मोनाकॉप्सिस

'V for Vendetta' ची क्रेडिट्स रोल व्हायला लागतात. सव्वादोन तास पडद्यावर चाललेलं नाट्य संपलं तरी आपण काहीही करायच्या, ऐकायच्या, विचार करायच्या मन:स्थितीत नसतो. काही वेळ सुन्न बसलेलो असतो आणि.. ते आक्रित घडतं. वाचोस्कींचं प्रोडक्शन आणि स्क्रीनप्ले असलेल्या, नॅटली पोर्टमन आणि ह्युगो व्हिव्हींग अशी स्टारकास्ट असलेल्या 'V for Vendetta' च्या क्रेडिट्समध्ये 02:06:55 नंतर 'परदेसी परदेसी जाना नही' आणि 'चुरा के दिल मेरा' ची मेडली लागते.

त्यानंतर तीन गोष्टी होतात.
पहिले होते ती आपली ऐकण्यात काहीतरी गल्लत होतेय ही भावना आणि त्यानंतर आपण ऐकतोय ते खरंच आपल्याला ऐकायला येतंय हे वाटून प्रचंड घाबरून जाणं ही दुसरी भावना. मळमळीची भावना होते तशी. वाचोस्कींच्या चित्रपटात अनू मलिक, नदीम-श्रवणची गाणी ऐकायला येण्याइतपत ऑडिटरी हॅल्युसिनेशन्सपर्यंत येऊन पोहोचलोच आपण असे वाटेपर्यंत 'नाही नाही ते खरंच तसं आहे' हे कळून हुश्श देखील वाटतं.

वाचोस्कींना हे करून काय साध्य करायचं आहे/होतं हे पहिल्यांदा खरंच कळत नाही. कदाचित इतक्या अड्रेनलिन रश देणाऱ्या चित्रपटानंतर मूड हलका करायचा असेल किंवा काहीही असो, पण ही गाणी अतिशय आउट ऑफ प्लेस वाटतात.
पण यानंतर पडणारा अपरिहार्य प्रश्न.. का? असंच का? याच प्रकारे का? त्यांना बिहाइण्ड द सीन्सदेखील दाखवता आले असते.
विचार केल्यानंतर वाटतं की, हे कदाचित जनसामान्यांच्या मनात काय चाल्लंय हे दाखवण्यासाठी असावं. 


ग्लोरीया स्टायनेम, माल्कम एक्स आणि दस्तुरखुद्द व्ही अशा प्रभृतींच्या क्रांतिकारी उद्घोषांमध्ये गोरीया चली, मुझे छोडके या ओळी कोंबल्या आहेत.
एकावर एक रेकॉर्ड झालेल्या, ओव्हरलॅप्ड आठवणींसारखा वाटतो हा प्रकार.

असं म्हणतात की, तुम्ही कोण आहात हे तुमच्या प्लेलिस्टवरून कळतं. कोणीतरी असंही म्हणालं होतं की, एखाद्या देशातील तरुणाई कोणती गाणी गुणगुणते हे मला सांगा आणि मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. गाणी/संगीत तुमच्या आठवणींमध्ये बुकमार्कसारखं काम करतं. तुम्हाला काय म्हणायचंय, समोरच्यापर्यंत काय पोहोचवायचंय हे संगीतातून पोहोचवता येतं. नाहीतर 'व्ही'नं चायकॉफस्कीचं 'नॅशनल अॅंदम' नावाचं ओव्हर्चर का वाजवलं असतं? अॅंडी डुफ्रीनने शॉशॅंकमध्ये मोझार्ट का वाजवला असता? उगीच?

या दोन गाण्यांबद्दलच (गोरीया, परदेसी) म्हणायचं झालं तर ही गाणी त्यांच्या त्यांच्या काळात जनता गाणी म्हणून प्रसिद्ध होती. ट्रेनमध्ये, रिक्षामध्ये, ट्रकमध्ये सगळीकडे तीच वाजायची. तीच ती गाणी ऐकून कधीकधी वाटायचं की आपल्या समोरचा प्रत्येक माणूस, बाजूने जाणाऱ्या ट्रेममधला प्रत्येक प्रवासी, अवघी मुंबई तीच गाणी ऐकतेय. आणि मला वाटतं इथंही त्यांचं प्रयोजन त्याचसाठी आहे. त्या चित्रपटात हाउस ऑफ पार्लामेंटच्या रस्त्यावर जमलेल्या जमावाच्या मनातदेखील असंच काहीसं असू शकेल.

