’च्यकच्यकाटा’नंतरची लव्हस्टोरी..!!

पश्चिम रेल्वेच्या त्या ’च्यक च्यक च्यकच्यकाटा’नंतर नाटकाचा फ़्लॉप-शो न होऊ देत अशी परमेश्वराची करूणा भाकत आम्ही प्रबोधनकार नाट्यसंकुलात दाखल झालो...
तिथेही भारतीय वेळेने निराशा केली नाही...
४-३० चं नाटक ४-५० ला सुरु झालं...
पहिली २-३ मिनीट्स निखिल रत्नपारखीचे संवाद ऐकूच येत नव्हते...तांत्रिक गडबड असावी बहुतेक...नंतर सर्व सुरळीत चालू झाले...
नाटक नवखं असल्यामुळे की काय दोन प्रवेशाच्या मध्ये जो रंगमंच व्यवस्थेसाठी ब्लॅक-आऊट होतो तो या नाटकात नव्हताच मुळी...
मंद निळ्या प्रकाशात माणसं येऊन काय काय कुठे ठेवत होती ..हे सगळं लख्ख कळत होतं...
जरा खटकण्याजोगीच बाब होती...पण नाटक इतके फ़ंडू आहे की या सर्वांकडे काणाडोळा केला तरी हरकत नसावी..
कोणत्यातरी कॉस्मेटीक कंपनीत मॅनेजर पदाला असणारया ’निनाद भागवत’ नामक एका बॅचेलर तरूणाची आणि एका Advertising एजन्सीची मालकीण असणारया स्मिता जोशी नामक एका तिशीच्या तरूणीची ही कथा...
पूर्ण कथानक निनाद, स्मिता आणि त्या दोघांचे 'Alter Egos' ज्यांना आपण अंतर्मने म्हणू शकतो अशा चौकडीभोवती फ़िरते..
निनादच्या कंपनीच्या जाहीरातीची कंत्राटं स्मिताची कंपनी घेत असते..या तद्दन प्रोफ़ेशनल नात्यामधून निनाद तिच्याकडे ओढला जातो..तिला पटवण्याकरता आणि नंतर घायकुतीला येऊन तिला प्रोपोज करण्यासाठी तो नाना शक्कली लढवतो...आणि त्याला अपेक्षित नसलेल्या पद्धतीने स्मिताच्या वागण्यामुळे प्रत्येक वेळेस तोंडघशी पडतो..
या सर्व नाट्यमय प्रसंगात दोघांचीही मने (आनंद इंगळे आणि मुक्ता बर्वे)त्यांच्या आसपास वावरत असतात..जे काही चाललेय ते कधी त्रयथपणे पाहतात तर कधी हस्तक्षेपही करतात..
पण...
स्मिताला पटवण्याच्या आणखी एका प्लॅनचा बोरया वाजल्यानंतर दोघांचीही मने एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग स्मिता-निनादला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात..
मग आहे थोडासा अट्टाहास,संशय आणि भविष्याचा अतिविचार यातून उद्भवणारा भावनिक हलकल्लोळ आणि गोड शेवट...अर्थातच..!!!
किरण पोत्रेकरांनी हेच नाटक पूर्वी मंगेश कदम,सारिका निलाटकर,मीरा वेलणकर, आणि हृषिकेष जोशी या कलाकारांना बरोबर घेऊन केले होते..
पण आताची स्टारकास्ट तगडी आहे आणि फ़्रेश पण वाटते..
निखिल रत्नपारखीच्या मनाचं काम आनंद इंगळेने करणे म्हणजे जरा ’भव्य’ अल्टर इगोचा फ़ील येतो....आणि स्मिताच्या साईडने तेच काम मुक्ता बर्वेने करणं म्हणजे 'zipped' इफ़ेक्ट वाटतो!!
दोघांची मनं एकमेकांच्या प्रेमात पडेपर्यन्त शृजा-मुक्ता आणि निखिल-आनंद याची वेशभूषा सारखी दाखवली आहे जेणेकरून ते याच माणसांचे ’ आहेत याची प्रचिती यावी..
