झाडाझडती.

माझं तीस वर्षांचं आयुष्य दोन बॅगांमध्ये कोंबून बंगलोरला आले त्याला आता अडीच वर्षं होतील.

मी तीस वर्षांत एव्हढं काय काय जमा केलं होतं हावऱ्यासारखं, (अर्थात पाचशे-सहाशे पुस्तकं सोडून) ते सगळं फक्त दोन बॅगांमध्ये बसलं तेव्हा किती नवल वाटलेलं. मला आणि "कुठे घेऊन जाणारेस एव्हढं सर्व" असं म्हणून सदैव कटकटणाऱ्या आईलाही.

आपण किती सहजपणे बॅगा उचलून चालू पडलेलो आणि बिनदिक्कत या नवीन, सर्वस्वी परक्या शहरात येऊन स्थिरावलो याचं खूप कौतुक वाटतं.

आज मागे वळून पाहते आणि तेव्हाची मी-आत्ताची मी असं तुलनात्मक विश्लेषण करते, तेव्हा त्या निर्णयाचा यत्किंचीतही पश्चाताप वाटत नाही. दोन-अडीच वर्षं म्हणता म्हणता टिन फॅक्टरी, के आर पुरमच्या ट्रॅफिकच्या ग्लानीत, गोतिल्ला, इल्ला, हौदा, इष्ट, स्वल्प, बरथायदिनीच्या पारायणांमध्येच गेली. मग एके दिवशी आपल्याला (ज्यात बस, रिक्षा किंवा उबरचा प्रवास नसेल असं) काहीतरी करायला हवंय असा साक्षात्कार झाला. लग्न, पोरंबाळं यांच्या फंदात कधी पडायचं झालंच, तर एक झाड आणि एक पाळीव प्राणी जगवून दाखवायचा हा पण देखील आठवला आणि मी एके दुपारी नर्सरीकडे मोर्चा वळवला.

मी यापूर्वी झाडं वाढवलियेत, नाही असं नाही, पण ते घरी असताना. तिथे सगळा को-पॅरेंटिंगचा प्रकार होता. मी घरी नसले तर आई किंवा पप्पा पाणी घालून जातील, भाऊ किंवा बहिण नजर टाकून जाईल असा सीन असल्याने त्या रोपांची काळजी करण्याची, त्यांचं निगुतीने करत बसण्याची, त्यांच्या बरं असण्या-नसण्याने घाबरुन जाण्याची वेळ कधी आलीच नाही.

पण इथे मात्र मी सिंगल पेरेंट असणार होते.
आता गंमत अशी आहे की, नर्सरीमध्ये एकदम फ्रेश दिसणारी झाडं आपण आपल्या बाल्कनीत आणून ठेवली की माना टाकतात. नर्सरीत छान तासेक घालवून छान तरुण रोपं आणावीत आणि ती आठवड्याच जख्ख म्हातारी असावीत अशी दिसायला लागावीत हे कित्येक महिने चाललं. हा प्रकार मला आजतागायत कळलेला नाही, का? ते देखील नीटसं कळलेलं नाही. पण नर्सरीतून आणलेलं एक झेंडू, एक जुई आणि एका ओव्याच्या रोपाचा दफनविधी केल्यानंतर मी शहाणी झाले आणि मी बिया पेरायला सुरुवात केली. आता तिथेही काहीतरी झकडम लफडं आहेच. बियांमध्ये सकस बिया आणि पंडु बिया अशी प्रकरणं असतात, माणसांसारखीच. सगळ्याच अंकुरतात असं नाही. अंकुरल्याच तरी त्यांच्यामध्ये तुफान स्पर्धा चालते. मी एकाच वेळी पेरलेल्या एकाच गुलबक्षीच्या झाडाच्या सहा बियांपैकी फक्त दोन रोपं ताडमाड वाढलियेत. बाकीच्या बिया अंकुरल्यात खऱ्या, पण त्यांची वाढ खुरटी आहे. ती दीनवाणी होऊन या धिप्पाड झाडांच्या पायाशी तग धरून आहेत. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. तंतोतंत माणसांसारखं.