प्रत्येक क्रियेला जशी विरुद्ध जिशेने तितकीच प्रतिक्रिया असते, त्याचप्रमाणे प्रत्येक विचारामागे, प्रत्येक इच्छेपाठी उलट प्रश्न विचारणारं एक गाणं असतं. त्या परिस्थितीला आणि त्या परिस्थितीतल्या तुम्हाला उलट प्रश्न विचारणारं. तुम्ही आकंठ प्रेमात आहात...साथिया तुने क्या किया, कहॉं मै चली, दिल मेरा चुराया क्यूं एटसेट्रा. जनता काय विचार करते ते मुळात याच विषयांभोवती फिरणारं असावं, तस्मात्..

कहॉं मै चली..
मुझे छोड के..
जाना नही..
हे परत परत लूप मोडमध्ये वाजत राहातं. विखुरलेले विचार, स्वत:शीच स्वत:सोबत चाललेली प्रश्नमंजुषा असावी आणि ते सर्व काही एकाच टेपवर पुन्हा पुन्हा रेकॉर्ड केलेलं असावं तसं..

अतिशय वाह्यात सिच्युएशनमध्ये असतो तेव्हा नाही का 'ये क्या हुआ हे गाणं' वाजतं.. मेबी तसंच. वर म्हटल्याप्रमाणे आपण ऐकतोय ते खरंच आपल्याला ऐकायला येतंय हे वाटून प्रचंड घाबरून जाणं ही दुसरी भावना झाल्यावर 'भय इथले संपत नाही' हे डोक्यात वाजायचं ते वाजलंच.
गोरीया चली म्हणे..

पण, ते इतकंही आउट ऑफ प्लेस नाही वाटत आता.

मिकन् आणि मिकनचा पाऊस

मिकनला तो पुढे पारदर्शक प्लॅस्टिकचा व्हायझर असलेला पिवळा रेनकोट खूप आवडायचा.

तो त्याला खूप मोठा व्हायचा, पण मिकनला त्यात घुसून गुरगुटी मारुन बसायला आवडायचं. तो रेनकोटही इतका मोठा होता की मिकन् टोपीच्या आतून त्यात घुसला की तो रेनकोट पिवळं पोतं उभं केल्यासारखा उभ्याचा उभाच राहायचा. त्यात खुडूक करून बसलं की प्लॅस्टिकच्या ओल्यादमट उबदार वासाने मिकनला झोप यायला लागायची. कानावर हात गच्च दाबले की आजूबाजूचे आवाज कसे दबून जातात, तसा बाहेरच्या पावसाचा आवाज  त्या रेनकोटमध्ये गाळून यायचा. बाहेर आईच्या आवाजासारखा किनरा वाटणारा पाऊस रेनकोटच्या आत मात्र बाबाच्या आवाजासारखा व्हायचा. तसं पाहिलं तर पिंपात बसून मोठ्यांदा ओरडलं की मिकनचा आवाज देखील बाबासारखा भासे आणि त्याला ऐट असल्यासारखी वाटे; पण आईने पिंपात उतरायची बंदी घातली आणि पिंपात उतरण्यासाठी लागणारं स्टूलही माळ्यावर नेऊन ठेवलं, तेव्हापासून मिकन् आणि रेनकोट यांचं सख्य जरा जास्तच वाढलं.

-

मिकन् सकाळपासूनच रेनकोट घालून बसला होता.
सकाळपासून किती तो पाऊस पडतोय. बदाबदा कोसळतोय नुसता.
हा थकून कसा जात नाही? आपण कितीही रडायचं ठरवलं तरी दहा मिनिटांनंतर डोळ्यातलं पाणी संपतं, आणि बाबा फिस्सकन हसतो. मग हा तासनतास कसा पाणी गाळत असेल? नाकाच्याही पुढे येणारा व्हायझर सावरत मिकन् दारात खुरमांडी घालून बसला होता आणि विचारमग्न चेहऱ्याने आभाळाकडे पाहात होता. आणि त्याच्यापाठी खुर्चीत बसलेली आई त्याच्याकडे टक लावून पाहात होती.