पण दोघांची मने आपल्या मुख्य व्यक्तिमत्वाच्या अपरोक्ष एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा मात्र त्यांची वेशभूषा वेगळी दाखवली आहे ज्यामुळे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व ध्यानात येतं..
’नितीन’नामक पात्राने तर ज्याम भाव खाल्लाये...स्मिताचा मित्र असणारं हे पात्र रंगमंचावर कधीच येत नाही पण त्याचा अदृश्य वावर स्मिता आणि निनाद यांच्यामध्ये कायम असतो...निनाद तर याच्यावर इतका खार खाऊन असतो की त्यानंतर तो प्रत्येक ’क्षुल्लक’ माणसाला नितीन म्हणून हाक मारणे सुरु करतो..
रंगमंच योजना..अशोक पत्कींचं संगीत ..सगळ्याच बाजू उजव्या आहेत...सर्वात उजवी बाजू अभिनयाची..
अख्खं नाटक निखिल रत्नपारखीने खाल्लय..नि:संशय!!
अतिशय गोंडस चेहरा आणि भोकरासारखे डोळे असणारया इतक्या क्युट माणसाला कोणतीही मुलगी नाकारूच शकत नाही याची खात्री प्रेक्षकाला पटल्यामुळे की काय शेवट आधीपासूनच माहित असतो..
निनादची ’प्लॅनिंग’वरची भक्ती, प्लॅन बाराच्या भावात गेलेला पाहून पडलेला चेहरा,शब्दांच्या कोलांट्याउडया मारताना बेरकी असल्याचा आणलेला आविर्भाव, स्मिताशी बोलताना मुद्द्यावर येताना होणारी प्रचंड घालमेल..निखिल सहीसही दाखवतो..आणि म्हणूनच स्मिता नंतर म्हणते त्याप्रमाणे त्याच्या खोटेपणाने, थापा मारण्याने राग येत नाही उलट गम्मतच वाटते..आणि म्हणूनच आपल्यालाही ते आवडून जाते...
कोणी ’कथा-सरिता’ मधली ’व्यंकूची शिकवणी’ ही कथा बघितली आहे का???
त्यातल्या व्यंकूच्या मास्तराचे काम करणारा निखिल रत्नपारखी असाच 'Lovable' वाटला होता..
दारू पिऊन ’टुन्न’ होऊन बोलण्याच्या प्रसंगात तर प्रचंड धमाल आहे..पण ती नाटकातच बघण्यात मजा आहे..
आनंद इंगळे ’माकडाच्या हाती शॅंपेन’ मधून उचलून ’लव्हस्टोरी’मध्ये घातल्यासारखा वाटतो...
तीच विनोदाची ढब...तशीच बॉडी लॅंग्वेज...तेच टाळ्या मिळवून जाणारं शेळपट हसू...हशा खेचणारा तोच आक्रस्ताळेपणा...
कंटाळा येत नाही पण आनंद इंगळेसारख्या खूप सारे पोटेन्शियल असणारया अभिनेत्याने त्याच त्याच भूमिका सारख्या सारख्या केल्या तर कंटाळा नक्कीच येईल..
शृजा प्रभुदेसाईचं काम मी प्रथमच पाहतेय...फ़टकळ, नाचरी, थोडीशी चक्रम स्मिता तिने व्यवस्थित उभी केलीये..तिच्या तोंडी असलेली एका स्त्रीसाठी मल्टीपल नवरे ही फ़िलॉसॉफ़ी ऐकून पुराणमतवाद्यांना झीट येण्याची शक्यता नाकारता येत नाही...तब्येतीने घेतल्यास ते एवढे हानीकारक नाही..
मुक्ता बर्वे...मला वाटले होते तेवढा हा तगडा रोल नाहीये...
मुक्ता बर्वेचा वावर नेहमीप्रमाणेच सहज आहे...मुक्त आहे...ती दिसलीये पण छान!!
पण तिच्यातली आणि आनंद इंगळे मधली जवळीक, घट्ट मिठी प्रेक्षकाला कितपत पचेल कुणास ठाऊक??
तसं पाहिलं तर मुक्ता बर्वे आणि आनंद इंगळे ह्यांना ’कपल’ म्हणून पाहणे मला जरा पचलेच नाही पण ठिकाय...