'शेफ' सिनेमामध्ये कार्ल हा मॉलीसाठी पास्ता आग्लिओ इ ओलियो  बनवतो आहे असा एक प्रसंग आहे. अचानक मॉलीचा श्वास जड व्हायला लागतो आणि ती धापा टाकायला लागते. कोणाचाही असा समज व्हावा की, तिथे व्हेंटिलेशनचा काहीतरी लोच्या आहे आणि तिचा श्वास कोंडलाय. पण खरं होत हे असतं की, ती त्याच्या पास्ता बनवण्याच्या पॅशनने, त्याच्या एकंदरच चटचटीतपणाने अराउझ झालेली असते. हे त्या सीनच्या शेवटी तुम्हाला कळतं, आणि तुम्ही "हात्तीच्या मारी.. असं होतं व्हय!", असं काहीतरी वाटून घेऊन सिनेमा पुढे पाहायला लागता. झाडांच्या बाबतीतही हे असंच. त्यांना काय होतंय हे शिंचं काही कळत नाही. त्यांना होत एक असतं आणि आपल्याला काहीतरी भलतंच वाटत असतं. आपण खूप काही करतो.. इंटरनेटवर व्हिडिओ पाहतो, गोमूत्र, इप्सम सॉल्ट, इनो, कंपोस्ट नीम स्प्रे सगळं सगळं करून पाहतो. अत्यंत इमोशनल असताना त्याला शपथाही घालतो, त्यानेही काही परिणाम होत नाही हे पाहिल्यावर आसवं गाळतो, पण ते त्यातून खऱ्या अर्थाने सावरतच नाही. ते सुकत जातं, मरत जातं, आणि एके दिवशी आपण ते मरणारच आहे हे सत्य पचवतो आणि आपल्या मनाची तयारी करतो. कारण, शेवटी आपणच सगळे प्रयत्न करुन चालत नाही, त्या झाडातही तितका जीव, इच्छाशक्ती असावी लागते. ते झाडही जगायचा प्रयत्न करत असणारच, मरण कोणाला आवडतं? पण त्याचे प्रयत्नच तोकडे पडत असणार, दुसरं काय! ज्याची इच्छाशक्ती जास्त प्रखर, ज्याचं बीज अधिक निकं तेच जगणार, ज्यात सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वाढण्याची ताकद आहे तेच जिवंत राहणार. किंवा दुसरा सिनारियो. नशिबावर हवाला ठेवून सगळंकाही चांगलं होईल अशी आशा करत राहायचं. मग एके दिवशी त्या झाडाच्या बुंध्याला हिरवट झाक यायला लागते, पानं फुटायला लागतात, आणि आपल्याला प्रचंड इरॉटिक वगैरे वाटतं, आपण त्यानंतरचे कित्येक दिवस हाय असतो. (ओह! मॉलीच्या भावना पोहोचल्या)

मग पुढे जाऊन असंही होतं, की झाड खूप छान जगतं, तरारतं, त्याला छानशी चकचकीत हिरव्या रंगाची पानं येतात, पण ते झाड फुलं मात्र काही देत नाही. 
मी जेव्हा झाडं लावायला सुरुवात केली होती, तेव्हा मला त्याला लगेचच फुलं यावी असं वाटायचं. एखादं बीज रोवलं, एखादी फांदी लावली, की फांदी फुटायला, बीज अंकुरायला किती वेळ लागतो याची माहिती सहज उपलब्ध असते. तो तितका कालावधी निघून गेला की माझी घालमेल सुरु व्हायची. फूल येत का नाही? का येत नाही फूल?..माझं काही चुकतंय का?.. हे असं करायला हवं होतं का? कदाचित ते तसं केलं ते चुकलं असावं. हजार पण-परंतु.. त्यात प्रचंड उर्जा वाया जायची. गाण्याचे फक्त मुखडे पाठ असण्याचा तो काळ. अस्ताई आवडली की गाणं आवडलं..अंतरा ऐकून मत बनवण्याइतका धीर नसायचा, किंवा तितका वेळ कळ काढता यायची नाही. तो उतावीळपणा नंतर कमी झाला, पण या झाडांनी जणूकाही मला संयम शिकवायचा विडाच उचलला होता. हद्द झाली जेव्हा माझा जीव की प्राण असणाऱ्या, डोळ्यात तेल घालून जपलेल्या-वाढवलेल्या माझ्या उंचीच्या एका झाडाला शेवटपर्यंत फूल आलंच नाही, पण मी मात्र आज येईल फूल, उद्या येईल..म्हणून तब्बल दीड वर्षं काढलं. 
पण शेवटी ते असंच असायचं असतं. तुम्हाला मान्य नाही..टफ! बसा बोंबलत.