छपरावरून पडणारी पानगळ त्याला मोत्यांच्या सरीसारखी वाटत होती. त्यातल्या प्रत्येक मोत्याच्या आत एक वेगळं जग होतं, गोटीच्या आत असतं तसं.
पावसाचे थेंब हातावर घेतले की सगळंकाही छान छान बरं होतं, हाताची खाज पुरळ जाते असं आईने त्याला सांगीतलेलं.

मिकन् उठला आणि स्वैपाकघरात गेला.
तो काय करतोय हे आई डोळे बारीक करून बघत होती.
तर मिकन् त्याच्यापुढे घमेलं भासावं इतकं मोठं पातेलं घेऊन दीड पायावर तोल सांभाळत येताना दिसला. गुडघे वाकवून पोट आत ओढून एकेक पाऊल टाकत येणाऱ्या मिकनला पाहून बाबाही दारातच थबकला. आईने ओठावर बोट ठेवून त्याला गप्प राहण्याची खूण केली.

मिकन् ते जड पातेलं उचलून दाराच्या बाहेर पडला, अंगणाच्या पायऱ्या उतरून खाली उतरला आणि त्याने ते पातेलं छपरारून पडणाऱ्या पानगळीच्या धारेखाली ठेवलं.

पावसाचा जोर एव्हाना कमी झालेला, त्यामुळे पानगळही थेंब थेंबच होती, पण मिकन् ते भरण्याची वाट पाहात तिथेच उभा राहिला.
तो काय करतोय हे पाहायला आई आणि बाबाही दारात येऊन उभे राहिले.
किती वेळ गेला काय माहीत, पण मिकन् त्या पातेल्याकडे एकटक पाहात उभा होता आणि आई बाबा त्याच्याकडे एकटक पाहात उभे होते.

मिकनच्या गोबऱ्या चेहऱ्यामुळे त्या रेनकोटच्या टोपीची बकलं काय त्याच्या कानावरून हनुवटीच्या खाली यायला तयार नव्हती, त्यामुळे झालं काय की, टोपीवर साठलेले पावसाचे एक दोन थेंब मिकनच्या गळ्यावरून शर्टाच्या आत गेले आणि मिकनने शहारत कान खांद्याला खसखसून पुसले. ते करण्याच्या नादात व्हायझरवरून एक चुकार थेंब मिकनच्या नाकावर उतरला आणि मिकनने नाक आक्रसलं. ही सगळी सर्कस चालू असेपर्यंत ते पातेलं अर्धं पण भरलं नव्हतं.
आईचे पण पाय दुखायला लागून ती दीड पायांवर उभी होती. बाबा तर केव्हाचाच आत गेला होता.

शेवटी एकदाचं ते पातेलं भरलं.

मिकनने ते आधीच जड असलेलं आणि पाण्यामुळे आणखी जड झालेलं पातेलं उचललं आणि हळूहळू चालत अंगणातल्या एका झाडाच्या दिशेने निघाला.
हा पावसात कुठे चाललाय हे पाहायला आई काळजीने अंगणाच्या पायऱ्या उतरुन खाली आली.

अंगणात एक जंगली बदामाचं झाड होतं. मिकनच्या जन्मापासून उभं असलेले, वर्षानुवर्षं राजवर्खी, सोनवर्खी पानांचा सडा घालून अंगण सजवणारं ते झाड कोणीतरी कुऱ्हाडीचे घाव घालून तोडण्याचा प्रयत्न केल्यापासून वठून गेलं होतं. त्याच्यावरचे सगळे बदाम गळून पडले होते. हिरवं-पिवळं तेज मिरवणारं खोड आता काळंठिक्कर पडलं होतं.
मिकन् हातातलं पातेलं सावरत झाडाजवळ पोहोचला आणि अंगातली सारी ताकद एकवटून ते पातेलं त्याने झाडावर पडलेल्या कुऱ्हाडीच्या घावांवर उपडं केलं.
मग पातेलं खाली ठेवन मिकनने झाडाच्या खोडाभोवती हात वेढले आणि खोडावर त्याचे गाल घासत बारक्या थरथरत्या आवाजात म्हणला, "लवकर बरा हो"

आई येऊन मिकनच्या मागेच उभी होती. तिने एक आवंढा गिळला आणि चेहऱ्यावरचे पावसाचे थेंब पुसून ती म्हणाली,
"मिकन्, चला घरी जाऊ या?"
त्यावर मिकनने व्हायझर उचलून मान वर करून आईकडे पाहिलं आणि मान डोलावली. झाडाच्या खोडावर शेवटचं थपथपवून त्याने आईचा हात धरला.