नाटक पाहताना माझ्या शेजारच्या आज्जी आजोबांना कोपरयाने ढोसत होत्या...त्यावरून नाटक नावालाच किती जागतेय याचा प्रत्यय यावा..
अशी ही थोडीशी दृश्य..थोडीशी अदृश्य...थोडी कॉमन...थोडीशी अनकॉमन लव्हस्टोरी!!!
’सुयोग’ प्रकाशित.. डॉ. विवेक बेले लिखित.. किरण पोत्रेकर दिग्दर्शित दोन अंकी धमाल नाटक ’लव्हस्टोरी’!!!

च्यक च्यक..च्यकच्यकाट!!

कुठलीतरी सुट्टी आणि प्रबोधनकारला लागणारा एखादा फ़ंडू नाटकाचा प्रयोग मी आणि आई सहसा चुकवत नाही..
त्यातून 'लव्हस्टोरी' या नव्या नाटकाचा प्रयोग आणि आम्हा दोघींची favorite मुक्ता बर्वे त्यात असल्यावर प्रयोग चुकवायचा काही चान्सच नव्हता...पण...
वसई ते बोरीवली हे अंतर पार करायचे म्हणजे पश्चिम रेल्वेचा प्रवास हा ’मस्ट’!!
हा प्रवास वसईहून करण्यापेक्षा वसई-पापडी-नायगाव रूटने केलेला कधीही चांगला म्हणून आम्ही ३-४०च्या दरम्यान नायगाव स्टेशन ला पोहोचलो..
नायगाव...
माझं सर्वात आवडतं स्टेशन...जिथे ना वर्दळ असते ना कलकलाट...भातुकलीच्या खेळात शोभून दिसेल असं स्टेशन...
गावातल्या एखाद्या नव्या नवरीला ’काय पाटलीणबाई’ म्हटल्यावर ती कशी लाजेल तसा नायगाव स्वत:ला ’स्टेशन’ म्हणवून घेताना लाजत असेल कदाचित...
गाडया नेहमीप्रमाणेच उशीराने धावत होत्या...म्हणजे आमचं time element चुकणार नव्हतं ..आम्हाला हवी असलेलीच बरयाच वेळापूर्वीची गाडी आम्हाला उशीराच्या कारणाने मिळणार होती..
आम्हावर उपकार करत असल्यासारखी ठुमकत ठुमकत गाडी आली एकदाची...
नेहमीप्रमाणेच ती माझ्याकडे बघत खट्याळ हसलीसुद्धा...ती आईकडे बघून पण हसली का???हे बघायला मी आईकडे साभिप्राय पाहिलं...आणि आईने मला ’चक्रम आहे पोरगी झालं..." चा उर्ध्व लागल्यासारखे डोळे फ़िरवून टिपीकल लुक दिला..
राज्य परिवाहन मंडळाची एस.टी मला मिशा फ़ेंदारून हसणारया ’प्रिय’सारखी वाटते..पण मी ते आईला सांगत नाही..
गाडी सुरु झाली...
तेवढ्यात पुलाच्या बाजूने एक बाई जीव खाऊन गाडी पकडायला धावत असलेली दिसली..
आज १ मे...आज तर कोणाला कामावर पण जायचे नसेल...मग ही बया भूतलावरची शेवटची गाडी असल्यासारखी स्प्रिंट का मारत्येय??? मला काही कळेचना..
मग इकडून तिकडून सगळीकडून डोकावणारया नानाविध शंकांना शूत!! करून हाकून लावलं आणि तिला 'DDLJ'च्या शाहरुखसारखा हात देऊन गाडीत चढवलं..
"आपली ढाप्पण सांभाळा आधी...हात देतेय!!"
आईची शेरेबाजी ऐकू आलीच पण मी तिकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले..
मी हात देऊन फ़ूटबोर्डवर चढवलेली ती गासंडी अजूनही भात्यासारखी फ़ुसफ़ुसत होती...
"शादी में जाना था.."
च्यामारी..मग लग्न काय हिचे होते धावत गाडी पकडून वेळेवर पोहोचायला???
