उठून जायला लागत असल्यामुळे असा निरिच्छ, निर्मम आवाजात गात असेल, असं वाटायला लावलं त्या गाण्याने.
अरिजीतने अक्षरश: ओढगस्तीला आल्यासारखं ते गाणं म्हटलंय. 

असो,
लॉंग स्टोरी कट शॉर्ट- मोहित चौहानचं 'साड्डा हक' अरिजीतने गायलं असतं तर कसं वाटलं असतं,  तसंच मला सचेतचं 'बेखयाली' अरिजीतच्या आवाजात ऐकून वाटलं.
सचेतच्या गाण्यात 'ये जो लोग-बाग हैं, जंगलकी आग है'च्या वेळी मागे करताल वाजतं, ते प्रचंड इरॉटिक, उद्दाम आणि रहस्यमय वाटतं. तेच करताल अरिजीतच्या व्हर्जनमध्येही वाजतं, पण त्यात ते जाम केविलवाणं वाटतं. पॉलो कोएलो म्हणतो तसं, "अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने मे जुट जाती है". सचेतच्या गाण्यातलं सर्वकाही, अगदी 'फासला मिटा..'च्यावेळी या कानातून त्या कानात जाणारा वाऱ्याचा झंझावात- हे सर्वकाही एकत्र येऊन त्या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. 
अरिजीतच्या गाण्याचं कंपोझिशन तेच आहे, हा वाऱ्याचा झंझावात तिथेही आहे, पण तिथे-
बेखयालीचा खयाल मात्र नाही.

--

मला काहीतरी सांगायचं असेल, तर शंभरातल्या नव्वद वेळा मी गाण्याचा आधार घेते. संगीत हे शॉर्टहॅंडमधलं कन्फेशन असतं म्हणे! (हाण तिच्या...)  
माझ्या मनातले लोकांचे बुकमार्क हे गाण्यांनी बनलेले असतात. मी जेव्हा नव्या माणसाला भेटते आणि मला ते माणूस आवडतं, तेव्हा त्याला/तिला एखाद्या गाण्याचं बॅकग्राउंड जोडलं जातं.
आणि मला आवडणाऱ्या एकाही व्यक्तीला अरिजीतच्या गाण्याचं बॅकग्राउंड नाही.
मी ऐकलेल्या प्रत्येक गाण्यामध्ये माणसांचे तुकडे तुकडे शोधणारी पोरगी आहे. मी पुन्हा पुन्हा ऐकलेल्या त्याच गाण्याने, त्याच शब्दांनी हवी तीच व्यक्ती डोक्यात आली नाही की, माझ्यासमोर एक्झिस्टेन्शियल क्रायसिस निर्माण होतो.
आणि त्यामुळेच अरिजीतचं 'बेखयाली' ऐकून मी बिथरले.

अरिजीतच्या गाण्यांनी मला याआधी आनंद दिलाय आणि त्या काही क्षणांच्या भांडवलावर हे सगळं विसरुन पुढे जाता येऊ शकेल, नव्हे मी जाईनच.
पण,
अरिजीतने असं करायला नको होतं.
हे बरं नाही.

--

आजचा शब्द
मेलोमानी
(नाम)
संगीत आणि सुरांबद्दल नको तितकं आणि निरातिशय प्रेम व आकर्षण.

न बोलू मैं तो कलेजा फूँके..

कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं.
आपल्याला कोणातरी भेटतं..
आपल्या आयुष्यात कोणाचातरी शिरकाव होतो हे म्हणायला गेलं तर किती अद्भुत आहे..

ही माणसं येतातच मुळी त्यांचं पूर्ण आयुष्य घेऊन..
आणि आपल्या आयुष्यात येताना त्यांचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही घेऊन येतात.
त्यांचं थकलेलं, मोडकळीला आलेलं, अस्वस्थ, अनिश्चिंत, कावरंबावरं मन (मन असतंच तसं म्हणा..)
ते ही घेऊन येतात सोबत.

