माझं-काफ़्काचं लायब्ररी कम्युनिक.

प्रति,
काफ़्का तामुरा
स.न.वि.वि

तर, कायेकी आज सकाळच्या लोकलने येताना ट्रेनमध्ये सॉलिड राडा राडा राडा झाला. एकदम एकमेकींच्या झिंज्या पकडून सीट्खालच्या वळचणीत लोळण घेणं, तोंडाने अर्वाच्य शिव्यांची लाखोली वगैरे. या सगळ्या कोलाहलात ती साखरांब्यासारखा आवाज असणारी अना‌ऊन्सर मा‌ईकमध्ये तोंड घालून ’अगला स्टेशन अंधेरी, पुढील स्टेशन अंधेरी, नेक्स्ट स्टेशन अंधेरी’ असं तीनतीनदा आग्रहाने बोलत होती, आणि या सगळ्या जगड्व्याळ (बापरे!) धकाधकीमध्ये मी तुझ्या पत्राचं उत्तर काय द्यावं याचा विचार करतेय, या अवस्थेला इंग्लिशमध्ये ’ऑब्लिव्हियस’ नावाचा सुंदर शब्द आहे. मराठीत काय असावा याचा विचार करायला हल्ली मला भीती वाटते. कारण परवाच्याच दिवशी ’टर्न ऑन’ ला मराठी पर्यायी शब्द शोधताना ’उद्दीपित करणे’ हा वाक्प्रचार मेंदूत हात-पाय हापटत आला. आता उद्दीपित हा काय शब्द आहे? उगीचच्या उगीच आपलं कायतरी.
तर,
समोरुन चाललेल्या बोरिवली स्लो मध्ये दारात उभा असलेला एक मुलगा तल्लीन होऊन गाणं ऐकतोय, त्याचं नाव कृणाल, कुशल असंच काहीतरी असावं असं उगीचच वाटलं. आणि या सगळ्यातून तुला काहीतरी नाव असण्याची आत्यंतिक गरज मला वाटली. सगळ्या गोष्टींना नावं असतात, मग तुलाच का असू नये?
मला निनावी पत्रं आवडत नाहीत.(आता पत्र हा काय शब्द आहे? अंतराळात दुर कुठेतरी टांगलेल्या झिरमिळ्या फ़डफ़डल्यासारख्या वाटतात) निनावी तर निनावी- पण तू जे काही मला लिहून पाठवलयंस, ते मला आवडलं. मला आवडत नाही पण आवडलं हा पॅराडॉक्स झाला आणि पॅराडॉक्समुळे द्सरयांना इंप्रेस करता आलं तरी आपलं आपल्यालाच  गंडायला होतं. त्यामुळे तुझं नाव सध्यापुरता काफ़्का तामुरा. काफ़्का तामुराच का? तर मी सध्या मुराकामी वाचत असल्याने नाव द्यायचं म्हटल्यावर उचकी लागल्यासारखं तेच नाव डोक्यात आलं. तशी आणखीही होती ओशिमा, नाकाता, नोबुरो वातानाबे इत्यादी... त्यापेक्षा काफ़्का तामुरा खूप चांगलंय.  तसं मला अर्ध्या रात्रीत झोपेतून उठवून कोणी माझं नाव विचारलं तर ते मला न आठवण्याचीच शक्यता जास्त. मग मला दुसरयाच्या नाव नसण्याबद्दल एव्हढी उठाठेव असण्याचं काय कारण? ह्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

तर, तुझं पत्र-


मी तुला ओळखत नाही-नसावे. तू मात्र मला अंतर्बाह्य ओळखल्याचा दावा करतोयेस. आणि असं असताना तू मला पत्र पाठवतोस, ते ही निनावी- हे माझ्या आकलनापलीकडचं आहे. "अगं बाई! तुझ्या लिखाणाइतकी तूही आवडतेस मला" असं प्रत्यक्ष  भेटून साधंसोप्पं बोललं तर मी लगेच तू झुरळ आहेस हे सिद्ध करीन हा समज खूप हास्यास्पद आहे. आणि तेव्हढाच मला खिन्न्न करणारा. वारयाची झुळूक आल्यागेल्यासारख्या सहज, साध्यासोप्प्या गोष्टींची गंमत कधी कळणार तुला?
असो.

