द्वार का? द्वारका!

मी नुकताच बडोदा - द्वारका - अहमदाबाद ही शहरं फिरून आले.  मला फक्त द्वारकेला जाण्यात रस होता आणि आपण एखाद्या ठिकाणी जातोच आहोत, तर हे पण पाहून घेऊ, अशा विचाराने जी शहरं 'केली' जातात, तशी ही शहरं. कोणत्याही प्रवासामध्ये आपण अशी स्टेपनी शहरं 'ठेवून' असतो. जसं 'महेश्वर' करताना मी 'मांडू' ठेवून होते, 'कन्याकुमारी' करताना 'तिरुनेलवेली' ठेवून होते. अगदी खरं सांगायचं, तर मुंबई सेंट्रल - द्वारका या अंतरानेच जीव दडपला. मग 'किश्तों'में मजल-दरमजल करत जाऊ, म्हणून बडोदा आणि अहमदाबाद - बाकी कारण असं काही नाही. असं असल्याने "हीच शहरं का?" या प्रश्नालाही अर्थ नाही. बाकी 'किश्तों'वरून आठवलं, "तारा रम् पम्" नावाचा चित्रपट आठवतो का कोणाला? या चित्रपटाने मला कोणतीही गोष्ट ईएमआयवर घ्यायची आयुष्यभराची धास्ती बसली. मी अजूनही एकही गोष्ट ईएमआयवर घेतलेली नाहीये याचं एकमेव कारण म्हणजे हा सिनेमा आहे.

मला ट्रेनने प्रवास करायला आवडतं. तिकिटं खूप आधी बुक करायला लागतात हा एक त्रासदायक आणि डोकेदुखीवाला मुद्दा सोडला, तर मी ट्रेनने प्रवास करायला कायम तयार असते. माझं प्राधान्यच मुळी ट्रेनने प्रवास करण्याला असतं. मी कोणत्याही ट्रेनने दुसऱ्यांदा प्रवास केलेला नाहीये. प्रत्येक वेळी नव्या ट्रेनने गेले. मी भारतभर एकटीने प्रवास केला, अगदी उत्तर भारतातही आणि त्यातला ८०% प्रवास मी ट्रेनने केलेला आहे. दक्षिण भारतात प्रवास करताना घडलेला एकच दुर्दैवी प्रकार वगळला, तर मला ट्रेनचा प्रवास हा खूप सुरक्षित प्रवास वाटतो, भारतात एकट्याने प्रवास करणाऱ्या बाईसाठीही. 

तर, मी बडोद्याहून 'सौराष्ट्र मेल'ने द्वारकेला पोहोचले तेच मुळी रामराया जन्मला अशा टळटळीत दुपारी. ट्रेनमध्ये भेटलेल्या 'जगरात्यासाठी' चाललेल्या दोन गुजराती आज्ज्या आणि एका पंजाबी 'बिजी'च्या माहितीचं संचित घेऊन द्वारकेला पोहोचत होते, तेव्हा आपल्याला काय 'नाही करायचंय' याची यादी पक्की झाली होती. द्वारका स्टेशनला पोहोचण्याच्या आधी एक किमीपासूनच दूरवर (चार किमी अंतरावरील) द्वारकाधीश मंदिराचा तो महाकाय ध्वज दिसायला लागल्याने द्वारकाभेटीचं सूतोवाच हे काय उत्तम पद्धतीनं झालं असं मनातल्या मनात म्हणेपर्यंत 'चलो-चलो-चलो' करत मागच्या अतिउत्साही गर्दीने मला द्वारकेच्या प्लॅटफॉर्मवर उतरवलंही.

कोणत्याही शहरात पाय टाकण्याआधी मला त्याचा कानोसा घ्यायची सवय आहे. पहिल्या डेटला आपण समोरच्या मुलाचा अंदाज घेतो, तशी. शहराची हवा त्वचेला कशी लागते आहे हे पाहावं, तिथली गर्दी पाहावी, गर्दी काय करतेय, काय बोलतेय ते पाहावं. प्रत्येक शहराला एक आवाजही असतो. नीट कान देऊन ऐकलं की ऐकायला येतो. पुण्याला तव्यावर शेकलेल्या फुलक्याचा करकरीत आवाज आहे, निर्वात पोकळीमध्ये "राधे राधे" म्हटल्यावर आवाज शोषला जाऊन कसा "स्स्स्स!" आवाज होईल, तसा आवाज मथुरेला आहे, आणि द्वारकेला - कर्ण्याचा आवाज आहे. हा कर्ण्याचा आवाज रेल्वे स्टेशनपासून सुरू झाला, तो मी तिथून निघेस्तोवर जिथे जावं तिथे साथीला होताच. शेवटी शेवटी तर तो कानात दडा मारल्यासारखा रुतून बसला होता, निघेच ना कानातून. द्वारकेत कुठेही जा, जो तो लाउडस्पीकर लावून कर्ण्याचं बोंडूक तोंडापाशी धरून जीवाच्या आकांताने बोंबलतोय आपला. चालायचंच! ओखाचं बंदर, मासेमारी आणि टाटाचा मिठापूरचा कारखाना सोडला, तर चरितार्थासाठी बहुतेक सर्व द्वारकाकर पर्यटनावर आणि पर्यायाने, पर्यटकांवरच विसंबून आहेत. उपजीविकेसाठी या लोकांना प्रचंड मेहनत करायला लागते. स्पर्धा तर तोबा निकराची आहे. साधं पोहे-जिलबीचं दुकान म्हटलं, तरी एकाच रस्त्यावर १०० पोहे-जिलबीवाले. त्यांना त्यांचा माल खपवायचा आहे, त्यांनी नाही खपवला तर त्यांच्या बाजूचा खपवणार आहे. पोटात जळण हवं, तर घसा खरवडायलाच लागतो. इतकी गूढगंभीर गाज देणारा पश्चिम महासागर बाजूला असूनही हा मानवनिर्मित आवाज कधीकधी त्याच्या वरताण ठरतो. गोमती घाट मागे टाकून तुम्ही उजव्या बाजूने द्वारकेच्या दीपस्तंभाच्या दिशेने चालायला लागलात, आणि द्वारकाधीश मंदिर खूप मागे राहिलं, तरी समुद्री वाऱ्यावर आरूढ होऊन तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोच पोहोचतो, त्यापासून सुटका नाही. एखाद्या गोष्टीपासून सुटका करून घ्यायची असेल, तर त्यावर एकच उपाय - तिला आपलंसं करून घेणं. पण, दुर्दैवाने तितके दिवस माझ्याकडे नव्हते.