मला कुतूहल या गोष्टीचं आहे की, तुझ्या मनाची अवस्था कशी आहे.
त्याला कायकाय पाहावं लागलंय, त्याचा प्रवास कुठून कुठवर झालाय..

माणसांना जीव लावणं काय असतं हे एकदा का माहीत झालं की माणूस जीव लावायला घाबरतो..सतरांदा विचार करतो
मला ते माहीत आहे..आणि म्हणूनच मी घाबरते आहे.
तुम्हाला एखादी गोष्ट माहीत झाली की, ती तितक्या सहजपणे पुन्हा करावीशी वाटत नाही, आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात
तुला ते बहुतेक माहीत असेल, अथवा नसेल
माहीत नसेल, तर ते बरंच आहे
काहीकाही वेळी गोष्टी माहीत नसल्या तरी फार काही बिघडत नाही
त्यामुळे ते फार मनाला लावून घेऊ नकोस!!

परवाच घरी गेलेले तेव्हा समुद्रावर गेले.
मी अजूनही एखाद्या पुरुषासोबत बसून समुद्र पाहिलेला नाही
जी गोष्ट बरीच लोकं फारसा विचार न करता, फार प्रयत्न न करता करतात, ती गोष्ट मी अजूनही केलेली नाही
मी न केलेल्या गोष्टींमध्ये खूप गोष्टी आहेत...जगता जगता, पाण्याच्या वर डोकं ठेवायचा प्रयत्न करता करता राहून गेलेल्या..
हावरेपणाने जगून घेतलेली वर्षंही आहेतच, पण लेखाजोखाच मांडायचा झाला, केलेल्या गोष्टींपेक्षा करुन घ्यायच्या राहिलेल्या गोष्टीच फार आहेत
ली जक म्हणतो तसं- ते तसंच असायचं असतं..
तेव्हा, फार जीवाला लावून घेऊ नकोस!!

मी समुद्र पाहिलाय, असं कधी म्हणू नये
तू आधी पाहिलेला समुद्र तू नंतर पाहशील त्या समुद्रापेक्षा वेगळा असणारेय..
नव्या माणसासोबत पाहशील तेव्हा त्या माणसासोबत पाहण्याची पहिली वेळ असेल.
हे पहिलेपण या केल्या-नकेल्या गोष्टींचंही असतं बहुतेक.
तुम्हाला त्या कितीही चांगल्या माहीत असल्या-नसल्या, तुम्ही हे आधी केलेलं आहे असं तुम्हाला वाटत असलं,
तरी..
तुम्हाला ज्या व्यक्तीच्या असण्या-नसण्याने फरक पडतो तिच्यासोबत केलेली गोष्टदेखील पहिल्यासारखीच असेल.

माणसामाणसांमधले क्षण, ते लम्हे..त्यानंतर घडणारं सर्वकाही यात कोणाचाही दोष नसतो
ते तसंच घडणार असतं
काही लाटा लपलपत राहतात आणि काही किनाऱ्यावर येऊन फुटतात
ते तसं का झालं याबद्दलच्या विचाराला तसा काही अर्थ नसतो.
कारण, ते तसंच होणार असतं..
तसं नसतं झालं, तर आणखी कोणत्यातरी पद्धतीने झालं असतं..
पण झालं असतंच.
सो डोण्ट थिंक अबाउट इट सो मच.

आणखी एक गोष्ट-
तू कालचा दिवस जगून घेतला म्हणजे तुला आजच्या दिवसाबद्दल सगळं काही कळलं असं नसतं
त्यामुळे, फार विचार करु नकोस
लेट इट बी.
होतंय ते होऊ देत.
घडतंय ते घडू देत.

मिकन् म्हणे -

मिकनला जाग आली तेव्हा सभोवताली अजूनही काळोख होता.

"मिकन्, डोळे उघडले नाहीस तर तुला काळोखच दिसणार."
मिकनच्या आतून एक आवाज त्याला असं काहीतरी सतत सांगत असतो. तो आवाज कुठून येतो हे काही मिकनला अजून समजलं नव्हतं. वूडीच्या आतून "आय हॅव्ह स्नेक इन माय बूट!" असा आवाज येतो पण त्याच्यामध्ये एक मशीन असतं म्हणून. आपल्या आत कुठे मशीनेय?
मिकनने पडल्यापडल्याच त्याची बंडी वर करून पुन्हा एकदा पाहून घेतलं आणि मान हलवली.