यात चुका नसतात. मी याला चुका मानत नाही. हे फक्त प्रयोग असतात. तुम्ही दुसऱ्यामार्फत स्वत:वर करून घेतलेले. हे प्रयोग तुम्हाला तुम्हाला तुमच्या मर्यादांची तीव्र जाणीव करून देतात, कुठे थांबायचं, कुठे सीमारेषा आखून घ्यायची, कशाने किती फरक पाडून घ्यायचा, की घ्यायचा नाही हे नीटच शिकवतात. आपण खूप प्रेमाने लावलेल्या, लळा लावलेल्या झाडांना पुरताना काहीही शाश्वत नाही हे सत्य कडूजहर हलाहलासारखं गळी उतरत राहतं, आणि आपण ते पहिल्यांदा..दुसऱ्यांदा करत कित्येकदा पचवतो. पण त्याने तुम्ही झाडं लावायचं सोडत नाही, त्यांचं निगुतीने सर्व करण्यात काही कसूर सोडत नाही. हे जगेल, वाचेल, बहरेल या आशेने तुम्ही बिया, रोपं लावत राहता, जगत राहता, जीव लावत राहता. कदाचित यालाच शहाणा आशावाद म्हणतात.

कुठलाही आवाज न करता, शांतपणे मोठ्या होत जाणाऱ्या, तुम्हाला बक्कळ शिकवणाऱ्या आणि सदैव साथ देणाऱ्या अशा गोष्टी हव्या आहेत खरंच.. गरज आहे.

--

आता माझ्या त्या 'पणा'तील दुसरा टप्पा - पाळीव प्राणी जगवून दाखवणं. आणि मी हे प्रकरण घरी आणायचा विचार करतेय.

Image may contain: cat
चित्र जालावरून साभार
पर्शियन मांजर आणि माझ्यात काही लाक्षणिक साम्यस्थळं आहेत असं मला सांगण्यात आलंय. आय डोण्ट रिअली सी दॅट; पण, ते घरी आणल्यानंतर आम्ही नाक कपाळावर नेऊन एकमेकांना किती, किती वेळ आणि कसे इग्नोअर मारतो हे पाहण्याची जाम म्हणजे जाम इच्छा आहे.

त्याने त्याच्या मांजरपणात आणि माझ्या 'यू-नो-व्हॉट'पणात काही फरक पडणार नाही,
पण बहुतेक मजा येईल!!

वाटतंय खरं. पाहू.

बेखयाली का खयाल अच्छा है!

उचकायचंच म्हटलं तर छोटंसं कारणही पुरतं.
कधीकधी तुम्ही नुस्ते बसलेले असता आणि पुढच्याच सेकंदाला तुमचा मूड खराब होतो.
काही काही दिवशी असं वाटतं की, आपल्याला येत असलेल्या शिव्यांच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड फारकत आहे.
मग तुम्ही स्वत:वर चरफडण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. तुमचा राग, तुमची चिडचिड आत साठत जाते आणि तुम्ही नुस्ते धुमसत राहता.
पण मग एका उपरतीच्या क्षणी तुम्हाला स्वत:ला दिलेले स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे आठवतात. उद्या आपण मरुनच गेलो, तर आपण केलेली शेवटची गोष्ट काय असेल? ही? हे जाणवून शरमता.
मग तुम्ही असंख्य मूव्हीमध्ये हिरोने हिरॉइनीला शिकवलेली गोष्ट करता. जी 'लाइफ इन मेट्रो'मध्ये इरफानने कोंकोणाला शिकवली होती.
तुम्ही गच्चीवर जाता, गच्चीच्या कठड्यावर हात गच्च रोवता आणि..
किंचाळून विचारता की-
सचेत टंडनने इतकं जीव ओतून गायलेलं #बेखयाली अरिजीतने गायची गरज काय?