गोमती नदी पश्चिम महासागराला येऊन मिळते ती जागा
गोमती घाट, द्वारका

द्वारका म्हणजे मथुरा आणि वृंदावनचा संगम आहे. वृंदावनचा रखरखाट आणि मथुरेचं आदिमपण हे कालवलेल्या वरणभातासारखं  द्वारकेत साचलं आहे. आहे गुजरातमध्ये, पण इथे राजस्थानी लोकांचा भरणा फार. पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याने की काय, कोणास ठाऊक - पण हे लोक प्रचंड पारोसे दिसतात. घरात दुर्लक्षलेल्या सावत्र मुलाच्या चेहऱ्यावर जी कळा असते, ती या पूर्ण शहरावर आहे. द्वारकेतली बाई असो वा पुरुष, दोघांच्याही तोंडाला विश्रांती म्हणून नाही. बायांच्या तोंडाची टकळी अखंड, अहोरात्र सुरू असते. त्या इतकं कशाबद्दल बोलतात? यात आपण पडायचं नाही. गाडीचे रूळ फटाक्-फटाक् बदलावेत, तसे त्यांच्या बोलण्याचे विषयही मिनिटा-मिनिटाला बदलतात. आवाजही तार सप्तकातला, विधात्याने गळ्यात मायक्रोफोन बसवून घडवलेलं असावं, तसा. तुम्ही रांगेत उभे असाल, आणि तुमच्यापुढे एखादी बाई आणि तिची जेठानी उभी असेल, तर डोकेदुखीची निश्चिंतीच समजा. ओखा एक्स्प्रेसने द्वारकेहून अहमदाबादला येताना तर मी या बायांच्या अखंड बडबडीला, त्यांच्या फिदीफिदी मोठ्यांदा हसण्याला इतकी कंटाळले, की मी सीटच बदलली. माझ्या सुदैवाने गाडी रिकामी होती आणि त्यांच्यापासून खूपच लांब एक बरी सीट मिळाली. बायांचं हे असं, तर पुरुष कायम तांबूलभक्षणात मग्न किंवा जर्दा-खैनी-पानमसाला चावत बसलेले. मी गोमती घाटासह द्वारकाधीश मंदिराच्या चार किमी परीघातला परिसर पायी फिरले आहे आणि मी हे खात्रीने सांगू शकते पान-पानमसाला खाऊन पिंक मारलेली नाही किंवा पाण्याची चूळ भरून टाकलेली नाही असा १ मीटरही मोकळा रस्ता मला दिसलेला नाहीये. ही रंगश्रीमंत आणि कुवासिक रंगरंगोटी चुकवून चालताना पाय लचकला नाही, तरच नवल. मग हॉटेलमध्ये येऊन गरम पाण्यात पाय बुडवून बसायचं - हा नेम तीनही दिवसांमध्ये एक दिवसही चुकला नाही. 

कोणत्याही नव्या शहरात गेलं की माझी सर्वात जास्त पंचाईत होते, ती म्हणजे चहाची. हॉटेलमध्ये 'काँप्लिमेंटरी' च्या नावाखाली जी चहा-कॉफीची पाकिटं देतात ती पाहिली, 'तोंडाला पानं पुसणं' म्हणजे नक्की काय हे बरोब्बर कळतं. हॉटेलमध्ये चेक-इन केलं, गरम पाणी-टीव्ही-एसी या त्रयींची व्यवस्था लागली, की मी चहाच्या स्काउटिंगसाठी बाहेर पडते. 'स्काउटिंग' हा प्रकार ठाऊक असेलच. रँपवर मार्जारचाल करून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सौंदर्यवतींना अशाच कोणीतरी एजंटने हॉटेलमध्ये, थेटराच्या लाइनीमध्ये हेरून स्काउट केल्याच्या रसभरीत कहाण्या कमी नाहीत. मी तशीच चहावाल्यांना स्काउट करते. हॉटेलपासून २ किमी हद्दीतला परिसर ही मी आखून घेतलेली मर्यादा आहे, त्यापलीकडे हमसे ना हो पाई. असे दोन-तीन चहावाले हेरले, की मग एकेकाकडे जाऊन चहा पिऊन बघायचा. आवडला, तर ठीक - दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचं. नाही आवडला, तरी ठीक - दुसऱ्याकडे जायचं. द्वारकेत मला मुरुकाका असाच भेटला. मुरु नाव लावणारा आणि हँडलबार मिशा ठेवणारा हा अक्राळविक्राळ मनुष्य "काय हो छान चहा बनवता तुम्ही!" असं म्हटल्यावर चक्क लाजला. मिशीतल्या मिशीत हसणं हा प्रकार मी ऐकला आणि पाहिला आहे, पण मिशीत लाजणं काय याची प्रचिती मला द्वारकेत आली. मी स्वत: बनवलेला आल्याचा चहा सोडून इतका पर्फेक्ट आल्याचा चहा फार क्वचित प्यायले आहे.