आई घरी नसते तेव्हा ती बाबा आणि मिकनसाठी चिठ्ठ्या लिहून ठेवते. 'मिकन्, खाताना रडायचं नाही.' 'मनू, मिकन कुठे आहे ते बघ.' 'मनू, मिकनला भूक लागलिये का बघ.' आणि त्या चिठ्ठ्या कुठेही मिळतात.. बाथरूममध्ये, बाहेरच्या अंगणात, फळांच्या टोपलीमध्ये, बाबाच्या बूटात, कुकरमध्ये.. कसली धमाल...
आपण झोपलेलो असताना आई आपल्या पण आत त्या चिठ्ठ्या भरून ठेवते  आणि त्याच चिठ्ठ्या आपल्या आत वाजतात यावर मिकनचा पूर्ण विश्वास होता.
"पण अजून डोळे का उघडत नाहीये?"
मिकनने डोळे बंद असतानाच मोठे करून ताणून उघडण्याचा प्रयत्न केला. पण छे! डोळे उघडेचनात. आईच्या लोणच्याच्या बरणीच्या झाकणासारखे चिकटून बसले होते ते.
मिकनला एकदम भीती वाटायला लागली. आपले डोळे कधीच उघडले नाही तर?
मिकन् घाबरून आईला हाक मारायला गेला, तर त्याच्या घशातून आवाजच फुटेना.
हे म्हणजे बाबाच्या गाडीसारखं झालं. आई त्याला 'खटारा' म्हणते. बाबा गाडीला चावी लावून फिरवतो तेव्हा पहिल्यांदा काहीच होत नाही. असे दोन तीन निष्फळ प्रयत्न झाल्यानंतर मिकन् बाबाकडे पाहतो, बाबा आईकडे आणि आई वर आभाळाकडे..
आई? आई कुठेय?
"आईsss"  मिकनने हाक मारली, पण मग त्याला आठवतं की, तीन दिव झाले, आई नाहीये इथे.
त्याच्या घशात एकदम दुखलं.
मिकनच्या त्या केविलवाण्या हाकेवर गुडनाइटच्या लाल दिव्यावर बसलेली फेअरी गॉडमदर मात्र फिस्सकन् हसली आणि मिकनने त्याचं पांघरूण डोक्यावरून गच्च ओढून घेतलं.
"ना!"
पण दुसऱ्याच क्षणी त्याने ते खस्सकन ओढून फेकून दिलं.
"नाही मिकन्..अजिबात घाबरायचं नाही."
दॅट् राइट.. मिकनने खसाखसा डोळे चोळले आणि एकदाचं त्याला बाबाच्या चष्म्यातून पाहिल्यासारखं अंधुक दिसायला लागलं. आणि त्याला दिसलं की, फेअरी गॉडमदरने तिच्या झाडूला किक मारलिये आणि ती त्याच्याकडेच यायला निघालिये.
मिकनचं अचानक चार पायाचं मांजर होतं आणि तो पाठीची कमान करून पायाच्या ढेंगांमधून पाहायला लागतो.  
"बरोब्बर मिकन्.. डोकं खाली, बम वर."
डोकं खाली करून पाहिलं की जग किती वेगळं भासायला लागतं. ती गेअरी फॉडमदर सुद्धा.
मिकनने तिच्याकडे खाली डोकं वर बम करून पाहिलं तशी ती तिच्या झाडूसकट उलटी पालटी होऊन मशीनवरून खाली पडली आणि फटाका फुटल्यासारखी नाहिशी झाली.
बाबाने शिकवलेली ट्रिक आजपण मिकनच्या कामी आली. य्ये!!
पण..
घर इतकं रिकामं का वाटतंय?
बाबा? मिकनचा आवाज परतलाय.
बाsबाsss
टप्पी बॉल या भिंतीवरुन त्या भिंतीवर आपटत जावा तसा मिकनचा आवाज घराच्या कानाकोपऱ्यातून घुमत घुमत विरला पण बाबाचा ओss काही आला नाही.
"आपलं घर काय सांगुळवाडीची दरी आहे का?"
 खरंच होतं ते. आपलं घर खूपच मोठंय असं मिकनला खूपदा वाटे.