ही दोघं नेमकं करतायेत तरी काय हे पाहायला दारात आलेल्या बाबाने पावसात भिजत येणाऱ्या आईला पाहिलं आणि काळजीने विचारलं,
"अगं छत्री नाही का न्यायची?"
त्यावर आईने मिकनकडे पाहिलं आणि म्हटलं,
"मग मी बरी कशी होणार, नाही का?"
मिकनने ते पटून जोरजोरात मान हरवली आणि बाबा काही न समजून नुस्ता पाहातच राहिला.
आईने दुसऱ्या हाताने बाबाचा हात धरला आणि हळूवार आवाजात म्हणाली, "थॅंक यू!" आणि मिकनचा हात बाबाकडे देऊन आत निघून गेली.

मिकन आणि बाबा दोघेही एकमेकांकडे पाहातच पाहिले. मध्येच थॅंक यू?
तेव्हा पाठी आईचं आवडतं गाणं वाजत होतं.

टेल मी समथिंग गर्ल,
आर यू हॅप्पी इन दिस मॉडर्न वर्ल्ड?
ऑर यू नीड मोअर
इझ देअर समथिंग एल्स यू आर सर्चिंग फॉर?

आई अशीच थोडी वेडी आहे.
त्या पिवळ्या रेनकोटसारखी.

--

झाडाझडती.

माझं तीस वर्षांचं आयुष्य दोन बॅगांमध्ये कोंबून बंगलोरला आले त्याला आता अडीच वर्षं होतील.

मी तीस वर्षांत एव्हढं काय काय जमा केलं होतं हावऱ्यासारखं, (अर्थात पाचशे-सहाशे पुस्तकं सोडून) ते सगळं फक्त दोन बॅगांमध्ये बसलं तेव्हा किती नवल वाटलेलं. मला आणि "कुठे घेऊन जाणारेस एव्हढं सर्व" असं म्हणून सदैव कटकटणाऱ्या आईलाही.

आपण किती सहजपणे बॅगा उचलून चालू पडलेलो आणि बिनदिक्कत या नवीन, सर्वस्वी परक्या शहरात येऊन स्थिरावलो याचं खूप कौतुक वाटतं.

आज मागे वळून पाहते आणि तेव्हाची मी-आत्ताची मी असं तुलनात्मक विश्लेषण करते, तेव्हा त्या निर्णयाचा यत्किंचीतही पश्चाताप वाटत नाही. दोन-अडीच वर्षं म्हणता म्हणता टिन फॅक्टरी, के आर पुरमच्या ट्रॅफिकच्या ग्लानीत, गोतिल्ला, इल्ला, हौदा, इष्ट, स्वल्प, बरथायदिनीच्या पारायणांमध्येच गेली. मग एके दिवशी आपल्याला (ज्यात बस, रिक्षा किंवा उबरचा प्रवास नसेल असं) काहीतरी करायला हवंय असा साक्षात्कार झाला. लग्न, पोरंबाळं यांच्या फंदात कधी पडायचं झालंच, तर एक झाड आणि एक पाळीव प्राणी जगवून दाखवायचा हा पण देखील आठवला आणि मी एके दुपारी नर्सरीकडे मोर्चा वळवला.

मी यापूर्वी झाडं वाढवलियेत, नाही असं नाही, पण ते घरी असताना. तिथे सगळा को-पॅरेंटिंगचा प्रकार होता. मी घरी नसले तर आई किंवा पप्पा पाणी घालून जातील, भाऊ किंवा बहिण नजर टाकून जाईल असा सीन असल्याने त्या रोपांची काळजी करण्याची, त्यांचं निगुतीने करत बसण्याची, त्यांच्या बरं असण्या-नसण्याने घाबरुन जाण्याची वेळ कधी आलीच नाही.