तर,

कुणी आपल्याला आपल्या नकळत पुस्तकात घालून पत्र द्यावं यातलं थ्रिल माझ्यालेखी कधीच संपलं.  या पत्राला उत्तर, त्याला तुझं उत्तर, मग माझं उत्तर असा न संपणारा लूप चालू करायची, आहेपण-नाहीपण चा खेळ  खेळायची तेविशी-चोविशीतली उमेद आता राहिली नाही. पण तू केलेल्या माझ्याबद्दलच्या होमवर्कचं कौतुक जरुर वाटतं. मी मागितलेलं पुस्तक माझ्यापर्यंत आणणारया माणसाला फ़ितवून तुझं पत्र त्यात टाकेपर्यंतच्या सेटींगसाठी तू जे मेहनत घेतली आहेस त्याचा विचका मी करणार नाही. वास्तविक पाहता माझे चार्म्स वापरुन माझ्या पद्धतीने काऊंटरवरच्या पोराला/पोरीला पोत्यात उतरवून तू कोण आहेस हे शोधून काढणं मला कठीण नव्हतं.  दोन मिनीटांचं काम ते. पण म्हटलं तुझ्या आनंदात आणि एक्साइटमेंटमध्ये मिठाचा खडा कशाला उगीच?  आणि तसंही त्या अजिबात खाडाखोड नसलेल्या नसलेल्या, दर २० शब्दामागे २ अशा रेशोने असलेली उदगारचिन्हे, फ़र्राटेदार ’र’चा प्रादुर्भाव असलेले, काळाच्या पडद्याआड गेलेला अल्पविराम वापरलेले ते पत्र अगदी बारकाईने वाचायची इच्छा होतीच. (तू मुळातच असा लिहीतोस की हा सतरावा कच्च्या ड्राफ़्टनंतरचा अठरावा पक्का खर्डा होता?)
हे तुलातरी माहितिये का की तू त्यात एकही प्रश्नचिन्ह वापरलेले नाहीस ते? तुझ्या कल्पनेतही तुला माझ्याबद्दल प्रश्न पडत नाहीत या गोष्टीत मला भयंकर रस वाटला.
आता विचार करते की उत्तर द्यायचं नसतं तर मी या पत्राचं काय केलं असतं? तुझं पत्र वाचलंच नसतं, तसंच चिंध्या चिंध्या करुन फ़ेकून दिलं असतं तर? किंवा सरळ लायब्ररीयनकडेच नेऊन देऊन जबरदस्त इश्श्यू केला असता तर? मला वाटतं तू या सगळ्या शक्यतांचा विचार केला असशीलच, हो नं?

मी कॉंपिटेटीव्ह एक्झाम्सची कॉंपिटेटीव्ह विद्यार्थिनी असल्याने प्रश्नाला प्रश्न पाडून उत्तर मिळवता येते या लॉजिकवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे  माझ्याकडे तुला विचारायच्या प्रश्नांची मोठी जंत्रीच आहे.

दादर स्टेशनला सकाळी ब्रिजवरुन खाली उतरताना एक आंधळा माणुस बासरी वाजवत उभा असतो, मी संध्याकाळी परततानाही असतो, पुन्हा दुसरया दिवशीही असणार आहे, त्याच्या नंतरच्या दिवशीही, मध्येच लवकर सुटून गेले तेव्हाही होता. मला जायचं असतं डाव्या बाजूला पण दादर ब्रिजवरची ती भयाण गर्दी मला नेटाने विरुद्ध दिशेला ढकलत असते- रोज. मी सुद्धा दात-ओठ खाऊन, जीव खाऊन मुसंडी मारत मला जायचंय तिथेच जाण्याचा प्रयत्न करत असते- तेही रोज. सकाळी तयारी करुन आपण दादरला जाणार आहोत म्हणजे पहिले बस पकडून स्टेशन-स्टेशन वरुन ट्रेन-ट्रेन नंतर दहा मिनीटाचा वॉक असाच क्रम असणार आहे, यांत कधीही कसलाही फ़ेरफ़ार होत नाही, होणार नाही. हे असच असणार आहे हे आपल्याही नकळत आपण गृहीत धरण्यातला,  हे असंच चालू असण्यातला, तपशिलातही फ़ेरफ़ार न होता असं-तसंच असण्यातला, ह्या असण्या-नसण्यातलं आपल्या हाती काहीच नसण्यातला होपलेसपणा तुला जाणवतो का? आपण एखाद्या वेळी कुठे असणार आहोत याबद्दल आपली आपल्याला खात्री असणे, त्याबद्दलची खात्री दुसरयाने मागावी आणि ती आपल्याला देता यावी यांत कुठेतरी भयंकर मोठी चूक होतेय असं नाही वाटत तुला? आपण माणसाऐवजी झाड असलो असतो तर कसं असतं हा विचार तुझ्या डोक्यात येतो का?