आता मात्र मिकन उठला.
अर्धवट झोपेत डोलकाठीसारखं डुलत मिकनने हॉलमध्ये डोकावून पाहिलं, पण बाबा तिथे नव्हता. किचनमध्येही पाहिलं, पण बाबा तिथेही नव्हता.
"बाबा कुठेय?"
त्याने पाहिलं की, बाथरुमच्या दारातून बाबाच्या पायाचे ओले ठसे बेडरुमपर्यंत गेले होते. पण बाबा बेडरुममध्येही नाही.
तेवढ्यात मिकनची नजर दरवाज्यावर गेली.
"मिकन..पाहिलंस का?"
दरवाजा उघडा होता आणि दरवाजाच्या बाहेर घातलेलं कुंपण उघडं होतं.
मागच्या वेळी मिकनने चिमणीच्या मागे धांदरटपणे धावताना कपाळाला खोक पाडून घेतल्यानंतर आईने ते कुंपण घातलं होतं. आई किंवा बाबा सोबत असल्याशिवाय बाहेर जायचं नाही अशी सक्त ताकीद होती मिकनला. मागच्या वेळी आईची नजर चुकवून बाहेर गेला असताना आईने पाठीत घातलेले धपाटे आठवून मिकनची पाठ आताही हुळहुळली.
तेव्हापासून मिकन् ती लक्ष्मणरेखा पाळत होता.  लक्ष्मणरेखा ओलांडल्यावर सीताजींचं जे काय झालं ते झालं, पण आईच्या डोळ्यातला राग आणि तिचा अबोला.. नको रे बाबा
"पण आई इथे नाही, नाही का मिकन्?"
पण आपण इथे कुंपण ओलांडल्याचं आईला तिथे दूर बसूनही कळेल आणि ती तिथे दूर बसूनही आपल्यावर रागवेल या भीतीने मिकन् कुंपणापासून थोडं दूरच उभा राहिला आणि त्याने कंबर वाकवून कुंपणावरुन बाहेर पाहिलं.
बाबा दूरदूरपर्यंत दिसत नव्हता.