मिशाळ मुरुकाका चहावाला

इथे दर १०० मीटरवर गोडमिट्ट चहा विकणाऱ्या रजवाडी चहावाल्यांची दुकानं आहेत. स्टीलच्या भांड्यात सतत उकळत असलेला चहा आणि आपल्याकडचा पाणीपुरीवाला रगड्याचा डोंगर रचतो, तसा पोह्याचा डोंगर - हे परिचित दृश्य. अर्ध्या तासाने त्याच दुकानासमोरून गेलं, की तो डोंगर अर्धा खणून काढलेला असायचा. पण, हे पोहे तरी बरे म्हणायचे. पूर्वेकडे जावं, तसे हे पोहे अधिकाधिक फडफडीत आणि कोरडे होत जातात, त्यांच्यावरची निरुपयोगी पखरण वाढत जाते, आणि पूर्वेकडे सरकत सरकत सरतेशेवटी आपण इंदूरमध्ये पोहोचतो, तेव्हा या कोरड्या पोह्यांना ओल्या खोबऱ्यासारख्या ओल्या वस्तूचा टेकू देण्याच्या ऐवजी त्यावर शेव टाकून छाताडावर बसून ढास लागेल असा पदार्थ तुमच्या पुढ्यात येतो. 'सेव टमाटर की सब्जी' नावाची एक फसवणूक पण इथं द्वारकेत पाहिली. खरं पाहायला गेलं, तर हा अस्सल काठियावाडी पदार्थ. पण, ती सेव द्वारकेत इतकी 'गलते', की त्यांनी ती मिक्सरमध्ये फिरवून वाटणासारखी वाढली असती, तरी काही फरक जाणवला नसता. ती 'सब्जी' नाही, ते 'शेवेचं फदफदं' आहे. वास्तविक पाहता, गुजरातेत जायचा बेत आखायला लागले, तेव्हा खायची मारामार होणार नाही असं मी मानून चालले होते. शाकाहारी तर शाकाहारी, तसाही मला कोंबड्या किंवा बकरे खाण्याचा फार उत्साह नाही; पण, प्रत्यक्षात पुढ्यात आले ते कोरडे ढोकळे, अळणी खांडवी, मधुमेही गुजराती कढी, पंडू खिचडी, प्रचंड पित्तकारी फुलवडी आणि हांडवो, आपल्याकडे चकली फसली की त्याचं कडबोळं बनतं, तसा उरलेला, वेडावाकडा खमण कुस्करून केलेला 'सेव खमणी' नावाचा पदार्थ आणि या सगळ्या पदार्थांमधले सगळे दोष दूर करू शकणारी (म्हणजे ती ते दूर करू शकते असं फक्त त्यांनाच वाटतं) एक मल्टीपर्पझ चटणी हे खाऊन दोनच दिवसांमध्ये पित्त नाही झालं सुदैवाने, पण वात मात्र नक्की आला.

या झाल्या न आवडलेल्या गोष्टी. आणि आणखी एक म्हणजे, द्वारकेत ऊन फार. पण, त्या रणरणत्या उन्हात रसरसून फुललेली लाल-पिवळी-गुलाबी-केशरी बोगनवेल द्वारकेच्या कोपऱ्याकोपऱ्यात दिसते. हे गुजराथी, राजस्थानी लोकं त्या बोगनवेलीचे भरपूर लाड करतात. आईने छान तेलफणी करून घट्ट, नीटस वेणी घालून द्यावी तशी तीन-चार वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगांच्या बोगनवेलींंची खोडं पीळे मारून एकत्र करतात हे लोक. खाली ही व्यवस्था लागली की वर बोगनवेलीचा जो बहुरंगी फुलोरा डंवरतो, तो पाहून त्या रखरखाटातही डोळे निवतात, मन शांतवतं. बेट द्वारकेत तर मी असं घर पाहिलं जिथे पिंपळावर पार शेंड्यापर्यंत बोगनवेल चढवली होती. झाड पिंपळाचं आहे की बोगनवेलीचं, हे कळू नये - इतकी ती दोन्ही झाडं एकमेकांमध्ये एकरूप होऊन गेली होती. राधे-क्रिष्ण, राधे-क्रिष्ण, राधे-राधे-क्रिष्ण-क्रिष्ण या जपनामासारखी. आधी कोण, नंतर कोण - हे कळूच नये. फक्त द्वारकेतच नाही, तर बडोद्यात, इतकंच काय तर अहमदाबादेतही ही तिपेडी, चौपेडी (बडोद्यात सयाजी बागेत पाचपेडी पण पाहिली आहे) बोगनवेल प्रत्येक हमरस्त्यावर दिसते.

याशिवाय मनात रुतून बसलेल्या, उपसून न काढता येणाऱ्या कित्येक गोष्टी आहेत. द्वारकेच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरताना आपण इथले नाही हे जाणवून कोणीतरी कुतूहलाने टाकलेली "जय श्री क्रिष्ण बेहन" ची आरोळी आणि त्याला आपल्याकडूनही तितक्याच उत्स्फूर्तपणे गेलेलं "जय श्री क्रिष्ण दादा"; हातभर दाढी वाढलेल्या वेड्या बाबाने अचानक समोर येऊन "क्यो पार्वती! इतनी देर क्यूं लगाई" असं विचारणं आणि त्यानंतर वाटलेलं कुतूहलमिश्रित ओशाळेपण; बेट द्वारकेत तीन-चार सेकंदांसाठी तुम्ही आणि समोरचा कृष्ण हे सोडून बाकी सभोवतालचं सगळं निमून कृष्णाशी करता आलेलं हितगूज, त्यानंतर सभोवताचा गोंधळ द्विगुणित होऊन कानावर आदळून भंग पावलेली समाधी आणि वास्तवाचं भान येणं; समस्त द्वारकाजनाचं तांबूलभक्षण करून दिवसभर, आयुष्यभर कसल्या ना कसल्या तरी तारेत राहणं; राजस्थानातून द्वारकेत येऊन, अर्धपोटी राहून रिक्षा चालवून संसार करण्याची स्वप्नं पाहणारे तरूण; जगण्याचा शोष विसरून दिवसातून सहा वेळा बदलणाऱ्या ध्वजारोहणाला तितक्याच, नव्हे कणभर जास्तच उत्साहाने जयजयकार करणारी गर्दी; वर्षानुवर्षं, न चुकता, रोज पहाटे रांग लावून 'क्रिष्ण महाराजांचं' दर्शन घेणारे द्वारकाकर; द्वारकाधीश मंदिरात १ किमीपर्यंत ऐकू जाईल अशी रात्रीची आरती सुरू असताना गायत्री टेंपल रोडवरच्या अवघ्या 8x8 च्या खोलीत माना खाली घालून अभ्यास करणारी, कदाचित या शहरातून बाहेर पडायची स्वप्नं पाहणारी पोरं; देवळात 'रेग्युलर्स' सोडून बाकी कोणालाही न मिळणारा, पण मुरुकाकाने सर्वांना प्रेमाने वाटलेला तुलसी-लोण्याचा प्रसाद; कृष्णच आपला तारणहार आहे या गाढ विश्वासाने पिढ्यानुपिढ्या, दशकानुदशकं चाललेल्या भक्तीचं आवर्तन, पण पर्यटकांना लुबाडणारे हेच बनेल लोक - यांनी मला विचारात टाकलं. काय खरं - काय खोटं? काय चूक - काय बरोबर? तुम्हाला विचार करायला लावणारी गोष्ट तुम्हाला नावडू शकतच नाही. त्यामुळेच, नावडलेल्या किती साऱ्या गोष्टी असूनही द्वारका मला आवडली नाही, हे तरी मी कसं म्हणावं?