तू तुझ्या पत्रात अनेक अवतरणं दिली आहेस. त्या पत्रात एकतरी विचार तुझा स्वत:चा ओरिजिनल आहे का? मी जेव्हा विचार करते (म्हणजे नॉर्मली करते त्यापेक्षा जास्त) तेव्हा मला असं आढळतं की माझे खूपसे विचार ट्रेस करत करत पाSSर मागपर्यंत नेले तर ते कुठल्या न कुठल्या ग्रेट लेखकापाशी जाऊन थांबतात. त्यामुळे माझा स्वत:चा असा विचार आहे असं वाटलं तरी तो कोणीतरी आधीच केलेला असण्याची आणि लिहून ठेवलेला असण्याची शक्यताच जास्त वाटते. त्यामुळे प्रत्येक नवं पुस्तक हातात घेतल्यावर काय वाढून ठेवलंय ही घालमेल नेहमीच असते. तू पुस्तकं कशी वाचतोस? तुझी अशी घालमेल होते का?

माझ्या माजी मित्राला ओंकारेश्वरकडे चालणारे अंत्यसंस्कार बघायचा अभद्र छंद होता. तो बाकीच्या वेळी डोक्याने तसा ठीकच असायचा (असं मला वाटायचं) पण तिथं गेलं की त्याला कसलातरी ऑरगॅस्मिक आनंद व्हायचा. त्याकाळात त्याला जाणून घेण्यासाठी त्याच्याबरोबर चोवीस तास रहायच्या हट्टापोटी मी माझंही तिथं असणं ओघानेच. "मी ग्रेसची कविता आहे" असं वाटण्याच्या काळात मी त्या पिंडदान वगैरे रिच्युअल मधली ए टू झेड व्होकॅब आत्मसात केली. फ़ारफ़ार तर ’आवारा भंवरे जो होल्ले होल्ले गाये’ इथपर्यंतची मानसिक कुवत असताना मी कवटी वगैरे फ़ुटल्याचे आवाज ऐकले.
तर विचारायचा मुद्दा असा की तुला कसले कसले (असले-तसले?) छंद आहेत का?

तुझी कवितांची आवड लगेच दिसते. तू मला त्या पत्रात तब्बल सहा कविता लिहून पाठवल्या आहेस. माझा एक मित्र होता, फ़ार सुंदर कविता म्हणायचा. वाचून कविता कळली नाही तरी त्याने म्हटलेल्या कवितेतून अर्थ भराभरा सुटत गेलेला जाणवायचा. माहित असलेली कविताही नव्याने ऐकतोय असा आविर्भाव करत त्याला म्हणायला लावावी आणि आपण ऐकावी यांत वेगळीच मजा होती. पण गेला तो.
तुला कविता म्हणता येतात का? येत असतील तर आपली बरयापैकी मैत्री जमण्याची सॉलिड शक्यता आहे.

तू तुझ्या पत्रात केलेल्या माझ्याबद्दलच्या विधानांबद्दल, तुझ्या माझ्याबद्दलच्या समजुतींबद्दल माझं काही एक म्हणणं नाही, ते समज चुकीचे असतील तरी ते दूर करायच्या भानगडीत मी पडणार नाही, ते तुझं तूच करायचं  आहेस पण मला प्रिय असणारया गोष्टींबद्दल मात्र तुझी फ़ार फ़ार गल्लत झालिये. तू म्हणतो आहेस ते लेखन, संगीत या गोष्टी फ़ार सुपरफ़िशियल आहेत रे! मला या सर्वाहून प्रिय आहे ते ’स्वातंत्र्य’.कुणालाही बांधील नसण्याचं स्वातंत्र्य, कुणालाही कसलीही उत्तरं न देता नवीन नाती तयार करायचं स्वातंत्र्य,  कुणालाही मनाविरुद्ध उत्तरं न देण्याचं स्वातंत्र्य, मला हवी ती गोष्ट माझ्या पद्धतीने करायचं स्वातंत्र्य, सकाळी उठून कोणालाही काही न सांगता कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य हवंय मला. त्यामुळे ह्या पत्रातून मैत्री आणि त्या मैत्रीची परिणिती पुढे कशाततरी होण्याच्या अल्टीमेट पुरुषी फ़ॅंटसीमध्ये गुंतून पडला असशील तर तू आताच बाहेर यावं हे उत्तम. दुसरयाचं स्वातंत्र्य जपणारी मैत्री झेपेल का तुला?