"नेक्स्ट ट्रेन से चली जाती..जम्प करनेकी क्या जरूरत हय??"
माझं भयंकर फ़्रस्ट्रेट करणारं हिंदी मी शक्य तितक्या सुसह्य 'format'मध्ये वापरत विचारते...
ती गप्प...
तिलाही पटलं असावं बहुतेक..
ही मुंबईकरांच एकाय...
आलेली संधी आणि समोर उभे असलेली ट्रेन कधीच सोडत नाहीत..
आणि गम्मतीचा भाग म्हणजे घाईत असलेल्या सगळ्यांना नेहमी आपल्या समोरून सुटणारी ट्रेनच पकडायची असते..
तर...
मला उतरायचे होते बोरीवलीला आणि मी चढले विरूद्ध दिशेने..
त्यामुळे जसजसे स्टेशन जाईल तसं मी पुढे सरकून घेत होते..
केवळ ५ बाय १२ फ़ूटाच्या त्या कॉरीडॉरमध्ये आम्ही जवळपास ५० जणी जीव मुठीत धरून आणि १० इंच लांबीच्या फ़ूटबोर्डवर १० एक जणी जीव चिमटीत घेऊन उभ्या होत्या..
भयंकर गर्दी होती...
एकाचवेळी एवढी सगळी माणसे जातात तरी कुठे आणि मरायला मुंबईतली सगळी लग्नं शिंची आजच का असावीत??? हा विचार करता करता मी हात पकडायला केलेल्या कडयांवरच्या दहा एक हातांपैकी माझा हात कुठचा ते हात हलवून बघायचा प्रयत्न करत होते...
शेवटपर्यन्त काही कळलंच नाही...
कारण त्यावेळी माझं अनुकरण सगळ्याच जणी करत होत्या...
आता एवढ्या हलणारया हातांपैकी माझा हात शोधायचा म्हणजे..
त्या नादात माझे आधीच बारीक असलेले केस मागचीच्या नाकावर घासले गेले...तिकडून च्यक...
माझा चश्मा डोळ्याशी ४० अंशाचा कोन करून लोंबायला लागला तो नीट करू म्हटले तर माझं कोपर बाजूचीला लागलं...तिकडूनही च्यक...
मी शेवटी नादच सोडला...
तेवढ्यात दुसरया बाजूने खडया आवाजातले बंबैय्या हिंदी ऐकू आले..
आमच्या मातुश्रीच...शंकाच नाही...
तोफ़खाना सुरू झाला होता..
नंतर विचारले असता आई करवादली..."अगं..नुसता निसटता स्पर्श झाला तरी ती च्यक करत होती.आता कोणी तिचा विनयभंग करत होते का???लेडीज डब्बा तर होता.."
आता एवढी जहाल चिरफ़ाड माझी आईच करू जाणे..
पण चूक कोणाचीच नव्हती..
लेडीजचा सेकंड क्लासचा डब्बा म्हणजे असाच पालींचा च्यकच्यकाट असतो..
शेकडो लोकांचे उच्छवास डब्ब्यात भरलेले...कोणाची अखंड पिरपिर चालू आहे...कुणीकडे कोणाची तार स्वरात भांडण चालू आहेत..
अशा वातावरणात आपल्याही नकळत आपलीही चिडचिड सुरु होते..
डब्ब्यात हळदी-कुंकू, संक्रांत वगैरे कौतुकं सगळी डब्ब्याच्या आतल्या भागात चालतात...लवकरच्या स्टेशनला उतरायचे म्हणून दाटीवाटीने दारात उभे असलेल्यांचं जगच वेगळं..
थोडक्यात काय...ते सुपात असतात तर आम्ही जात्यात!!!
अशा कुबट प्रवासात सुखद आठवणी कुठल्या असायला??
असतात तर अशाच..
"नको ही बजबजपुरी!!"..असं वाटायला लावायल्या...
बाय द वे....
लालूंनी सकाळी ८-४५ चर्चगेट लोकलने प्रवास केलाय का???
मला वाटते त्याने बरेच प्रश्न सुटतील...
लालू सुखरूप चर्चगेटला उतरले तर मुंबईकरांचे...
नाही उतरले तर..
देशाचे!!