आपण आपल्याला आलेल्या कडूगोड अनुभवांमुळे काही दारं कायमची बंद करून घेतो आणि त्या बंद दारांची चावी कुठेतरी फेकून देतो. आपले समज आणखी कट्टर, बऱ्या-वाईटाच्या संकल्पना आणखी ताठर होत जातात. माझ्या गाठीशी मथुरा-वृंदावनचा आणि बांकेबिहारीचा अनुभव आहे, त्यामुळे आता मला या लोकांचा राग येत नाही. आहे हे असं आहे, त्यावर तुम्ही कितीही डोकेफोड केलीत तरी ते बदलणार नाही, हे कटू सत्य मी हलाहलासारखं पचवलं आहे एकदाचं. आता मला त्यांच्याबद्दल कुतूहल, आणि वाटलीच तर करुणा जास्त वाटते. त्यामुळेच, द्वारकेत असताना मला ही घट्ट ओढून घेतलेली दारं थोडी किलकिली करता आली, माझ्या डोळ्यांवरचा आधुनिकतेचा, बुद्धिनिष्ठतेचा चष्मा थोडा वेळ काढून ठेवता आला आणि आदिम प्रेरणा घेऊन रोजचं आयुष्य जगणारे हे सेपियन्स थोडेफार का होईना, कळून घेता आले. 

मैथिलीशरण गुप्त यांची एक कविता आहे

तेरे घर के द्वार बहुत हैं,

किसमें हो कर आऊं मैं?

सब द्वारों पर भीड़ मची है,

कैसे भीतर आऊं मैं?

नव्या अनुभवांना जागा मोकळी करून द्यायची असेल, तर जुन्या अनुभवांना थोडं बाजूला सारावं. अगदीच तिलांजली द्यावी असं नाही, पण नव्या शक्यतांना वाव असावा. आणि पुढच्या वेळी, मनाची दारं सताड उघडी करावीत, स्वच्छतेचं इंद्रिय आवरावं, आवश्यक असेल तेव्हा बहिरेपण आणण्याची कला आत्मसात करावी, आपले पूर्वग्रह, पूर्वसमज मुंबईच्या घरी बासनात गुंडाळून ठेवावेत आणि पुन्हा द्वारकेला यावं.

प्लॅन तर तोच आहे. पाहू या, कसं होतंय ते.

तोवर, श्रीकृष्णार्पणमस्तु!

कडू किरायती बुकोव्हस्की

चार्ल्स बुकोव्हस्की.. नाम तो सुना होगा. 

नसेल ऐकलं.. शक्यता कमी आहे.

सगळ्यांनाच माहीत असायला चार्ल्स बुकोव्हस्की म्हणजे शेक्सपियर नाही. ज्याचं लिखाण सगळ्यांनाच झेपत नाही, पचत नाही, 'शून्यवादी' वाटतं अशा काही निवडक लेखकांपैकी तो एक आहे..म्हणजे, होता. तो कोणत्याही अभ्यासक्रमात 'लावलेला' नाही किंवा कोणत्याही साहित्य चळवळीचा झेंडा घेऊन त्याने तो मिरवला नाही. लेखनाची जातकुळी सांगायची झालीच, तर ती काहीशी काफ्काच्या जवळपास जाणारी होती, पण तुलनेत जास्त रोखठोक आणि प्रामाणिक होती. असं असलं, तरी तो आत्मश्लाघ्य नाही, 'आत्मताडन' हा त्याचा स्वभाव नाही. आपण काय आहोत याची पूरेपूर जाणीव असलेला लेखक म्हणजे बुकोव्हस्की.

बुकोव्हस्कीने वयाच्या २४व्या वर्षापासूनच लिखाणाला सुरुवात केली. त्याने स्वत:चं लेखन प्रकाशित करण्याचा खूप प्रयत्न केला, खूप साऱ्या प्रकाशनगृहांना त्याने त्याचं लिखाण पाठवलं, पण काही यश मिळालं नाही. त्यामुळे कंटाळून त्याने १० वर्षं लिहायचंच सोडलं. त्या १० वर्षांमध्ये तो अक्षरश: भणंगासारखा जगला. पण, लिखाणावाचून आपण जगत नाही, आपलं काही खरं नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने परत लिहायला सुरुवात केली. त्याने लेखन प्रकाशित करण्याचा अट्टाहास सोडला, पण लेखन सोडलं नाही. असंच लिखाण करता करता त्याला सूर सापडला, लिखाणाला ओघ आला आणि वयाच्या ४९व्या वर्षी त्याला लेखक बनण्याची संधी मिळाली.

कारकिर्द म्हणून त्याच्या लिखाणाची सुरुवात झाली ती अशी. वयाच्या ७५ व्या वर्षी त्याला मरण आलं तोपर्यंत २५ वर्षं त्यानं झपाटल्यासारखं लिहिलं. त्या २५ वर्षांमध्ये त्याने ६ कादंबऱ्या, ३५ कवितासंग्रह, १५ लघुकथासंग्रह आणि आणखीनही बरंच काही, असं दमदार काम केलं.

पोस्टऑफिस - ११ वर्षं पोस्टऑफिसमध्ये काम करणाऱ्या आणि एक छदामही पदराशी न ठेवता त्या नोकरीला रामराम ठोकणाऱ्या माणसाची कथा

फॅक्टोटम- एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडणाऱ्या भुंग्यासारखी नोकरी बदलणाऱ्या माणसाची कथा

विमेन - बाईमागून बाई बदलत जाणाऱ्या माणसाची कथा

हॅम ऑन राय - लहानपणी छळ झालेल्या आणि त्यातून उदयाला आलेल्या अँग्री यंग मॅनची कथा

हॉलिवूड - हॉलिवूडसाठी लिहिताना आलेल्या सुरस अनुभवांचा लेखाजोखा

पल्प - वाईट कसं लिहावं हे सांगणारं गाइड

या सर्व कथांचा नायक 'चिनास्की' म्हणजे म्हणजे स्वत: बुकोव्हस्कीच आहे, त्यामुळे या कादंबऱ्या तितक्याशा काल्पनिक नाहीत, किंबहुना आत्मचरित्रपर आहेत असंही म्हणायला हरकत नसावी. त्याची भाषा उघडीवाघडी होती, त्याला कोणताही मुलामा दिलेला नव्हता. तो नेमकं लिहायचा, पाल्हाळिक निवेदनाला त्याच्या लिखाणात जागा नाही. कोण काय म्हणेल याबद्दल त्याला पर्वा कधीच नव्हती, त्यामुळे त्याने 'आहे हे असे आहे' या सूत्राला धरूनच लिखाण केलं. इतरांना आवडेल असं नाही, इतरांनी त्याला स्वीकारावं म्हणून नाही, पण त्याला जसं योग्य वाटलं तसं. 