--

माझ्या घराच्या बाजूला एक तमिळ कुटुंब राहतं. त्यांचं २-३ वर्षांचं कार्टं पाहावं तेव्हा त्याची सायकल दामटत पायात येत असतं. लहान मुलांच्या सायकलच्या हॅंडलला नाही का त्या चकचकीत रंगाच्या झिरमिळ्या असतात, तशा त्याच्याही सायकललाही आहेत, पण ते कार्टून झिरमिळ्यांच्या जागी त्याची चड्डी टांगून वेडबागडं हिंडत असतं. त्याला वाटतं असं केलं की आपण काय हुश्शार, इतरांहून वेगळे! पण खालून ती सायकल लागत असणारच. आणखी तीन-चार वर्षांमध्ये त्याला हे कळेलच.

अरिजीतला अजून कळू नये?

अरिजीतचं बेखयाली हे सचेतच्या थोड्याशा वेडसर, युयुत्सु आणि पोरगेल्याशा ते तरणाबांड याच्यामध्ये कुठेतरी असलेल्या आवाजातल्या 'बेखयाली'पुढे किती पुचाट वाटतं याची त्याला कल्पना तरी आहे का?

--

मला सचेत टंडन आवडतो अशातला भाग नाही. (मी त्याचं नाव सवयीने 'सॅशे' असं वाचलेलं) 'बेखयाली' हे मी त्याचं ऐकलेलं पहिलंवाहिलं गाणं. त्याच्या तुलनेत मला अरिजीतची कितीतरी जास्त गाणी आवडतात, पण एक बाब मात्र खरीये की,
'बेखयाली' हा अरिजीतचा प्रांत नोहे!

तुम्हाला आरशात पाहून हातवारे करत प्रेमगीतं म्हणायचियेत, तर अरिजीत हवा.
तुम्हाला समुद्रकिनारी बसून थंड नि:श्वास सोडाचये झालेत, तरीही अरिजीतच हवा.
93.5 रेड एफएमवर गाणं कोणातरी 'स्पेशल समवन'ला गाणं डेडिकेट करायचंय, तर ते शंभरातल्या नव्वद वेळा अरिजीतचंच असणार.
पूर्वीच्या काळी जगजित सिंग, पंकज उधास बागेतल्या बेंचवर किंवा परदेशातल्या एक्झॉटिक कॅफेमध्ये बसून प्रेमाची गाणी गायचे, तशी गाणी आजच्या जमान्यात गायलाही अरिजीतच हवा.
मला स्वत:ला अरिजीतचं रंगूनमधलं 'ये इश्क है', कलंकचा टायटल ट्रॅक, रामलीलामधलं 'लाल इश्क', 'फितूर मेरा', हैदरमधलं 'खुल कभी तो' ही गाणी प्रचंड आवडतात. ही गाणी अजूनही माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत. पण सुदैव म्हणा किंवा दुर्दैव, आपल्याला जेव्हा गायक आणि त्याची गाणी आवडत जातात तेव्हा त्याचा पॅटर्न आणि त्याच्या सीमाही कळत जातात.
माझ्या मते अरिजीत जीव ओतून गातो, अगदी पोटातून गातो..
तो कलंकच्या टायटल ट्रॅकमध्ये 'पिया रे..' असं म्हणत आळवणी करतोय, ते ऐकून पोटात तुटल्याशिवाय राहत नाही. त्याला इंग्रजीमध्ये 'He croaked' असा चपखल शब्द आहे. पण,
त्याच्या आवाजात उन्माद नाही.
तो बालिश नाही, वात्रट नाही
तो हट्टी नाही
तो क्युट्सी पण नाही
आणि तो रांगडा तर मुळीच नाही.
तो मच्युअर प्रेमाचा पुरस्कर्ता आहे.
झिंज्या उपटायची किंवा कानाच्या खाली जाळ काढायची इच्छा झाली तरी, अजिबात राग न येता शांतपणे उर्दूमिश्रित सुंदर सुंदर शब्द, सुंदर आवाजात फेकून समोरच्याला गळाला लावायचं आणि ते नाही जमलंच तर पुन्हा मच्युअर विरहाची, मच्युअर प्रेमभंगाची गाणी गायला आहेतच साहेब.
त्यात काही वाईट नाही, बऱ्याचदा ते भावतंही..
पण ते पुष्कळदा मचूळ वाटतं.
आणि पुष्कळदा अपुरं.