एका चिमणीने त्याला शुक शुक केलं, मिकनने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.  एका मांजराने त्याला हात मारुन खेळायला बोलावलं, पण मिकनने त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं
मिकनने आता मांडी ठोकली आणि आज्ञाधारकपणे कुंपणाच्या आत बसून राहिला..आईच्या गोष्टींमधल्या आज्ञाधारक मुलासारखा..
"सरडेराव आजही दिसत नाहीत, नाही?"
दोन दिवसांपूर्वीच मिकनला एक सरडेबुवा अंगणात जोर काढताना दिसले होते आणि मिकनला एकदम बाबाची आठवण झाली होतं. त्याला वाटलेलं, बाबाही जोर काढताना असाच दिसतो.
पण त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मात्र सरडेबुवा उगवले नाहीत, तेव्हा मिकनला आश्चर्य वाटलं होतं
ज्यांना पाहायचं असतं ती माणसं दर दिवशी तशीच आणि तिथेच असण्याची आणि त्यांना हवं तेव्हा पाहता येण्याची सवय असलेल्या मिकनला हे असं कसं काय हे समजलं नव्हतं.
दर दिवशी उठल्यावर पाहावं तर आई टेबलापाशी बसून काहीतरी लिहीत असते,  बाबा पेपर वाचत असतो, किचनमधून गरम चपात्यांचा मस्त वास येत असतो. गुऱ्या नेहमीसारखा झोपलेला असतो.
मग बहुधा सरडेबुवांचं वेळापत्रक आईसारखं, बाबा म्हणतो तसं 'स्ट्रिक्ट' नसेल, असं मिकनला वाटलं.
पण एकंदरीतच - सगळ्या गोष्टी एखाद्या दिवशी असतील तशा दुसऱ्या दिवशी असतीलच असं नाही असं काहीतरी कळून घेतल्याने मिकनला फार हुशार असल्यासारखं वाटलं.
"हे सरडेबुवा बाबासारखे बिलकुल नाहीत. बाबा नेहमी जोर काढतो. या सरडेबुवांसारखा सुट्टी घेत नाही."
अगदी बरोब्बर!
तेवढ्या मिकनचं पोट गुरगुरलं.
असे हुशार विचार केले की मिकनला हटकून भूक लागायची.
"मिकन, बाबा नाही आहे. रेडी?"
मिकनचा चेहरा अचानक खुलला आणि त्याने नाकात बोट घातलं. नाकाच्या आत बोट गरागरा फिरवून नाकात कालपासून वाढवत ठेवलेलं मेकूड काढायला मिकनला तब्बल ५ मिनिटं लागली.
"मागच्या वेळेपेक्षा मोठं आहे नाही?"
नाकातलं ते वाटाण्याइतकं मेकूड चारी बाजूने निरखून पाहताना मिकन बाबा घरात नाही हे देखील विसरला आणि ते मेकूड मळून मळून त्याची हाजमोलासारखी गोळी करुन चघळताना मिकनला त्यानंतरची पाच मिनिटं चोरुन कुंपण ओलांडतानाही झाला नसता तितका आनंद झाला.

पण अजून काही बाबाचा पत्ता नव्हता.
आता काय ब्र करावं याचा विचार करत करत मिकनने हॉलला एक फेरी मारली. फक्त भिंतींच्या कडेकडेनेच नाही, तर हॉलच्या एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंतही फेऱ्या मारता येतात, हा नवा शोध त्याला हल्लीहल्लीच लागला होता. भिंतींच्या कडेकडेने फिरताना ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार दोनदा म्हणून होतं, पण या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जाताना तीनदा म्हणून होतं. हे कसं काय हे त्याला आईला विचारायचं होतं.
पण आई इथे नाही.
मिकनने दाराजवळच्या चपलांच्या स्टॅंडकडे पाहिलं. आई तिच्या सगळ्या रंगबिरंगी चपला घेऊन गेली होती. आता त्या स्टॅंडवर फक्त बाबाचे काळे आणि तपकिरी बूट उरले होते. मिकनने बाबाच्या एका बूट खाली पाडला आणि त्यात स्वत:चा पाय घातला. बूटाच्या आतला किंचीतसा ओलपरपणा मिकनच्या तळव्यांना भिडला.
मिकनला अगदी बाबाच्या पायावर उभं राहून चालल्यासारखं वाटलं.
.
.
"मिकन्, बाबा कुठेय?"
अजितकाका दाराच्या बाहेरुन विचारत होता.
खलीसारखा उंच असा हा अजितकाका स्कूटीवरुन दूधाची बादली घेऊन यायचा.
बाबा त्याला 'मिल्कमॅन' म्हणायचा. सुपरमॅन, बॅटमॅन काय, त्यांच्या स्वत:कडे पॉवर असते, पण हा मिल्कमॅन साऱ्या जगाला पॉवर देतो, असं म्हणत बाबा त्याला नमस्कार करायचा. मिकननेही त्याला नमस्कार घातला.
"मिकन्, हा मिल्कमॅन आई आणि बाबा दोघांनाही आत्ता इथ्थे आणायची पॉवर देईल काय?"
मिल्कमॅनकडे मान वर करून तोंड उघडं टाकून विचारात गढलेल्या मिकनला आईची एकदम सरसरुन आठवण झाली, बाबा अजून आलेला नाही ते आठवलं, आई तिच्या बॅगा घेऊन कुठेतरी गेलिये हे आठवलं आणि आपल्यालाही बॅगा घेऊन ती गेलिये तिथे जायचंय ते आठवलं, तिथे जाईपर्यंत आपल्याला आई दिसणार नाही हे देखील आठवलं आणि इतके सारे विचार एकाच वेळी यायची सवय नसलेल्या मिकनने डोक्यातली गर्दी सहन न होईन ओठ काढून भोकाड पसरलं.
"अरे मिकन्, काय झालं?"
बाबा काखेत पेपरांचा मोठा गठ्ठा घेऊन परतला होता आणि अगदी अचंब्याने एका पायात बूट घालून रडणाऱ्या मिकनकडे पाहात होता.
"बाबा आपल्याला 'मिक्या' सोडून 'मिकन्' बोलायला लागलाय"
बाबाला समोर पाहून मिकनचं रडणं बटण ऑफ व्हावं तसं खट्टकन् थांबलं.
"मला काय माहीत तू लवकर उठशील?"
बाबा मिल्कमॅनकडून दूध घेता घेता बोलला. 
सगळ्या गोष्टी एखाद्या दिवशी असतील तशा दुसऱ्या दिवशी असतीलच असं नाही ही आपल्याला कळलेली गोष्ट बाबाला अजून कळायची आहे असं मिकनला वाटलं आणि त्याला बाबा जरा जास्तच आवडायला लागला.
"आईपेक्षा जास्त??"
मिकनच्या आतला आवाज कधीकधी त्याला असं काहीतरी कठीण विचारे.
बाबाकडे पाहात असताना आपल्याला काहीतरी समजतंय, पण काय समजतंय ते समजत नाहीये असं काहीसं मिकनला वाटलं.
"मिकन्, काय खाणार कॉर्नफ्लेक्स की पोहे?"
आणि मग समोर आलेल्या कॉर्नफ्लेक्सवर आई घालते तशाच अॅप्पलच्या पातळ फोडी पाहून मिकनला वाटलं की, आई काय आणि बाबा काय एकसारखेच आहेत. आई नसते तेव्हा बाबा तिची जागा घेतो आणि बाबा नसतो, तेव्हा आई त्याची जागा घेते.
म्हणून आई इथे नाही याचं जास्त रडायला येत नाही.