एक ’होपलेस’ प्रश्न आणि ’प्रिय’..

परमेश्वराने कायम एकमेकांमधून निसटणारे नट-बोल्ट्स बसवलेल्या मेंदूची रचना केलेले काही विरळा नग बनवले आहेत..आणि मी त्यातला एक जातिवंत वाण आहे..
असं ’प्रिय’ म्हणतो...’मी’ नाही...
काहीही आगापिछा नसलेले कुठले प्रश्न कधी माझ्या डोक्यात येतील आणि त्यासाठी मी ’प्रिय’चे किती डोकं खाईन याला काहीच सीमा नसते...
’प्रिय’ मला ’छळवाद आहे नुसता’ असं म्हणतो कधीकधी... प्रेमाने...well, i think so..मला exactly माहीत नाही..
कारण या सर्व शंका-कुशंकांचे समाधान करण्यासाठी हक्काचा हातात सापडतो तो ’प्रिय’...
काल अशाच एका प्रश्नाच्या hangoverमध्ये होते तेवढ्यात मोबाईल वर ’करीब’ची टिपीकल शीळ वाजू लागली...
माझ्या मेंदूला खाज सुटलीये हे ’प्रिय’ला कसं कळतं काय माहीत???टेलीपथी असावी बहुतेक...
आपणाहून डोक्याला त्रास करून घ्यायला तो येत असेल तर मी ’ना’ का म्हणावं???
त्याला हॅलो ही बोलायची सवड न देता मी माझा प्रश्न भिरकावते...
"उद्या माझा मृत्यू झाला तर कसं वाटेल तुला???"
पलीकडून पहिल्यांदा सुस्कारा...मग थंड आवाजात विचारणा..
"हे काय नवीन खूळ काढलेस आज तू??"
"सांग ना..उद्या मी पटकन मरूनच गेले तर काय करशील तू? रडशील??? कुढशील??? माझ्या पार्थिवाचे दर्शन तरी घ्यायला येशील ना तू???"
पार्थिव???
असं अगदी काही senti बोलायचे झाले की मी कोणालाच ऐकत नाही...
’माझं पार्थिव’ हा शब्द्प्रयोग ऐकताना मला आताच इतकी गंमत वाटतेय तर त्यावेळी ’प्रिय’ला हसू दडवायला किती कष्ट पडले असतील???
असो..
"सुटशील ना तू???त्रास गेला डोक्याचा करत..???"
निमिषर्धाचाही विलंब न करता पलीकडून उत्तर आले..
"खरंय ते"..
बस्स...मी धाय मोकलून रडायलाच लागले..
"मला माहीतच होतं ते...आता तुझ्या तोंडून ऐकलं इतकंच.."
’प्रिय’ करायला गेला एक आणि झाले भलतेच...
कुठून झक मारली आणि मस्करी केली असे झाले त्याला..
’प्रिय’ रोखठोक आहे...अरे, पण कोणत्या व्यक्तीसमोर किती स्पष्ट बोलावं याचेही काही एटीकेट्स असतात..माझ्यासमोर मलाच "तू गेलीस म्हणजे त्रास जाईल डोक्याचा!" असं म्हणणं म्हणजे हद्द झाली..
आता तू आणि तुझा स्पष्टवक्तेपणा...जा तेल लावत...
आमच्यामध्ये जवळजवळ पाच मिनीटांची प्रदीर्घ शांतता असते...
आता मात्र प्रिय हतबल होतो...
आता तो ठेवणीमधलं अस्त्र उपसतो...प्रिय गायला सुरुवात करतो..
आणि ही मात्रा मला लागू पडते..
पाळण्यातलं तान्हुलं कसं कोणी गाणं गायला लागलं की कसं बोळकं खुलवून हसतं???तशी माझ्या रडण्याची जागा आता अनावर झालेल्या हसण्याने घेतलेली असते..
म्हणजे त्याच्या आवाजात ती ’हम दिल दे चुके सनम’मधल्या अजय सारखी सच्चाई असेलही कदाचित पण त्याने गाण्यास सुरुवात केली की मला हसूच फ़ुटते आणि ते काही केल्या आवरत नाही..