उदाहरणार्थ - मी एखाद्याला एखादी गोष्ट बोलून जाते आणि मग नंतर का बोललीस, तोंड उटकटायची काय गरज होती का.. असं म्हणत मी डोक्यावर उशी दाबून पलंगावर कपाळ बडवून घेत असते, तेव्हा मला काय वाटतंय हे सांगायला अरिजीतचं एकही गाणं मिळत नाही. तेव्हा माझ्या मदतीला मोहित चौहान धावून येतो. जेव्हा मला प्रचंड रोमॅंटिक स्वप्न पडत असतं, तेव्हा स्वप्नात पापोनच गात असतो. समोरच्याला कळेल न कळेलशा पद्धतीने फ्लर्ट करायचंय, आणि नंतर 'मी नाही ब्वा' म्हणून हात वर करायचेत, तर सुनिधी हवी. एकंदरच मानवी भावभावनांचा स्कोप असेल, तर कैलाश खेर, राहत फतेह अली खान मस्ट!

अरिजीतची गाणी अतोनात कर्णमधुर, सुश्राव्य आहेत. तुमचा मूड चांगला असेल आणि चांगल्या मूडमध्ये ऐकायला तुम्हाला चांगली गाणी हवियेत, तर अरिजीत इझ युअर मॅन! पण टाळा दाखवत भोकाड पसरुन रडायचंय, धान्याचं भरलेलं पोतं फाटून भळभळावं तसे अश्रू गाळत बेवफा सनमला उद्देशून गाणी गायचियेत, तर हरिहरन किंवा सोनू निगमच आठवतो.

हे जे भावनांमधले पदर आहेत, हा जो भावनांचा पट आहे तो अरिजीतच्या गाण्यामध्ये नाही. त्याचं गाणं आटोपशीर आहे, मोजूनमापून, चापूनचोपून नीटस चौकटीत बसवलेलं आहे, ते देखणं आहे आणि नोट्स दिल्यात त्याच्याशी प्रामाणिक राहून आवाजाचे चमत्कार दाखवणारं आहे. त्याच्या गाण्यात आर्तता असलीच तर ती देखील काटेकोर आहे, ती एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जात नाही.
आणि म्हणूनच त्याचं गाणं भिडतं, पण आरपार जात नाही.

पण, आपलं ज्यावर प्रेम आहे त्या माणसांच्या सगळ्याच मर्यादा, उणीवा आपण समजून घेतो..
तशा अरिजीतच्या उणीवाही पोटात घालतो.

--

मी थोड्याशा साशंक मनानेच 'बेखयाली' ऐकलं होतं, पण सचेतने थोडासा हट्टी, थोडासा मुजोर, थोडासा हळवा, नकाराची, दुराव्याची हिरवी जखम घेऊन भळभळणारा कबिर सिंग इर्शाद कामिलच्या शब्दांमधून माझ्या डोळ्यांसमोर उभा केला होता. अकॉस्टिक आणि बेस गिटारवर तोललेलं, इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा भरणा असलेलं ते रॉक गाणं पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि माहीत नाही किती वेळा ऐकलं, तेव्हा प्रत्येक वेळी कसलं जिव्हारी लागत गेलं होतं. माझी विकेट तिथेच पडली. तुम्हाला आवंढे गिळायला लावायला सतार, चेलो किंवा व्हायोलिनच लागतं अशातला भाग नसतो हे 'रॉकस्टार'ने फार पूर्वीच सिद्ध केलं, नाही का?  बेखयालीने फक्त "मी टू" म्हटलंय. पंडितजींच्या क्लिनिकमधल्या अॅक्युप्रेशर मशीनवर दहा मिनिटं उभं राहिलं की, नंतरची पंधरा-वीस मिनिटं पूर्ण शरीरातून करंट झणझणत जातात. सचेतचं 'बेखयाली' ऐकून अगदी तशीच भावना झाली होती; पण अरिजीतचं 'बेखयाली' ऐकून मलाच धाप लागली. तो कबिर सिंग दम्याचा दुखणाईत असेल आणि भरल्या संसारातून उठून जायला लागत असल्यामुळे असा निरिच्छ, निर्मम आवाजात गात असेल, असं वाटायला लावलं त्या गाण्याने.
अरिजीतने अक्षरश: ओढगस्तीला आल्यासारखं ते गाणं म्हटलंय. 