तू तुझ्या पत्रात तुझ्याबद्दल  न लिहीता माझ्याबद्दलच लिहीलेयेस आणि मीसुद्धा माझ्याबद्दलच जास्त बोलतेय. पण त्याला इलाज नाही. कारण तू डावीकडे झुकणारं सरळ रेषेतलं लिहीतोस, शाई ब्लॉट झालिये ती ओळ सोडून दुसरया ओळीत लिहायला सुरुवात करतोस, प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर गिरवतोस-पुढं काय लिहावं या विचारात कदाचित, या छोट्याछोट्या गोष्टींखेरीज तू जाड आहेस, बुटका आहेस, तुझे दात सरळ रेषेत आहेत का, तुला मिशी आहे का, तुझ्या डोक्यावर वेडेवाकडे केस आहेत की साधा भांगच पाडतोस? यातलं काSSहीही मला माहित नाही.  तुझ्या पत्रातून तुझे लुक्स वजा जाता तुझा थोडाफ़ार ’इसेन्स’ आलाय माझ्याकडे पण त्या मुदलावर मी काय काय लिहीणार आणि किती पाणी घालून वाढवणार? नाही का?

माझ्या अतिविचार करण्याच्या सवयीपायी ह्या घटनेमधला कार्यकारणभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करते पण  दोन माणसं समहाऊ एकमेकाला भेटतात, एकत्र बांधली जातात याची स्पष्टीकरणं कुठे असतात? सगळ्या गोष्टीत कारणं शोधण्याचा अट्टाहास करता येणार नाही ही समजूत कधीचीच खूप खोलवरुन पटलेली आहे.  नातं खूप वेळ टिकवून धरलं पक्कं आणि खरं -असं नसतं हे मला एव्हाना कळलंय, तुला कळलं असावं अशी फ़क्त आशाच करु शकते. त्यामुळेच कदाचित या पत्रानंतर आपला काहीही पत्रव्यवहार होणार नाही, कदाचित होईलही, कदाचित एक पत्र पुरे होईल या सर्व शक्यतांना माझ्यालेखी जागा आहे-असू द्यावी. पण मुळात हे पत्र मी पुस्तकाच्या गठ्ठ्यातल्या कुठल्यातरी एका पुस्तकात सरकवून दिलंय, ते पुस्तक पाहण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळे तुला ते मिळालं का? वाचलंस का? वाचलं तर तू लगेच उत्तर लिहायला बसलास का? हेच माहीत नसल्याने मी हे सगळं लिहीलं काय न लिहीलं काय, तू वाचलं काय, न वाचलं काय- काय फ़रक पडतो? फ़रक पडत नसेल तर मी लिहीतेच का? असो, मी तुला फ़ार्फ़ारतर पंधरा प्रश्न विचारणार होते, ते लिमिट संपलं. तेव्हा टाटा.

कळावे,
आमेली पूलाश, हॉली गोलाइटली किंवा क्लेमेंटाईन क्रझिन्स्की यापैकी कुणीही
ह्याच का? याबद्दलही नंतर कधीतरी.

ऑब्लिव्हिएट!


थोरो ’वॉल्डन’ मध्ये म्हणतो- "To be awake is to be alive"
अशक्यप्राय गोष्टींचे नेहमीच सुविचार बनतात.
कंप्युटरसमोर बसून कीबोर्ड बडवू शकणे हे ’जागं’ असण्याचं लक्षण मानलं तर म्या ’जित्ती’ हाय.
जिवंत आहेच तर-जनरली या वेळेला वेगवेगळ्या टेक्स्चरचे ,या कानशिलापासून ते त्या कानशिलापर्यंत सर्दीसारखे गच्च बसलेले  विचार, जे क्रॉनिक खोकल्याची उबळ ये‌ऊन ढास लागावी तसे येत राहतात-लिहून काढूयात.
बेटर आ‌ऊट दॅन इन
--

अकरावीला रुपारेल ला प्रवेश घेतल्यावर आपसूक्च घेतला गेलेला निर्णय "आता इंग्लिश वाचलं पाहिजे."
तेव्हा  ’ हॅरी पॉटर ऍड फ़िलॉसॉफ़र्स स्टोन ’ आणि ’ कंपनी ऑफ़ वुमन ’ एकत्रच वाचलेलं.
रोलिंग आज्जी आणि सिंग आज्जोबा यांनी मला व्यवस्थित ’अपग्रेड’ केलेलं- रोलिंग आज्जींनी व्होकॅब मध्ये आणि खुशवंत आजोनांनी -यू नो..
नो गैरसमज- ते पण भयंकर इन्फ़र्मेटीव्ह पुस्तक आहे-जरुर वाचा.