थोडं विषयांतर होतंय, पण माल्कम ग्लॅडवेल म्हणतो त्याप्रमाणे कोणतंही कौशल्य हा सरावाचा भाग असतो आणि त्याबद्दल त्याने १०००० तासांचं प्रमेय मांडलं आहे. १०००० तास योग्य पद्धतीने सराव केल्यास कोणतंही कौशल्य आत्मसात करता येतं असा त्याचा दावा आहे. ग्लॅडवेलच्या कित्येक वर्षx आधी बुकोव्हस्कीने त्याचं प्रमेय सप्रमाण सिद्ध केलं होतं. 

म्हणूनच 'डोण्ट ट्राय' हा बुकोव्हस्कीचा आवडता फंडा आहे. बुकोव्हस्कीला जिथे पुरलंय तिथल्या हेडस्टोनवरही हेच वाक्य आहे. तुम्ही तुमचं काम करत राहिलात, तर जे तुम्हाला मिळायचं आहे ते तुम्हाला मिळेलच. जे तुमचं नाही ते तुम्ही कितीही डोकेफोड केलीत तरी तुम्हाला मिळणार नाही. ध्येयाधिष्ठित कर्मवादाचं याहून चांगलं उदाहरण मिळणं शक्य नाही.

बुकोव्हस्की कायम तिऱ्हाइतासारखा जगला. त्याला कोणी आपल्या गटात सामील करून घेतलं नाही...त्याच्या मुरुमांच्या व्रणांनी भरलेल्या चेहऱ्यामुळे असेल म्हणून, किंवा चारचौघात कसं वागावं-बोलावं याबद्दलच्या सर्व प्रमाण कल्पनांना तो हेतुपुरस्सर फाट्यावर मारत असेल म्हणून, किंवा त्याच्या एकंदरच निवडुंगासारख्या व्यक्तिमत्त्वामुळे असेल. आणि त्यानेही कधी स्वत:हून या कळपांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला नाही. कंपूंचा, घोळक्यांचा, कळपांचा त्याने नेहमी तिरस्कारच केला.

घरी बापाने आणि शाळेत इतर मुलांनी केलेला छळ, आपण कोणालाच आवडत नाही याची पदोपदी जाणीव करून दिलेल्या मुलाने करावं तरी काय? स्वत:च्या दुखऱ्या अस्तित्वावर त्याने दारूचा उपाय शोधला, जो त्याला जन्मभर पुरला; पण सुदैवाने त्याला पुस्तकांचीही साथ मिळाली. त्या शापावरचा तो उपशम, उतारा होता. तो म्हणतो, पुस्तकं नसती, तर त्याने एकतर खून तरी पाडले असते, किंवा आत्महत्या तरी केली असती. एफबीआयचा त्याच्यावर कायम दात होता. आईकडून जर्मन वंशाचा असल्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एफबीआयची संशयाची सुई त्याच्यावर कायम राहिली होती आणि तो 'हिरवट म्हाताऱ्याची पत्रे' या नावाने वर्तमानपत्रातला एक प्रक्षोभक स्तंभ चालवत असल्याचे कारणही त्यांना बराच काळ पुरलं.

फ्रान्झ काफ्काप्रमाणे बुकोव्हस्कीनेही प्रस्थापितांचा तिरस्कार केला. बुकोव्हस्कीचा मुळं रोवण्यावर, जम बसवण्यावर, एका ठिकाणी टिकून राहण्यावर विश्वासच नव्हता वाटतं, कारण तो आयुष्यभर एखाद्या फुलपाखरासारखा एका नोकरीवरून दुसऱ्या नोकरीवर भिरभिरत राहिला, पदराशी एक कवडीही न बाळगता.. तो नेहमी म्हणायचा, "कोण म्हणतं गुलामगिरी संपली? ती फक्त वेगळ्या रंगात, वेगळ्या ब्रँडमध्ये सुरू झाली." लिखाण मात्र त्याने कधीच सोडलं नाही, कायम सुरू ठेवलं, त्याच्या लिखाणाला प्रस्थापित साहित्य संस्थांची कायम नकारघंटा मिळूनही. त्याच्यासाठी लिहिणं म्हणजेच जगणं होतं. कोणी टिकोजीरावाने 'नाही' म्हणून निकाली काढलं तरी ते थांबणार थोडीच? तो म्हणायचा, "तुम्हाला लिहिण्याचा कैफ आहे म्हणून लिहा, प्रसिद्ध होण्यासाठी लिहू नका. लिखाणासाठी पैसे मिळणे आणि एखाद्या सुंदर बाईसोबत झोपल्यानंतर सकाळी तिने आपल्या उशाशी पैसे ठेवून जाणे - यात काहीएक फरक नाही. तुम्ही जे आहात तसं लिखाणात उतरू द्या. लोकांना तुम्ही कसे आहात असं वाटावं असं तुम्हाला वाटतं - तशा पद्धतीने लिहू नका. लिहिताना तुम्हाला बोअर झालं, तर वाचणाऱ्यालाही ते बोअरच होणार आहे." 

त्याला त्याच्या नाजूक जागा नेमक्या माहीत होत्या. दारू, बाया आणि एकूणच मनुष्यजातीबद्दल वाटत असलेला अविश्वास. स्त्रियांसोबतचं त्याचं नातं म्हणजे तुझं-माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमे ना. त्याचं स्त्रियांबद्दलचं एक निरीक्षण मोठं रोचक आहे. तो म्हणतो, "मला बाई आवडते. तिच्या कपड्यातली रंगसंगती, तिचा डौल, तिच्या चेहऱ्यावरचं 'मी तुला चुटकीसरशी चिरडून टाकेन' छापाचं मूर्तिमंत क्रौर्य, हे मला तुफान आवडतं. आपण बीयर पित फुकाचे फोकलत फूटबॉल पाहात असतो, तेव्हा ती तिच्या ह्रदयाच्या सिंहासनावर तुमची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विचार तरी करत असते, किंवा तुम्हाला मारून कुठे गाडायचं याचे बेत आखत असते. मला बाई आवडते; पण, बाईला मी आवडलो की तिला मी माझ्या आत्म्यासकट हवा असतो. आता तो मी तिला कसा देऊ? जितका उरला आहे, तो मला माझ्यापुरता ठेवायचा आहे."  