"मिकन्, मला काय वाटतंय माहितिये का? मला वाटतंय तुझ्या आईने इथे CCTV  कॅमेरा लावलाय"
बाबाला कॉर्नफ्लेक्सच्या डब्यात एक चिठ्ठी मिळाली होती आणि त्यावर लिहिलं होतं-
'मनू, बाहेर जाताना कुंपणाला कडी घालायला विसरू नकोस.'
CCTV म्हणजे काय हे मिकनला माहीत नव्हतं. आई भेटली की तो तिला विचारणार होता.
"बरंss, का रडू फुटलेलं आपल्याला
बाबा त्याचं कॉर्नफ्लेक्स घेऊन समोर बसला होता.
नुसतेच कॉर्नफ्लेक्स. दूध नाही, अॅप्पल नाही.
"बाबा, आय मिस्ड यू"
बाबा, आय मिस्ड यू! 
मिकनच्या आतला आवाज त्याला काय वाटतं ते खरंखरं बोलायला शिकवत होता.
बाबाने आश्चर्याने मिकनकडे पाहिलं.
"मी इथेच आहे तरी? अच्छा, तुला म्हणायचंय, यू मिस्ड आई?"
तेच ते. मिसिंग बाबा म्हणजेच मिसिंग आई.
पण, बाबाला काय सांगणार. त्याला अजून खूप गोष्टी कळायच्या आहेत.
मिकनने हसत मान हलवली आणि कॉर्नफ्लेक्स ओरपायला सुरुवात केली.

--

याआधीचे: मिकन् मिकन् आणि गुऱ्या | मिकन् आणि पायपर

ओव्हर-सेंटिमेंटली युअर्स..

स्वत:चं घर वीटेवीटेने चढताना पाहणं म्हणजे मुलाला पोटात मायेने वाढवण्यासारखंच असतं.

म्हणजे असावं.