तर -
एच.पी मधले काही काही चार्म्स मला खूप आवड्तात, मला ते वापरायला मिळाले असते तर काय बहार आली असती असं मला वाटत राहते ते चार्म्स म्हणजे- "सायलेन्शियो!" आणि "’ऑब्लिव्हि‌एट!"
पहिला दुसरयाला गप्प करतो आणि दुसरा दुसरयांच्या आठवणी खोडून टाकतो.

या दुसरयाबद्दल मला नेहमी प्रश्न पडायचा-म्हणजे हा नक्की काय करतो?

नोटपॅड मध्ये एखादा ड्राफ़्ट लिहावा आणि तो ’सिलेक्ट ऑल’ करुन डीलीट ’करुन टाकावा तसा आपल्या डोक्यातला आतापर्यंत साठवलेला डेटा खोडून टाकला जातो की रेट्रोस्पेक्टीव्ह इफ़ेक्ट सारखं काहीतरी?-ह्या पॉ‌ईंटपर्यंत विसरला की भोज्जा! बस्स.

आता माझ्यावर कोणी ऑब्लिव्हि‌एट चार्म वापरला तर नेमकं कुठल्या पॉ‌ईंट पर्यंत काय विसरेन?
गिल्डेरॉय लॉकहार्टसारखं भीषण स्पेल डॅमेज हो‌ऊन सगळंच विसरले आणि माझा मेंदू सोमवती अमावस्येच्या रात्रीसारखा पिच ब्लॅक झालाच तर मग सवयींचं काय?
चालण्याची,बोलण्याची सवय, शब्द जोडून अर्थपूर्ण वाक्यं तयार करण्याची पद्धत; ’प्रोसेस’-यांचंही रेकॉर्डींग मेंदूतच असतं नं?-पर्यायाने आठवणींमध्ये.
त्या सवयी पण नाहीशा होतील की कसं?
पिक्चरमध्ये वगैरे हिरॉ‌ईन् डोक्याची पट्टी चाचपून् "मै कहा हू?" म्हणते तेव्हा ते ’नेमकं’ किती-काय् काय्-कुठपर्यंत् विसरलेली असते?

मी आजही झाडून सगळ्या ब्रेक अप्सच्या पुण्यतिथ्या आठवून आठवून साजरया करते, त्या-त्या मुलाला आवडत नव्हत्या त्या गोष्टी दिवसभर करत बसते, उदा.- सुरणाची भाजी खाते, अर्ध्या बाह्यांचे वेडपट बनियन घालणारया मुलाबरोबर फ़िरायला जाते, रिक्षावाल्याने हूल दिली की कचकावून एक शिवी हाणते, यादी मोठी आहे.
एकाचा चेहरा आता तर मला आठवत सुद्धा नाही पण तो टपरीवर सुद्धा खाण्याच्या आधी बुफ़िनचा सोप पेपर वापरायचा तो ही फ़क्त लेमन फ़्लेवरचा हे लख्ख आठवतं.
इतकी वर्षं झाली तरी त्यांच्या आवडीनिवडी, सवयी माझ्या व्यवस्थित लक्षात आहेत.
हे कसं लक्षात राहतं?-त्याने आता तेव्हा पडायचा तसा फ़रक पडत नसला तरी?
माझा मेंदू बहुधा रोम आहे - ’रिरेमेंबर ऑल’ ला सेट केलेला आणि
पोरांचा बहुधा रॅम असावा-मोस्ट व्होलेटा‌ईल  मेमरी.
असो, तो माझा पॉ‌ईंट नाही.
सांगायचा आणि माझ्या बोलण्याचा मुख्य मुद्दा असा की-

आज आत्ता माझ्यावर ’ऑब्लिव्हि‌एट’ वापरला तर मग-
वरील सगळ्या गोष्टी-टाका‌ऊ इन्क्लूडेड-फ़ारसा प्रयत्न न करताही लक्षात राहण्याची सवय-
आजही कच्चकन ब्रेक दाबला की मी जीभ चावून सॉरी म्हणते-पर्टीक्युलरली कुणालाच नाही-पण म्हणते-
जीन्स, मोजे घालताना पहिले डाव्या पायातून घालते-उगाचच बनवलेली सवय-
गुलाबी रंग मला बिलकुल आवडत नाही-
पुस्तकांची पान दुमडून ठेवणारया लोकांचा भयंकर संताप येतो-
जेवण संपल्यावर मी ताटात गिरवत बसून राहते-
मला कॉफ़ीचा मग दोन्ही हातात घे‌ऊन पिण्याची सवय आहे, चहाचा कप मात्र एकाच हातात-
ट्रेममध्ये झोपेतून अचानक जाग आली तर "पुढलं स्टेशन कुठलं असावं बरं?" चा अंदाज लावायला आवडतो-
मी हे सगळं ऍबसोल्युटली विसरेन?
आजच्या घडीला ’नो’ मोड वर सेट असणारया गोष्टी ’येस’ ला रिसेट होतील?
की नाही?  मुळातूनच अशी ’आहेच’ म्हणून?