ज्या पुरुषाला बाईची गरज नाही, तो पुरुष अविनाशी, अभेद्य आहे - हा त्याचा लाडका फंडा होता. त्याच्या मते गे माणसं जास्त क्रीएटिव्ह असतात, कारण विषमलिंगी बाया-पुरुषांमध्ये चालणाऱ्या पॉलिटिक्समध्ये जसा त्यांचा वेळ वाया जातो, तसा या गे लोकांचा जात नाही.

अनुभवाने माणूस कितीही कडवट बनत गेला, तरी त्याच्या आत-आत एक दुखरी-हळवी बाजू असतेच, बुकोव्हस्कीचीही होती. 'मेन आर वायर्ड दॅट वे' असं म्हणणारा हैराण जाळपोळ करत हिंडणारा सेल्फ-डीस्ट्रक्टिव्ह  माचो नाही तो. तो ते हळवेपण कोणत्याही इतर गोष्टीसारखं निखालस कबूल करतो, इतकंच नाही, तर ते जाहीररीत्या सांगतोही.

त्याची ब्लूबर्ड (नीलपक्षी) नावाची कविता आहे


माझ्या काळजात एक नीलपक्षी आहे

ज्याने निकराने बाहेर यायचा चंग बांधलाय

पण मीही काही कमी नाही

मी म्हणतो, "गुमान आत रहा. तुला कोणी पाहिलेलं खपणार नाही मला."


माझ्या काळजात एक नीलपक्षी आहे

ज्याने निकराने बाहेर यायचा चंगच बांधलाय

पण मी त्याच्यावर व्हिस्कीचा ग्लास ओततो, घुसमटवून टाकतो त्याला सिगरेटच्या धुरात

मी ज्यांच्यासोबत झोपतो त्या बाया,  बारमध्ये दारू ओतणारे बाप्ये

मी ज्या दुकानातून सामान भरतो तो वाणी

कोण्णाकोणालाही माहीत नाहीये, की तो तिथे आहे


माझ्या काळजात एक नीलपक्षी आहे

ज्याने निकराने बाहेर यायचा चंगच बांधलाय

पण मीही काही कमी नाही

मी म्हणतो, "गुमान आताच रहा. माझी वाट लावायची आहे का तुला?

माझं आतापर्यंतचं सगळं काम विस्कटून जाईल

आणि युरोपमधल्या पुस्तकांच्या खपाचं काय होईल?"


माझ्या काळजात एक नीलपक्षी आहे

ज्याने निकराने बाहेर यायचा चंगच बांधलाय

पण मी त्याच्याहून जास्त शहाणा आहे. मी त्याला फक्त रात्री बाहेर येऊ देतो

सगळे झोपलेले असताना

मी म्हणतो, तू आहेस तिथे हे माहीत आहे मला

त्यामुळे अनुल्लेखाचं दु:ख करत बसू नकोस

मग मी त्याला जिथे होता तिथे परत सोडतो

पण तो तिथे आत हलकेच गुणगुणतो आहे,

मी त्याला मरू नाही दिलेलं अद्याप

..

आणि मी व तो असेच झोपतो

एकमेकांमध्ये अलिखित करार असल्यासारखं

.

.

हे असं निळं पाखरू कोणत्याही चांगल्या माणसाला अश्रू ढाळायला लावेल

पण मी अश्रू ढाळत नाही

तुम्ही ढाळता?

--



वरची ती हळवी कविता लिहिणारा हाच तो बुकोव्हस्की.

आणि हाच हळवा माणूस माणसांबद्दल असं काही भेदक विधान करून जातो, की ते डोळ्यांना चरे पाडत, मेंदूला भाजत चिरत मेंदूत शहाणपणाची नस जिथे असते त्या नसीला जाऊन चरचरून भिडतं. डोस्टोव्हस्कीचीच री ओढत तो म्हणतो,

'य' गोष्ट करा असे सांगणाऱ्यांपासून सावधान!

आपल्याला सगळं माहीतेय असा दावा करणाऱ्यांपासून सावधान!

त्यांना जे माहीत नाहीये त्याची सर्वात जास्त भीती वाटतेय.


लगेच कौतुकाची फेर झाडणाऱ्यांपासून सावधान

कारण त्यांनाही परतून कौतुकाचा वर्षाव हवा असतो.

गर्दीत आसरा शोधणाऱ्यांपासून सावधान

कारण एकटं असताना त्यांच्याकडे कुठलीच वळचण नसते

--

जी माणसं स्वत:बद्दल स्पष्टीकरणं द्यायला जात नाहीत, त्यांच्याबद्दल लोक गृहितकं बनवून घेतात. ही गृहितकं चुकीची आहेत की बरोबर याची शहानिशा करण्याच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीबद्दलची इतरांची व्हर्जन्स काही काळाने खरीच वाटायला लागतात. त्या गृहितकांच्या वदंता बनतात, वदंतांच्या अफवा बनतात आणि मग त्या अफवांमधून मूर्त होणारी व्यक्ती व मूळ व्यक्ती यांमध्ये बिलकुल साधर्म्य राहात नाही. बुकोव्हस्कीबद्दल काय बोललं जायचं याची त्याला पर्वा नव्हती, कारण आपण काय आहोत याचा जाहीरनामा, लेखाजोखा त्याने त्याच्या लिखाणातून दिला होता. तो बाईबाज होता हे त्याने जाहीरपणे सांगीतलेलं आहे, किंबहुना त्यावर त्याने 'विमेन' नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे.

म्हणूनच,

'ग' ची बाधा झाली की त्यांना बुकोव्हस्कीची मात्रा उगाळून द्यावी,  मूढ विचारांचे जंत झाले की त्यांना कडू किरायती बुकोव्हस्की पाजावा. 

नेणतेपणी शहाणपण देणारा असा हा बुकोव्हस्की.