पण इथे मात्र मी सिंगल पेरेंट असणार होते.
आता गंमत अशी आहे की, नर्सरीमध्ये एकदम फ्रेश दिसणारी झाडं आपण आपल्या बाल्कनीत आणून ठेवली की माना टाकतात. नर्सरीत छान तासेक घालवून छान तरुण रोपं आणावीत आणि ती आठवड्याच जख्ख म्हातारी असावीत अशी दिसायला लागावीत हे कित्येक महिने चाललं. हा प्रकार मला आजतागायत कळलेला नाही, का? ते देखील नीटसं कळलेलं नाही. पण नर्सरीतून आणलेलं एक झेंडू, एक जुई आणि एका ओव्याच्या रोपाचा दफनविधी केल्यानंतर मी शहाणी झाले आणि मी बिया पेरायला सुरुवात केली. आता तिथेही काहीतरी झकडम लफडं आहेच. बियांमध्ये सकस बिया आणि पंडु बिया अशी प्रकरणं असतात, माणसांसारखीच. सगळ्याच अंकुरतात असं नाही. अंकुरल्याच तरी त्यांच्यामध्ये तुफान स्पर्धा चालते. मी एकाच वेळी पेरलेल्या एकाच गुलबक्षीच्या झाडाच्या सहा बियांपैकी फक्त दोन रोपं ताडमाड वाढलियेत. बाकीच्या बिया अंकुरल्यात खऱ्या, पण त्यांची वाढ खुरटी आहे. ती दीनवाणी होऊन या धिप्पाड झाडांच्या पायाशी तग धरून आहेत. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. तंतोतंत माणसांसारखं.

'शेफ' सिनेमामध्ये कार्ल हा मॉलीसाठी पास्ता आग्लिओ इ ओलियो  बनवतो आहे असा एक प्रसंग आहे. अचानक मॉलीचा श्वास जड व्हायला लागतो आणि ती धापा टाकायला लागते. कोणाचाही असा समज व्हावा की, तिथे व्हेंटिलेशनचा काहीतरी लोच्या आहे आणि तिचा श्वास कोंडलाय. पण खरं होत हे असतं की, ती त्याच्या पास्ता बनवण्याच्या पॅशनने, त्याच्या एकंदरच चटचटीतपणाने अराउझ झालेली असते. हे त्या सीनच्या शेवटी तुम्हाला कळतं, आणि तुम्ही "हात्तीच्या मारी.. असं होतं व्हय!", असं काहीतरी वाटून घेऊन सिनेमा पुढे पाहायला लागता. झाडांच्या बाबतीतही हे असंच. त्यांना काय होतंय हे शिंचं काही कळत नाही. त्यांना होत एक असतं आणि आपल्याला काहीतरी भलतंच वाटत असतं. आपण खूप काही करतो.. इंटरनेटवर व्हिडिओ पाहतो, गोमूत्र, इप्सम सॉल्ट, इनो, कंपोस्ट नीम स्प्रे सगळं सगळं करून पाहतो. अत्यंत इमोशनल असताना त्याला शपथाही घालतो, त्यानेही काही परिणाम होत नाही हे पाहिल्यावर आसवं गाळतो, पण ते त्यातून खऱ्या अर्थाने सावरतच नाही. ते सुकत जातं, मरत जातं, आणि एके दिवशी आपण ते मरणारच आहे हे सत्य पचवतो आणि आपल्या मनाची तयारी करतो. कारण, शेवटी आपणच सगळे प्रयत्न करुन चालत नाही, त्या झाडातही तितका जीव, इच्छाशक्ती असावी लागते. ते झाडही जगायचा प्रयत्न करत असणारच, मरण कोणाला आवडतं? पण त्याचे प्रयत्नच तोकडे पडत असणार, दुसरं काय! ज्याची इच्छाशक्ती जास्त प्रखर, ज्याचं बीज अधिक निकं तेच जगणार, ज्यात सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वाढण्याची ताकद आहे तेच जिवंत राहणार. किंवा दुसरा सिनारियो. नशिबावर हवाला ठेवून सगळंकाही चांगलं होईल अशी आशा करत राहायचं. मग एके दिवशी त्या झाडाच्या बुंध्याला हिरवट झाक यायला लागते, पानं फुटायला लागतात, आणि आपल्याला प्रचंड इरॉटिक वगैरे वाटतं, आपण त्यानंतरचे कित्येक दिवस हाय असतो. (ओह! मॉलीच्या भावना पोहोचल्या)