विस्मरणात जाणारया जगाला विसरता येणं शक्य आहे?

शिट!
माझ्या मेंदूतल्या हे असले काहीतरी विचार करणारया पेशीवर पुढे मागे संशोधन हो‌ईल का?
असो,
Signing Off!
Peace.

माय फ़ेव्हरीट पुतना ऑंटी.!


दिवसभरातल्या अनेक घटनांमधून एक कथा जन्म घेत असते. आयुष्यातली पुरेशी वर्षं जगून घेतली म्हणजे जगून घेतलेल्या वर्षांमधली लय अखेरीस आपणांस सापडते, माणसाकडे आपण सूक्ष्मदर्शकातून पाहावं तसं पाहायला लागतो ,त्याचे कंगोरे आपणांस उकलू लागतात. वरवर पाहायला जरी सर्व व्यक्ती सुट्यासुट्या असल्या तरी त्यांची-आपली वीण आत कुठेतरी घटट विणली गेलीये, अदृश्याचा हा धागा आपल्याला उकलून घ्यायचाय पण तो कसा? कुठून? कुठवर? ह्याचा विचार आपल्याही नकळत आपल्या अंतर्मनात चालू असतो. या दृश्य-अदृश्यातच कथांची बीजं लपलेली असतात. पण कथानिर्मितीस एव्हढं पूरक हो‌ऊ शकतं? पारंपारीक कथेत किमान दोन तीन प्रसंग असावे लागतात, ते काही अंतराने घडावे लागतात, त्यात कार्यकारणभाव असावा लागतो, पण सतीश तांब्यांच्या कथा हा समज खोटा ठरवतात.

’माझी लाडकी पुतना मावशी’ मधली प्रत्येक कथा कथेच्या पारंपारिक साच्याला छेद देत जाते. यातली कथा घटनाप्रधान रंजन आणि कृत्रिम उद्दीष्टवादापेक्षा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक अंतर्मुख होत जाणारी आहे. ह्या कथा आपल्याला भिडतात कारण त्या शोकात्म असतात किंवा त्यातल्या नाट्यपूर्ण घटनांनी नपेक्शित वळण घेतलं म्हणून नव्हे तर त्यातली पात्रं म्हणजे मी-तुम्ही-आपण सगळे असतो. ती पात्रं कधीकाळी आपणच बोललेली वाक्यं, आपणच सांगीतलेली फ़िलॉसॉफ़ी सांगत असतात. सतीश तांबे आपल्याला व्यक्तिश: ओळखत होते की काय असं वाटावं इतपत ती कथा आपल्यावर बेतल्याचं सतत जाणवत राहतं. ’राज्य राणीचं होतं’ या त्यांच्या पहिल्यावाहिल्या पुस्तकातल्या सर्जनशील लिखाणानंतर या दुसरया पुस्तकाबद्दलच्या अपेक्षा साहजिकच उंचावतात. ’न निखळ कल्पना, न निव्वळ वास्तव तर संकल्पना असते ज्यात तेच ठरु शकतं अभिजात’ या लाडक्या धारणेतून लिहीणारया या लेखकाच्या कथा मुळीसुद्धा भ्रमनिरास करत नाहीत.