उत्तररात्र-८

निरु एक आठवडयापासून पोक काढूनच चालत होती. प्रचंड मोठ्या पंच मशिनने भोकच पडलं होतं जणू काही तिच्यामध्ये. एका आठवड्यापासून खोलीभर झालेल्या उखीरवाखीर पसाऱ्यात बसून निरू विचार करत होती, की आपल्याला आता होतंय ते नक्की दु:खच आहे की अति ताणामुळे आलेला सुन्नपणा? सगळ्या गोष्टींचे अर्थ एकदा मुळापासून तपासून पाहिले पाहिजेत. आपल्यात नुकतंच कोणीतरी मोठं भोक पाडून गेलंय असं का वाटतंय मग? जे काही घडलं त्यानंतर आपल्याला कसं वाटणं अपेक्षित आहे? झिनी म्हणत होती, "ओह निरु, इट मस्ट बी सो पेनफ़ुल फॉर यू"

पेन? वेदना? खरंच की. आपल्याला वेदना होत असणारच पण कुठे?
कुठे?
तिने गाल, घसा, छाती चाचपून बघितली.

घशात खूप काहीतरी दाटून येतं ते थ्रोट इन्फेक्शन नसावं, वेड्या पेशंट्सना शॉक द्यायला लावतात तिथे सगळं दुखरं दुखरं झालंय, विचार दाटसर वाटणासारखे घर्र घर्र फ़िरतायेत. त्याला वेदना म्हणतात? ’विद’ म्हणजे जाणून घेणे या धातूपासून वेदना बनलाय, थॅंक्स टू यू सातर्डेकर मास्तर! २० वर्षांनीही मला हे आठवतंय, नो डाऊट तुम्ही ग्रेट आहात. गेल्या शनिवारी रात्री दहा वाजून सात मिनिटांनी सत्तू दार आपटून गेला तेव्हापासून ते आजच्या बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत काय जाणून घेतलं आपण? तो "जा गं! तुझ्याशिवाय काही फरक पडत नाही मला" म्हणाला तेव्हा आपल्याला आणि आपण "बरं झालं पिडा गेली!" असं तळतळून बोललो तेव्हा त्याला, काय कळायचं ते कळलेलं असणारच.
तोच तो अश्मयुगीन झगडा.
मी कायम त्याचा विचार केला आणि तो मुळीसुद्धा माझा विचार करत नाही. आपण ज्या माणसांचा कायम विचार करतो ती माणसं आपला इन फॅक्ट किती कमी विचार करतात. असं नेहमीच का होतं? फक्त माझ्याच बाबतीत होतं की खूप जणांच्या?
तिला यावर कोणाशी तरी बोलायला हवंय. कोणाशी पण?
हं हं हं...
सत्तू बसायचा त्या खुर्चीला मध्यभागी ठेऊन हलकेच गुणगुणत खोलीत फिरायला लागली.

मौ मौ अंग तुझं
उन्हात सारखं जाऊ नये
ट्रेक करु नै
तू हे करायचं नै
हे घालायचं नै
असं चालायचं नै
असं बघायचं नै
हं हं हं
लाइफ वाझ लाइक अ ड्रेअरी स्लिपरी जेल
लाइक अ मंडुक इन अ शॅबी मॉसी वेल
ती बद्द आवाजात गातच होती.झिनी तिच्याकडच्या चावीने दरवाजा उघडून आत आली आणि गाणाऱ्या निरुला बघून तशीच परत फिरली.

ही घे दोरी, घाल तुझ्या गळ्यात
नाच चल. ह्याईक sss
टांग टिंग टिंगाक.. टांग टिंग टिंगाक.. टांग टिंग टिंगाक टुंsss..
आपण नाचलोच...नाही का?
Warum ? का?
ती बंधनं अचानक हवीहवीशी वाटली होती. का नाही ती जोखडं तेव्हाच भिरकावून लावली?
Warum nisht? का नाही?

ती आरशाकडे न समजलेपणाने बघतेय. आता या आरशाकडे बघून स्वत:ची नव्याने ओळख करुन घेतली पाहिजे. ही मीच बरं. सत्तूशिवायची. निरुतून सत्तू वजा जाता उरतं काय? निरु उणे सत्तू शून्य मुळीच नाही.

आपली प्रतिबिंब या आरशात अडकत असतील? ती प्रतिबिंब एकत्र करुन एखादी सीडी करता येईल का? माझ्या चुका पुराव्याने शाबित करायचा सत्तूला फार सोस, आणि त्या चुकांची शिक्षा मन नाहीतर शरीर दुखवणारी. स्लीव्हलेस टॉप घातल्याची शिक्षा दंडावर नखांनी जखमा करुन, वारंवार त्या खरवडत राहून. निरुने दंडाच्या आतला भाग कुरवाळला, जखमा अद्याप ओलसर होत्या, कॉटनच्या कुर्त्याला चिकटत होत्या. टॅटू करुन घ्यायचा नुसता विचार बोलून दाखवला तर वाढदिवसाचा संपूर्ण दिवस तमाशे करत स्पॉइल करुन. नंतर नंतर तमाशे नकोत म्हणून खूप गोष्टी टाळल्याच आपण, "चलता है" म्हणत राहिलो, "मी हे केलं नाही तर बरंच" अशी स्वत:ची समजूत घालायला शिकलो.  तो सांगतोय ते करण्यात आपलं भलंच आहे किंवा त्यातून काही चांगलंच निष्पन्न होणार आहे, आपल्याला ते आवडून घ्यावंच लागेल असं म्हणत आपलं केलंसुद्धा. या सीडीने सत्तू कसाकसा आणि कुठे चुकला हे पुराव्याने दाखवता आलं तर? त्याच्याकडेही मी कशी चुकले हे दाखवणारा आरसा असेल तर?

किंवा जीते जाना है चा ऑप्शन सोडून त्याच प्रतिबिंबावर जगायचं ठरवलं तर? मिस हॅविशॅमसारखं?

तिने अचानक स्वत:च्या गालावर सणसणीत चपराक मारली.
निरुबाई! एका पुरुषापायी असं पोचे आलेल्या बाहुलीसारखं चुरमडत जाणं शोभतं का तुम्हाला?

आपण कायम एकाच माणसाशी बांधून घेतो. त्याला काय आवडतं, काय नाही आवडत, त्याचे वीकनेस, त्याचे टर्न ऑन्स, टर्न ऑफ्स. आपल्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीला त्याचेच संदर्भ चिकटवल्यासारखे होतात. आणि मग जेव्हा तो माणूसच राहत नही तेव्हा एकप्रकारचा व्हॉइड, पोकळी येते आपल्या आयुष्यात, मग तो व्हॉइड करीयर, पैसा, एस्थेटीक्सने भरायला बघतो आपण.