समोरच्या होऊ घातलेल्या बंगल्याचं प्लॅस्टरिंग चाल्लंय आणि घराच्या समोर प्लॅस्टरकरता सिमेंटच्या गोण्या येऊन पडल्यात. त्याचा एक पिरॅमिडसारखा डोंगर करून घेतलाय. त्यावर फतकल मारून बसणं आणि पिठाच्या गिरणीतल्या भैय्याचे जुळे भाऊ असावेत अशा मजूरांचे काम पाहात बसणं हा माझा फावल्या वेळातला विरंगुळा बनलाय आताशा.

त्याच्या एका तालात होणाऱ्या हालचाली, काळ्यासावळ्या दंडातल्या घडीव स्नायूंची लयबद्ध उठबस पाहताना मंत्रावल्यासारखं होतं.
मार्चला हे काम संपेल तेव्हा या सगळ्याची जाम आठवण होत राहणार आहे.

या मजूरांची मुलंही त्यांसोबत असतात पण त्यांचा बिलकुल त्रास नसतो. नखशिखांत दिगंभर बटूमूर्तींपासून ते शहण्या भावंडापर्यंत सर्व वयोगटातली मुलं असतात तिथं.

त्यातलंच एक बुटकं बंगल्यांना घातलेल्या कुंपणातून, झाडा-फुला-पानांमधून बेदरकार फिरत असतं.

आज त्याचा मूड नसावा. त्याने त्या बंगल्याच्याच जास्वंदीच्या झाडाला हात घातला आणि कुंपणातल्या जास्वंदाचं फुल तोडलं. तोडलं म्हणजे आजूबाजूच्या चार-पाच पाना-काटक्यांसह अतिशय धसमुसळेपणाने तोडलं.

मी ताठ झाले कारण मला काहीतरी ऐकायला आलं.

मग त्या मुलाने त्या फुलाला चारी बाजूने न्याहाळलं. बोटभर देठासह झाडापासून तुटून आलेलं ते फुल अतिशय रसरशीत लाल रंगाचं अतिशय देखणं फुल होतं. त्यावर रक्तवर्णी रेषा होत्या. देठाचा वरचा फुलाचा भार तोलणारा असलेला मुकूट अतिशय साजिऱ्या पोपटी रंगाचा होता.

आणि नंतर त्या मुलाने जे काही केलं ते अनपेक्षित होतं.

त्याने त्या फुलाची एक पाकळी उचकटली, फुलावेगळी केली. आणि तो तिथेच थांबला नाही. त्याने त्या पाकळीच्या घड्या घालायला सुरूवात केली. प्रत्येक घडी घातली की तो त्या घडीवरून नख फिरवायचा, आपण कागदाची होडी करताना कागदाच्या कडांवरून फिरवतो तसा.

फुलाला आवाज असता तर ते कशा प्रकारे किंचाळलं असतं याचा मला अंदाज लावतच मी बसल्या जागी हादरून गेले.

त्यानी अतिशय थंडपणे प्रत्येक पाकळी उलून काढली, आणि तिच्या इतक्या बारीक घड्या घातल्या की प्रत्येक घडीसरशी कच्च असा आवाज येत होता. रस्त्यावर बिनघोर पडलेल्या बुचाच्या फुलांवरून मोटरसायकली निघून जातात तेव्हा कच्च आवाज येतो तसा.

मग त्याने त्या हिरव्या मुकूटाकडे आपला मोर्चा वळवला, तो देठावेगळा केला, तो जमिनीवर टाकला आणि त्यावर पायाची टाच कचकचून  घासली. आणि मग तो चहा-पाव खायला गेला.

माझ्या डोक्यातल्या ऑडिटरी हल्युसिनेशन्सनी माझे पाय एव्हाना शेणामेणाचे झालेले, पण मी जाऊन त्या फुलाचं कलेवर उचललं. पाकळ्यांची दुमड काढली, बोटांनी ती पाकळी सारखी करायचा प्रयत्न केला पण ती पाकळीच्या अक्षरश: धांदोट्या झाल्या होत्या आणि त्या विचित्र कोनात लोंबत होत्या.