काही घट्ना आठवणींच्या ड्रॉवरमध्ये पार आतल्या कप्प्यात लपवुन ठेवलेल्या असतात. कधीकधी वाटू नये त्या गोष्टींबद्दल ओढ वाटते, का वाटते हे  विचारल्यावर समाधानकारक सुसंगत उत्तर देता येत नाही, जगाच्या दृष्टीने दळभद्री त्याबद्दल तीव्र उत्सुकता वा्टते, आयुष्यातल्या रहस्यमय गोष्टींशी त्या त्या गोष्टींचं अनाकलनीय नातं जाणवायला लागतं अशा मनोवस्थेमधल्या ’खुनाच्या हद्दपारीची शिक्षा’, ’देव-दानवे नरा’ या कथा. आपल्या हातुन घडू नये ते घडवण्याची अमर्याद ताकद बाळगणारया आपल्यामधल्या अनिर्बंध ’त्या’ला प्रचंड वचकून असणारा समीर असो किंवा ’अ डे विल कम , डेविल विल विन, ईविल विल विन’ हा मंत्र अथक पुटपुटणारा नंदन असो, काहीशी भयाण, काहीशी विनोदी असंबंद्धता हाच जीवनाचा खरा पाया आहे ह्याची जाणीव या कथा वाचताना पदोपदी होते. समीरबद्दल लिहीताना तांबे एका ठिकाणी लिहीतात,
"चुटपूट लागल्यावर त्याला समांतरपणे असं आठवायचं की , बरयाचदा उंच ठिकाणी गेल्यावर वा चालत्या वाहनातून उडी टाकू की काय, अशी जी धाकधूक वाटते त्यातलाच हा प्रकार आहे"
अर्थ-निरर्थकाची अशी कितीतरी भेंडोळी आपल्याही डोक्यात पडून असतात पण त्यावर आपण कधी नीट विचार करत नाही. आपण फ़क्त उत्तरं मिळवायची धडपड करतो पण मुळात प्रश्न काय याचा सखोल विचार आपल्याकडून होत नाही. फ़क्त उत्तरंच कठिण असतात असं नव्हे तर कधीकधी प्रश्नसुद्धा कठिण असतात, समीर, उदय, नंदनला पडणारया-तांब्यांनी शब्दात नेमक्या मांडलेल्या प्रश्नांसारखे.

षांताराम पवारांची भडक गुलाबी-पिवळ्या  रंगातली जी पुतना मावशी मुखपृष्ठावर विराजमान झालिये त्या वच्छीमावशीची ’माझी लाडकी पुतना मावशी’ ही शीर्षक कथा. ’लैंगिकता’ या विषयाकडे बघायची आपली दृष्टी किती साफ़ आणि सहज आहे यावर ही कथा तसेच ’थेंब थेंब तळं-थेंबे थेंबे गळं’ तसेच ’खुदको खुद..खुदही!’ या कथा वाचक किती समजूतदार पणे घेतोय हे ठरेल. ’लैंगिकता’ ही मानवाची अनघड अशी आदिम प्रेरणा आहे, भल्याभल्यांना चकवणारी.लेखकाने आपल्या कथांमधून लैंगिक उर्मी आणि व्यवहार यांच्या विविध रुपांचा शोध घेतलाय. जिथे प्रत्यक्षपणे हा विषय नाही तिथेही तो अपरिहार्यपणे डोकावतोच आहे. तांब्यांच्या कथेत स्त्री-पुरुष संबंधाविषयीचे विषय व्यापून राहिले आहेत पण, त्यातही पुरुषमनाचा मागोवा त्यांनी समर्थपणे घेतला आहे. हे करताना परंपरागत कुटुंबव्यवस्थेची, स्त्री-पुरुष संबंधांची अंधारी दारं थोडीफ़ार का हो‌ईना किलकिली केली आहेत. बेरकी पुतना मावशीसुद्धा आपल्या व्यावहारीक शहाणपणात कणभर का हो‌ईना सरतेशेवटी भर घालून जातेच.

’सी-सॉ’ ,’देव-दानवे नरा’ , ’झेपेना मज अढी, वैर कुठे’ ह्या श्याम मनोहरांच्या कथांच्या शीर्षकांची आठवण करुन देणारया कथा -
एकाच वेळी जगण्याच्या आधुनिक आणि आर्ष गाभ्याला स्पर्श करणारी, साध्यासुध्या जगण्याची ’गुरुविण कोण’-
आपल्या सभोवतालचं जग स्थायी असतं, आपण बदलत जातो. लहानपणी पाह्यलेली एखादी गोष्ट मोठेपणी आपल्याला वेगळी भासते. ती वस्तू बदललेली असते का? तर नाही. आपण बदललेलो असतो. पण आपल्यात नेमकं बदलतं तरी काय,या बदलण्याचा वेध घेणारी ’होवो होवो सृष्टी दृष्टी‌आड’ -.
कधीकधी  घटना एकदम साधी असते पण तिच्यामध्ये मायक्रोस्कोपिक पदरांचं जंजाळ असतं. त्या बारीक-बारीक तपशिलांमधून कथा आकाराला येते याचे उदाहरण असलेली ’बापूंच्या खुर्चीची गोष्ट’..
कोणतीही कथा असो, संस्कृती, सभ्यता यांचे मुळातले अर्थ तपासून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे.प्रत्येक गोष्टीबद्दलचा उलटसुलट विचार झाला आहे. उल्टाच्या उल्टा विचार म्हणजे सुलटा नसलेला विचारही मग ओघाने येतोच. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रातली दांभिकता, खोटेपणा तसेच कचखा‌ऊपणे भव्यदिव्य किंवा खरं श्रेष्ठ आहे ते नाकारतच आपण कसं जगतो याचं हे जबरदस्त चित्रण या कथांमध्ये झालेलं आहे.