हां! शांत हो. ते घशातलं वाटण पुन्हा सुरू होतंय.

तिने मनातल्या मनात मेंढ्या मोजायला सुरुवात केली.
एक मेंढी आली..कुंपणावरून पलीकडे गेली
दुसरी आली..तिला सत्तूचा चेहरा होता.
अं?
?
निरुने डोळे उघडले, फडफडवले, तोंड वाकडं केलं आणि पुन्हा डोळे गच्च मिटले.
तिसरी मेंढी आली..तिचं नाक लांबलचक, केस खरबरीत, वेडेवाकडे..सत्तूसारखेच.
चौथी मेंढी आलीच नाही..आला तो सत्तूच.
श्शूsssssssssssssss पुरे! नाकावर तर्जनी दाबून वैतागत स्वत:लाच म्हटलं
छे! मेंढ्या पण काही कामाच्या नाहीत.

मग जालीम उपाय.
तिने झोमॅटो उघडलं आणि रात्री १ ला आइस्क्रीम्स कोण डिलिव्हर करतं हे पाहायला लागली. एरव्ही सत्तूने ती मिंट आइस्क्रीम्स मागवली असती. टूथपेस्टच्या फ्लेव्हरचं आइस्क्रीम खाणारा माणूस आपल्याला कसाकाय आवडला हे तिने आठवण्याचा प्रयत्न केला, मग डोक्याच्या मागे केस संपतात तिथे दुखरं वाटायला लागलं, तसा सोडून दिला. पुढच्या वेळी एखादा माणूस आवडला, तर त्याला त्याचा आवडता फ्लेव्हर पहिले विचारून घ्यायचा अशी तिने मनातल्या मनात नोंद केली. क्वालिटी वॉल्सची ६, मॅग्नमची ६, लंडन डेअरीची ६ असा छान १८ वस्तूंचा आकडा करून तिने समाधानाने तिच्या वजनदार कार्टकडे पाहिलं. काय वाढायचं ते वाढू देत वजन. कूपॉन्स आहेत का पाहिलं, तर अजून २ गोष्टी टाकल्या तर ५० रुपयांचं डिस्काउंट मिळेल असं दिसलं. मग अजून काय ख्खावं बरं, काय ख्खावंस वाटतंय बरं असं करत तिने पुन्हा मेनू स्क्रोल करायला सुरुवात केली. चांगली १५ मिनिटे विचार करून तिने आणखी २ आइस्क्रीम्स कार्टमध्ये टाकली तोवर ते दुकानच बंद झालं.
निरू तिच्या मोबाइल स्क्रीनकडे दोन क्षण पाहातच राहिली आणि मग तिला हसूच फुटलं. 
त्यानंतरची ५ मिनिटं ती फसफसून अनावर हसत राहिली.
च्यायला आपल्या संपूर्ण आयुष्य म्हणजेच झोमॅटो आहे. निवडीमध्ये वेळ चाल्लाय, खाणं-जगणं तर होतच नाहीये.
मग तिने स्विगी उघडलं, त्यानंतर झेप्टो, त्यानंतर ब्लिंकइट. सगळं जग आपापलं कामधंदे बंद करून झोपायच्या तयारीला लागलं होतं आणि निरुबाई इंटरनेटवर आइस्क्रीम कुठे मिळतंय हे शोधत होत्या. 

रात्री दोन-अडीच पर्यंत सुरू असणारी, अनवट जागांवरची आइस्क्रीम पार्लर्स सत्तूला माहीत असायची. 
आठवणी..आउच!

विसरायचंय.. विसरायचंय..
पण कसं?
व्होडकामध्ये तिला तिचं दु:ख बुडवता आलं असतं, पण तो काही लॉंगटर्म उपाय नव्हे हे कळण्याइतपत ती शहाणी होणी.
तिला सलग ३६ तास झोपता आलं असतं, बरं वाटेपर्यंत उठायचंच नाही असं ठरवता आलं असतं, ते शक्यंही होतं. पण ज्याला विसरायचंय त्याचा वास येणाऱ्या उशीवर, चादरीवर ते शक्य होईल? 
ती तरातरा चालत गेली आणि तिने बेडशीट उपसून काढली. उशांचे अभ्रे ओरबाडून काढले आणि चांगलं टंपासभर एरीयल टाकून वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकले.
मग बेसिनमध्ये पडलेली भांडी धुवून टाकली. 
केर काढला.
लादी पुसली. 
नवीन बेडशीट घातली.
सणकून भूक लागली, तेव्हा आपण पाच दिवसांपासून काही खाल्लेलं नाहीये हे तिच्या लक्षात आलं. मग तिने उभ्याउभ्याच कोरडे कॉर्नफ्सेक्स खाल्ले.
एक मोठा खोका काढला, त्यात घरातला उरलासुरला सत्तू भरून टाकला आणि खोक्याला लाथ मारून घराबाहेर काढलं.

खोका तर घराबाहेर गेला, पण डोक्यातून सत्तू जात नाहीये. 
तिला रडूच यायला लागतं. एका माणसापायी इतकं विद्ध व्हावं इतकं कसं काय आपण गुंतवून घेतलं? हे असं किती दिवस चालणार? यातून वाचलोच, तर वाचू ते आपण असू का?

मग ती हळूहळू चालत तिच्या टेबलपाशी गेली. कॉंप्युटर उघडला. दोन खोल श्वास घेतले आणि टाइप करायला सुरूवात केली.
टाइप करत राहिली. 
अर्धा तास झाला. 
एक तास.
दोन तास.
.
.
आणि मग समोरच्या स्क्रीनवरच्या वाहणाऱ्या शब्दांमध्ये तिच्या दु:खाचा निचरा होऊन गेला.

सकाळच्या पहिल्या प्रहरी लिहून संपतं, तेव्हा मनात आधीपेक्षा कमी दु:ख असतं, आणि जास्त शहाणा विचार असतो.
निरूला अशा अनेक उत्तररात्री जागून काढायला लागतील, तेव्हा कुठे तिचं दु:ख संपण्याची शक्यता असेल.
तिच्याआतलं तुटलेलं काहीतरी सांधलं जाईल याची शक्यता असेल.
तिचं आयुष्य पूर्वपदाला येईल, ती आनंदी राहायला लागेल याची शक्यता असेल.
पण,
शक्यता असेल, हे ही नसे थोडके.

 
Designed by Lena