असो,
लॉंग स्टोरी कट शॉर्ट- मोहित चौहानचं 'साड्डा हक' अरिजीतने गायलं असतं तर कसं वाटलं असतं,  तसंच मला सचेतचं 'बेखयाली' अरिजीतच्या आवाजात ऐकून वाटलं.
सचेतच्या गाण्यात 'ये जो लोग-बाग हैं, जंगलकी आग है'च्या वेळी मागे करताल वाजतं, ते प्रचंड इरॉटिक, उद्दाम आणि रहस्यमय वाटतं. तेच करताल अरिजीतच्या व्हर्जनमध्येही वाजतं, पण त्यात ते जाम केविलवाणं वाटतं. पॉलो कोएलो म्हणतो तसं, "अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने मे जुट जाती है". सचेतच्या गाण्यातलं सर्वकाही, अगदी 'फासला मिटा..'च्यावेळी या कानातून त्या कानात जाणारा वाऱ्याचा झंझावात- हे सर्वकाही एकत्र येऊन त्या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. 
अरिजीतच्या गाण्याचं कंपोझिशन तेच आहे, हा वाऱ्याचा झंझावात तिथेही आहे, पण तिथे-
बेखयालीचा खयाल मात्र नाही.

--

मला काहीतरी सांगायचं असेल, तर शंभरातल्या नव्वद वेळा मी गाण्याचा आधार घेते. संगीत हे शॉर्टहॅंडमधलं कन्फेशन असतं म्हणे! (हाण तिच्या...)  
माझ्या मनातले लोकांचे बुकमार्क हे गाण्यांनी बनलेले असतात. मी जेव्हा नव्या माणसाला भेटते आणि मला ते माणूस आवडतं, तेव्हा त्याला/तिला एखाद्या गाण्याचं बॅकग्राउंड जोडलं जातं.
आणि मला आवडणाऱ्या एकाही व्यक्तीला अरिजीतच्या गाण्याचं बॅकग्राउंड नाही.
मी ऐकलेल्या प्रत्येक गाण्यामध्ये माणसांचे तुकडे तुकडे शोधणारी पोरगी आहे. मी पुन्हा पुन्हा ऐकलेल्या त्याच गाण्याने, त्याच शब्दांनी हवी तीच व्यक्ती डोक्यात आली नाही की, माझ्यासमोर एक्झिस्टेन्शियल क्रायसिस निर्माण होतो.
आणि त्यामुळेच अरिजीतचं 'बेखयाली' ऐकून मी बिथरले.

अरिजीतच्या गाण्यांनी मला याआधी आनंद दिलाय आणि त्या काही क्षणांच्या भांडवलावर हे सगळं विसरुन पुढे जाता येऊ शकेल, नव्हे मी जाईनच.
पण,
अरिजीतने असं करायला नको होतं.
हे बरं नाही.

--

आजचा शब्द
मेलोमानी
(नाम)
संगीत आणि सुरांबद्दल नको तितकं आणि निरातिशय प्रेम व आकर्षण.

न बोलू मैं तो कलेजा फूँके..

कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं.
आपल्याला कोणातरी भेटतं..
आपल्या आयुष्यात कोणाचातरी शिरकाव होतो हे म्हणायला गेलं तर किती अद्भुत आहे..