अमर्याद प्रश्नांची तेव्हढीच अमर्याद उत्तरं वाचताना, व्यक्तिगत आणि समूहजाणिवांचा गुंता सोडवताना, त्यावर मनातल्या मनात बोलताना मनावर हलकासा  झाकोळ येतो न येतो तोच येते ’लेखकाचं डोस्कं आणि न्हावी’ही कथा आणि मग तांब्यांची कथा तिची स्थिरवृत्ती सोडून गतिमान होते.प्रकटीकरणाच्या उपरोधात्मक आणि तिरकस शैलीतुन कथा मजेदार उलगडत जाते.कथेचा उगम कसा होत असावा हे शोधू पाहणारया आणि त्यासाठी तिला नियंत्रितपणे ’घडवू’ पाहणारया लेखकाची आणि गणपा न्हाव्याची कथा प्रत्येकाने वाचावी, खुसखुसावं, लेखकाला दाद द्यावी आणि ताजतवानं हो‌ऊन पुढच्या कथेच्या जगात जगायला निघून जावं.

तांब्यांच्या कथेचं वैशिष्ट्य असे की ते समकालीन जगण्याबद्दल लिहीतात, त्या जगण्याचा एक भाग हो‌ऊन लिहीतात. कथेची भाषा या जगण्याच्या रितीचाच एक भाग आहे आणि म्हणूनच ती चोख , रोकडी आहे. ती काही झाकत नाही, सुशोभितही करत नाही. प्रत्येक कथा काहीतरी निराळा विचार सांगते, समाज, परंपरा यावर भाष्य करणाया कथा असल्या तरी त्यांचा स्वर टिपेचा नाही, शांत आहे.
आयुष्यात वाच्यता करता न येणारया बरयाच घटना असतात, खुद्द आपल्या व्यक्तिमत्वाला काळी, करडी किनार असते पण त्या काळोख्या कोपरयांना आपण चुटपुटत्या भावनेनंच, क्वचित गंड मनात घे‌ऊनच बघतो. पण आयुष्यातल्या डार्क प्रॉब्लेम्सना डार्क व्हिजननेच भिडावं असं काही नसतं. तांबे आपल्या कथेतुन सर्वप्रथम तो अंधार काय आहे ते सांगतात आणि मग खुबीने त्या अंधारातून त्यांनी शोधलेला-तात्पुता/कायमचा मा्र्ग सांगतात.

सर्वसाधारण कथा वाचताना तेच तेच अतिपरिचयाचे आयुष्य, त्याचत्याच नाट्यमय घटना, तीच ती तकलादू पात्रं यांतून ती कथा पूर्वी वाचलेली वाटावी इतकी ओळखीची वाटायला लागते, मग त्या कथेतून आपल्याही नकळत आपण मनाने बाहेर पडतो.
पण या सगळ्या ’जगण्या’बद्दलच्या गोष्टी आहेत. जगण्याविषयीचे अ-चाकोरीतले अनुभव सांगणारया या कथा अतिपरिचयाच्या शिळ्या कथांसारख्या ठोकळेबाज नाहीत. या संपतात तिथून चालूच राहणार आहेत कारण जगण्याला कसला आलाय आरंभ- शेवट? कुठल्यातरी बिंदूपासून सुरु व्हाव्या तशा त्या सुरु होतात आणि कुठेतरी संपतात. मुद्दामून केलेली वातावरणनिर्मिती नाही, कोणतीही डूब द्यायचा प्रयत्न नाही, आणि सर्वात महत्वाचं कुठलाही अभिनिवेश नाही. ह्या कथा घटनांमधून नाही तर घटनांमधल्या संकल्पनांमधून, पात्रांमधून उलगडत जातात. आणि म्हणूनच आपण या कथांमध्ये हरवून जातो आणि त्या संपतात तेव्हाच सापडतो.

जगताना बहुसंख्यांना काळाचं जाणीव तर असते पण क्वचितच कोणाला क्षणाचं भान असतं. या कथांमध्ये ते भान जपलेलं पदोपदी जाणवतं. जगण्याच्या रेट्यातही लहानसहान गोष्टींमधला आनंद शोधत-शोधत जाणारया कथा वाचायच्या असतील तर प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे असा हा कथासंग्रह- ’माझी लाडकी पुतना मावशी’.
 
Designed by Lena