मग पुढे जाऊन असंही होतं, की झाड खूप छान जगतं, तरारतं, त्याला छानशी चकचकीत हिरव्या रंगाची पानं येतात, पण ते झाड फुलं मात्र काही देत नाही. 
मी जेव्हा झाडं लावायला सुरुवात केली होती, तेव्हा मला त्याला लगेचच फुलं यावी असं वाटायचं. एखादं बीज रोवलं, एखादी फांदी लावली, की फांदी फुटायला, बीज अंकुरायला किती वेळ लागतो याची माहिती सहज उपलब्ध असते. तो तितका कालावधी निघून गेला की माझी घालमेल सुरु व्हायची. फूल येत का नाही? का येत नाही फूल?..माझं काही चुकतंय का?.. हे असं करायला हवं होतं का? कदाचित ते तसं केलं ते चुकलं असावं. हजार पण-परंतु.. त्यात प्रचंड उर्जा वाया जायची. गाण्याचे फक्त मुखडे पाठ असण्याचा तो काळ. अस्ताई आवडली की गाणं आवडलं..अंतरा ऐकून मत बनवण्याइतका धीर नसायचा, किंवा तितका वेळ कळ काढता यायची नाही. तो उतावीळपणा नंतर कमी झाला, पण या झाडांनी जणूकाही मला संयम शिकवायचा विडाच उचलला होता. हद्द झाली जेव्हा माझा जीव की प्राण असणाऱ्या, डोळ्यात तेल घालून जपलेल्या-वाढवलेल्या माझ्या उंचीच्या एका झाडाला शेवटपर्यंत फूल आलंच नाही, पण मी मात्र आज येईल फूल, उद्या येईल..म्हणून तब्बल दीड वर्षं काढलं. 
पण शेवटी ते असंच असायचं असतं. तुम्हाला मान्य नाही..टफ! बसा बोंबलत.

यात चुका नसतात. मी याला चुका मानत नाही. हे फक्त प्रयोग असतात. तुम्ही दुसऱ्यामार्फत स्वत:वर करून घेतलेले. हे प्रयोग तुम्हाला तुम्हाला तुमच्या मर्यादांची तीव्र जाणीव करून देतात, कुठे थांबायचं, कुठे सीमारेषा आखून घ्यायची, कशाने किती फरक पाडून घ्यायचा, की घ्यायचा नाही हे नीटच शिकवतात. आपण खूप प्रेमाने लावलेल्या, लळा लावलेल्या झाडांना पुरताना काहीही शाश्वत नाही हे सत्य कडूजहर हलाहलासारखं गळी उतरत राहतं, आणि आपण ते पहिल्यांदा..दुसऱ्यांदा करत कित्येकदा पचवतो. पण त्याने तुम्ही झाडं लावायचं सोडत नाही, त्यांचं निगुतीने सर्व करण्यात काही कसूर सोडत नाही. हे जगेल, वाचेल, बहरेल या आशेने तुम्ही बिया, रोपं लावत राहता, जगत राहता, जीव लावत राहता. कदाचित यालाच शहाणा आशावाद म्हणतात.

कुठलाही आवाज न करता, शांतपणे मोठ्या होत जाणाऱ्या, तुम्हाला बक्कळ शिकवणाऱ्या आणि सदैव साथ देणाऱ्या अशा गोष्टी हव्या आहेत खरंच.. गरज आहे.

--

आता माझ्या त्या 'पणा'तील दुसरा टप्पा - पाळीव प्राणी जगवून दाखवणं. आणि मी हे प्रकरण घरी आणायचा विचार करतेय.

Image may contain: cat
चित्र जालावरून साभार
पर्शियन मांजर आणि माझ्यात काही लाक्षणिक साम्यस्थळं आहेत असं मला सांगण्यात आलंय. आय डोण्ट रिअली सी दॅट; पण, ते घरी आणल्यानंतर आम्ही नाक कपाळावर नेऊन एकमेकांना किती, किती वेळ आणि कसे इग्नोअर मारतो हे पाहण्याची जाम म्हणजे जाम इच्छा आहे.

त्याने त्याच्या मांजरपणात आणि माझ्या 'यू-नो-व्हॉट'पणात काही फरक पडणार नाही,
पण बहुतेक मजा येईल!!

वाटतंय खरं. पाहू.

 
Designed by Lena