त्या हसण्यामध्ये त्याचा आवाज मरायला ऐकलाय कोणी???
इतक्या दुरुनही मला त्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा झालेला असणार याची पुरेपूर कल्पना होती...
’प्रिय’ला गायला बियला आवडत नाही..
म्हणजे गाताना आपला आवाज ओल्या लाकडावर रंधा मारल्यासारखा येतो याची त्याला पुरेपूर जाणीव आहे म्हणून की काय कोण जाणे???
पण..
स्वत:च्या मनाविरुद्ध केवळ माझ्याकरता केलेली छोटीशीही गोष्ट मला पुरे असते..
"मी कधी कधी खूप मूर्खासारखी बोलते नं?"
रडक्या नाकाने होणारा ’सूं सूं" होणारा आवाज शक्य तितका आवरायचा प्रयत्न करत मी बोलते..
मला फ़ार कमी वेळा असं काही बोलायचं सुचतं..
मी पुन्हा बोलती झालेली बघून पलीकडून मोठ्ठा नि:श्वास सुटतो..
"नाही गं वेडे..असं कोण बोलतं???"
या मधाळ वाक्यानंतर पलीकडून अत्यंत निर्मम आवाजात माझी हजामत सुरु होते..
"पहिली गोष्ट...तू कधी कधी नाही तर बहुतेक वेळा मूर्खासारखंच बोलतेस..
दुसरी गोष्ट..तू मूर्खासारख्या विचारलेल्या प्रश्नावर मी पण काहीतरी मूर्खासारखंच बरळेन असा सोयिस्कर समज करून घेतेस...
तिसरी गोष्ट..तुला विनोद कळत नाहीत आणि ..
चौथी गोष्ट...या तीन गोष्टींच्या एकत्रित घडण्याने जो काही वितंडवाद व्हायचा असतो त्याची मला आता सवय झाली आहे.."
प्रियचं मला असं हसण्यावारी घेणं मला जरा झोंबतंच...
"ते काहीही असो...जर माझ्या जाण्याने...."
माझं वाक्य मध्येच तोडत ’प्रिय’ खेकसतो...
"तुझं ते दळण थांबव आधी...तू काही इतक्यात मरत नाहीस आणि असा बावळटासारखा प्रश्न पुढे कधी डोक्यात उपटला तर हे वाक्य लक्षात ठेवायचं...
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ll
अकस्मात तोही पुढे जात आहे ll
रामदास स्वामी नाव ऐकून आहेस का??"
"तू मला काय मूर्ख समजतोस का रे??"
"मला माहीत आहे तुला माहीतेय ते...पण नुसतं ठाऊक असून काय कामाचं...???त्यांचे हे ११ शब्द ध्यानात ठेवले असते तर इतका hopeless प्रश्न ’तू’ मला विचारलाच नसता...बोल.."मरे एक..""
आणि मग ’रमण नमन कर"च्या चालीवर माझ्याकडून हे वाक्यं वदवून घेण्याचा उपक्रम पार पाडला गेला..
’प्रिय’ची ही स्टाईल मला भारी आवडते...
’प्रिय’ दासबोध, ज्ञानेश्वरीमधले दाखले असे casually देतो...
त्यामुळे मी भारंभार वाक्यं वापरून त्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बहुधा एका वाक्यात किंवा कुठलातरी दाखला देऊनच संपतं..
मी किती तोंडाची वाफ़ दवडते??? ह्याचं percentage काढायला की काय कोण जाणे??जगन्नियंत्याने ’प्रिय’ची योजना करून ठेवली असावी असे मला नेहमी वाटते..
याही वेळेस माझ्या खूप तावातावाने वादावादी होण्याची अपेक्षा असलेल्या प्रश्नाचे तीनतेरा वाजलेले असतात..’प्रिय’च्या एका वाक्याने..
आता आमचे general बोलणे सुरु झालेले असते...
३ मिनीटांनी पुन्हा माझा प्रश्न येऊन ’प्रिय’ला टोचतो..
"ए सांग ना...मी गेल्यावर..."
पुढे काही विचारावे लागतच नाही..
फ़ोन कट झालेला असतो..
 
Designed by Lena