आधी नितळ, मऊसूत पाकळ्यांवर आता काळ्या, कुरूप रेषा उठल्या होत्या आणि त्यातून चिकट पाणी गळत होतं.

देठाचा पत्ता नव्हता. कूटातला धागा न धागा सुटा झाला होता.

मी पाहिलंय भीषण आपघातात सापडलेल्यांचे असे निरनिराळे अवयव गोळा करून घेऊन जाताना.

तो तरी अपघात होता. हे तर निव्वळ क्रौर्य. फावल्या वेळातलं, वेळ जात नाही म्हणून घडलेलं.

आणि त्यात त्या फुलाचा हकनाक बळी गेला.

फुलाच्या किंचाळ्याचे पडसाद रक्ताच्या थारोळ्यासारखे सबंध आसमंतभर पसरलेले होते. त्या फुलाइतकेच रक्तवर्णी, कानाचे पडदे जाळ्णारे.

गोष्टी बोलतात. आपण ऐकायला शिकलं पाहिजे. आपण कधी ऐकून घेत नाही.
हे कोणीतरी दुसऱ्याने लिहिलेलं वाक्य असेल, तर वाचताना वाटतं, काय डीप बोलतोय. पण का शिकलं पाहिजे? हा मला कालांतराने पडायला लागलेला प्रश्न.
तुम्ही जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तुमच्या वेदनांमधलं गांभीर्य, कळकळ कोणालाच कळत नाही. ते फक्त आपल्यालाच कळतं. मग जे आपल्यालाच कळतं, ते आपल्यापाशीच राहू द्यावं.

लोकांपासून दूरदूर करण्याची, प्रेम न जडवायची सवय होऊन गेलीये आपल्याला. ती मरणं आता काहीशी मॅनेजेबल झालियेत. मग ही अशी नस्ती लफडी आपण आपल्या डोक्याला का लावून घेतो? अशी  शंभर अ‍ॅब्स्ट्रॅक्ट मरणं पुन्हा पुन्हा का मरतो?

मुराकामी म्हणतो की, वेदना क्षणिक असते पण तिचे भोग भोगायचे की नाहीत हे आपल्या हातात असतं. (हे अशा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट टॉर्चरलाही लागू आहे) माझ्याही हातात आहेच की, मला काय वाटतं माहितिये? माझ्यातून वेदना आणि तिच्या भोगांमधून वाटणारं ते अतिविचित्र सुख काढून घेतलं तर मी मातीच्या गडग्यासारखीच बनेन. लोक त्याला फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स का म्हणेनात, मला ते प्रिय आहेत.

वेदनांना वळसा घालून कसं जायचं हे शहाण्यांना उत्तम कळतं म्हणे. निदान ते अशा मार्गांच्या शोधात असतात.
इथे सालं शहाणं कोण आहे?

आपण आहोत?

नसलो तरी आपल्याला बनायचं आहे का?

आणि तसंही, हे भोग बिग भोगणं सरावातून अंगवळणी पडतं असं वाटतं, कारण मग जग का उलथेना का तिथे - मला भूकही तेव्हढीच आणि एरव्हीसारखीच लागते आणि झोपही बिनघोर लागते.

--

कुठल्यातरी एका पुस्तकात बाल गणेश एका राक्षस ढेरीवर बसलाय असं चित्र पाहिलं होतं. मला त्या राक्षसाचं खूप वाईट वाटलं होतं.

सगळ्या राक्षसांना डार्क सर्कल्स का असतात? पाताळलोकात त्यांच्या व्यथा ऐकून घेणारं अ‍ॅगनी आण्टसारखं कोणी नसतं का? 'डेव्हिल मे केअर' नावाची हेल्पलाइनही नाही? मेल्यानंतरच्या करीअर अपॉर्च्युनिटी शोधणारं माझ्यासारखं भैताड कोणी आहे का?

ऑन दॅट नोट-
आता माझ्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी व्हायला लागली आहेत.

ही चांगली बातमी आहे. वाटलं, कळवावं.
 
Designed by Lena