ही माणसं येतातच मुळी त्यांचं पूर्ण आयुष्य घेऊन..
आणि आपल्या आयुष्यात येताना त्यांचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही घेऊन येतात.
त्यांचं थकलेलं, मोडकळीला आलेलं, अस्वस्थ, अनिश्चिंत, कावरंबावरं मन (मन असतंच तसं म्हणा..)
ते ही घेऊन येतात सोबत.

मला कुतूहल या गोष्टीचं आहे की, तुझ्या मनाची अवस्था कशी आहे.
त्याला कायकाय पाहावं लागलंय, त्याचा प्रवास कुठून कुठवर झालाय..

माणसांना जीव लावणं काय असतं हे एकदा का माहीत झालं की माणूस जीव लावायला घाबरतो..सतरांदा विचार करतो
मला ते माहीत आहे..आणि म्हणूनच मी घाबरते आहे.
तुम्हाला एखादी गोष्ट माहीत झाली की, ती तितक्या सहजपणे पुन्हा करावीशी वाटत नाही, आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात
तुला ते बहुतेक माहीत असेल, अथवा नसेल
माहीत नसेल, तर ते बरंच आहे
काहीकाही वेळी गोष्टी माहीत नसल्या तरी फार काही बिघडत नाही
त्यामुळे ते फार मनाला लावून घेऊ नकोस!!

परवाच घरी गेलेले तेव्हा समुद्रावर गेले.
मी अजूनही एखाद्या पुरुषासोबत बसून समुद्र पाहिलेला नाही
जी गोष्ट बरीच लोकं फारसा विचार न करता, फार प्रयत्न न करता करतात, ती गोष्ट मी अजूनही केलेली नाही
मी न केलेल्या गोष्टींमध्ये खूप गोष्टी आहेत...जगता जगता, पाण्याच्या वर डोकं ठेवायचा प्रयत्न करता करता राहून गेलेल्या..
हावरेपणाने जगून घेतलेली वर्षंही आहेतच, पण लेखाजोखाच मांडायचा झाला, केलेल्या गोष्टींपेक्षा करुन घ्यायच्या राहिलेल्या गोष्टीच फार आहेत
ली जक म्हणतो तसं- ते तसंच असायचं असतं..
तेव्हा, फार जीवाला लावून घेऊ नकोस!!

मी समुद्र पाहिलाय, असं कधी म्हणू नये
तू आधी पाहिलेला समुद्र तू नंतर पाहशील त्या समुद्रापेक्षा वेगळा असणारेय..
नव्या माणसासोबत पाहशील तेव्हा त्या माणसासोबत पाहण्याची पहिली वेळ असेल.
हे पहिलेपण या केल्या-नकेल्या गोष्टींचंही असतं बहुतेक.
तुम्हाला त्या कितीही चांगल्या माहीत असल्या-नसल्या, तुम्ही हे आधी केलेलं आहे असं तुम्हाला वाटत असलं,
तरी..
तुम्हाला ज्या व्यक्तीच्या असण्या-नसण्याने फरक पडतो तिच्यासोबत केलेली गोष्टदेखील पहिल्यासारखीच असेल.

माणसामाणसांमधले क्षण, ते लम्हे..त्यानंतर घडणारं सर्वकाही यात कोणाचाही दोष नसतो
ते तसंच घडणार असतं
काही लाटा लपलपत राहतात आणि काही किनाऱ्यावर येऊन फुटतात
ते तसं का झालं याबद्दलच्या विचाराला तसा काही अर्थ नसतो.
कारण, ते तसंच होणार असतं..
तसं नसतं झालं, तर आणखी कोणत्यातरी पद्धतीने झालं असतं..
पण झालं असतंच.
सो डोण्ट थिंक अबाउट इट सो मच.

आणखी एक गोष्ट-
तू कालचा दिवस जगून घेतला म्हणजे तुला आजच्या दिवसाबद्दल सगळं काही कळलं असं नसतं
त्यामुळे, फार विचार करु नकोस
लेट इट बी.
होतंय ते होऊ देत.
घडतंय ते घडू देत.
 
Designed by Lena